Homeक्राइमनागपूरातील तीन प्रतिष्ठित रुग्णालयांनी घेतला वकीलाचा प्राण! तक्रार दाखल

नागपूरातील तीन प्रतिष्ठित रुग्णालयांनी घेतला वकीलाचा प्राण! तक्रार दाखल

कोविडचा चाचणीचा अहवाल नसल्यामुळे हार्ट अटॅकच्या रुग्णाचा गोल्डन अवर घालवला वाया

नागपूर,ता. २ सप्टेंबर: ॲड.नितीन किशोरराव आंबिलवादे यांना सहा दिवसांपूर्वी २८ ऑगस्ट रोजी रात्री १० च्या सुमारास ॲसिडीटीचा त्रास होत असल्याने त्यांच्या वकील मित्राने तिखीले हॉस्पीटल,गोमती हॉटेलच्या मागे यानंतर गिल्लुरकर हॉस्पीटल,उमरेड रोड तसेच ऑरियस हॉस्पीटल,मेडीकल चौक येथे उचारासाठी घेऊन गेले. या तिन्ही रुग्णालयांनी ॲड.नितीन यांच्यावर उपचार केले नाही.यावेळी ॲड.नितीन यांना श्‍वसनाचा त्रास होत असल्याने त्यांनी वारंवार तेथील स्टाफला ‘मला ऑक्सीजन लावा हो’म्हणून विनंती केली मात्र निष्ठूर यंत्रणेला पाझर फूटले नाही आणि गोल्डन अवर निघून गेल्याने ॲड.नितीन यासारख्या गुणी वकीलाला प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना नागपूरात घडली.

या तिन्ही रुग्णालयाच्या विरोधात ॲड.सुदीप जैस्वाल तसेच ॲड.सतीश उके यांनी पोलिस आयुक्त,मनपा आयुक्त तसेच अजनी पाेलिस निरीक्ष् क यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे.मृतक ॲड.नितीन यांच्यासोबत त्यावेळी ॲड. वैभव दत्तूजी जगताप हे सोबत होते,या रुग्णालयांच्या डॉक्टर व स्टाफने आंबिलवादे व जगताप यांना अक्ष रश: बेईज्जत करुन हाकलून लावले. ‘हा कोविड रुग्ण आहे,चालते व्हा येथून‘असे त्यांनी रुग्णासमोर म्हटले,यावेळी रुग्ण यांनी ‘मला ऑक्सीजन लावा हो’म्हणून गयावया करीत होते मात्र या तिन्ही रुग्णालयांनी उपचार केले नाही व त्यांना आपले प्राण गमवावे लागले.

नागपूर महानगरपालिकेने ॲरियस रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून घोषित केल्याने तसेच सगळ्या प्रकारचे रुग्ण दाखल करुन घेत असल्याने ॲड.जगताप हे रुग्णाला या रुग्णालयात घेऊन आले. या रुग्णालयाच्या स्टाफने रुग्णाला व ॲड.जगताप यांना आतमध्ये घेतले. स्ट्रेचरवर आणायला गेले असता एक डॉक्टर तिथे आले आणि ‘इनकी गाडी अंदर किसने ली? म्हणून ओरडले. ॲड.जगताप यांनी गयावया करुन ‘डॉक्टर साहेब रुग्णाची तब्येत खूपच खराब आहे,मी आपली मागाल ती फी द्यायला तयार आहो,कृपया यांच्यावर उपचार सुरु करा ’यावर डॉक्टर उत्तरले ‘आमच्याकडे बेड नाही आहे’यावर ॲड.जगताप यांनी ‘आप जमीन पे इलाज करोगे तो भी तकलीफ नही’असे सांगितले मात्र त्यावरही या डॉक्टरने स्टाफला सांगितले ‘इनक गाडी बाहर निकालो’आणि रुग्णला एवढ्या नाजूक परस्थितील त्या करोना योद्धाने हाकलून दिले!

या सर्वाचा परिणाम ॲड.नितीनवर झाला.त्यांनी या घटनेची धास्ती घेतली. त्यांनी मेडिकल गाठले. त्यांनी या दोघांना ॲडमिट केले.एकाच बेडवर उपचाराला सुरवात केली मात्र थोड्याच वेळात त्यांनी ॲड.नितीन आंबिलवादे यांना मृत घोषित केले.यावेळी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे रुग्णाला उपचार मिळण्यासाठी खूप उशिर झाला,तब्येत जास्त खराब झाली व ते मृत पावले.विशेष म्हणजे त्यांची कोविड चाचणीचा अहवाल हा निगेटीव्ह आला. ते कोविडने नव्हे तर हार्ट अटैकने गेले. या तिन्ही रुग्णालयांच्या अमानवीय व्यवहाराने एका गुणवंत वकीलाची हत्या केली.

या रुग्णालयांना नागपूर शहरात नागपूर महानगरपालिकेने तसेच इतर शासकीय यंत्रणेने वैद्यकीय व्यवसाय करण्याचे परवाने दिलेले आहे याशिवाय त्यांचे रुग्णालय हे व्यवसायिक रुग्णालय असल्याचे फलक देखील रुग्णालयासमोर लावले होते. त्यांचे रुग्णालय हे सर्वप्रकारच्या रुग्णांवर उपचार करीत असल्याचा प्रचार देखील त्यांनी शहरात केला आहे.त्यामुळे मृतक ॲड.नितीन हे ॲड.जगताप यांच्यासोबत या रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याकरिता गेले होते मात्र वैद्यकीय सेवेचा धर्म विसरुन त्यांना हाकलून लावण्यात आले.याशिवाय या रुग्णालयांनी अतिशय तुच्छ प्रकारची वागणूक या मृतक व ॲड.जगताप यांना दिली.

वरील संपूर्ण प्रकार हा माणूसकीला काळीमा फासणारा व कायद्याच्या विरोधात असून वरील तिन्ही आरोपी रुग्णालय व त्यांचे व्यवस्थापक यांच्या अमानवीय वागणूकीमुळे,गैरजवाबदारीमुळे मृतकाचा जीव गेला.वरील तिन्ही रुग्णालयाचे २८ ऑगस्ट २०२० रोजीचे १२.३० ते २ वाजेपर्यंत संपूण सीसीटीव्ही फूटेज जप्त करुन व ॲड.वैभव जगताप यांचे बयाण घेऊन या तिन्ही रुग्णालयांचे मालक,घटनेच्या दिवशी उपस्थित डॉक्टर्स आणि स्टाफ यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावे, त्यांचे रुग्णालयाचे परवाने रद्द करण्यात यावे तसेच त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.

नागपूर महानगरपालिकेने देखील या तिन्ही रुग्णालयांचे परवाने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.या तक्रारीची प्रत ही इंडियन मेडीकल कॉऊंसिल ऑफ इंडिया(आयएमए) मुंबई तसेच दिल्लीला पाठविण्यात आली आहे.

विशेष म्हणजे गिल्लूरकर रुग्णालयाला केंद्राच्या परवानगीने करोना लस चाचणीचे केंद्र देखील बनवण्यात आले.याचा खूप गाजावाजा ही दररोज वृत्तपत्रात होत असताे. लसीची दुसरी चाचणी देखील याच रुग्णालयात पार पडली.आता लवकरच तिसरी चाचणी करण्यात येणार आहे मात्र एकीकडे शहरातील या एकमेव रुग्णालयात करोना लसीची चाचणी करुन प्रसिद्धीचे श्रेय लाटणा-या याच रुग्णालयाने कोविडच्या संशयातून एका गुणी वकीलाला मृत्यूच्या जाळ्यात ढकलले.त्यांच्या कुटुंबियांचा जगण्याचा आधार हिरावला. याचे देखील आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. करोना लसीमध्ये कोट्यावधीचा फायदा आहे,दूसरीकडे धोकादायक परिस्थितीत रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी आपल्या दारावर आशेने आला असता त्याला मात्र मृत्यूच्या दाढेत ढकलण्यात आले.या शाेकांतिकेवरही वकील जगत चांगलाच संताप व्यक्त करीत आहे.

Latest बातम्या