विद्यार्थ्याने स्वत: लॉगिन करुन केंद्र निवडले:एनटीएचे स्पष्टीकरण
उद्या नीट परिक्षा:शेवटच्या क्षणी विद्यार्थ्याला बदलून मिळाले नागपूरचे परिक्षा केंद्र
नागपूर,ता.२० जून २०२६ : उद्या २१ जून रोजी ‘नीट’(NEET)ची पुरर्परीक्षा होणार असून आज नागपूरातील एका विद्यार्थ्याला चक्क ‘अबूधाबी’(UAE)चे परिक्षा केंद्र देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.विद्यार्थ्यासह त्याच्या पालकांनाही घाम फूटला,पालकांनी माध्यमांकडे संताप व्यक्त केल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने(एनटीए)चूक सुधारुन या विद्यार्थ्याला नागपूरातच परीक्षा केंद्र उपलब्ध करुन दिले.
नागपूर येथील ‘नीट’पुनर्परीक्षेच्या या गोंधळाची आज दिवसभर विविध माध्यमांवर चांगलीच चर्चा रंगली.जीवनाला कलाटणी देणा-या इतक्या महत्वाची परिक्षा अगदी उद्यावर आली असल्याने,या घटनेमुळे नागपूर ते दिल्ली संपूर्ण यंत्रणा हलून गेली.मात्र,विद्यार्थ्याने स्वत: लाँगिन करुन हे केंद्र निवडल्याचे स्पष्टीकरण एनटीएने दिल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले.
अखेर,एनटीएने चूक सुधारुन या विद्यार्थ्याला नागपूरातच परीक्षा केंद्र उपलब्ध करुन दिल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
नागपूरात राहणारा अब्दुल्ला मोहम्मद तालीब या विद्यार्थ्यासोबत हा प्रकार घडला.त्याच्या हॉल तिकीटवर चक्क ’अबुधाबी’च्या परिक्षा केंद्राचा पत्ता होता!
एनटीएकडून परदेशातील विद्यार्थ्यांसाठी हे परिक्षा केंद्र दिलं जातं मात्र,देशातील विद्यार्थ्यांला थेट परदेशातील परिक्षा केंद्र देण्यात आल्याची ही विरळीच घटना ठरली.विद्यार्थ्याच्या पालकाने भंडारा,वर्धा किंवा नागपूर असे तीन जिल्हातील केंद्राची नावे परिक्षा अर्जात नमूद केली होती,असा दावा केला आहे.
राष्ट्रीयस्तरावरील अत्यंत महत्वाच्या परिक्षेतील हा घोळ चर्चेत आल्यानंतर तातडीने पिडीत विद्यार्थ्याच्या कुटूंबियांनी एनटीएच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला आणि हा प्रकार त्यांच्या निर्दशनास आणून दिला.या प्रकारातून विद्यार्थ्याचीही भंबेरी उडून तो सतत रडत असल्याचे त्याच्या पालकांनी माध्यमकर्मींना सांगितले.तो आता उद्याची परिक्षाच देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे अब्दुल्ला याच्या पालकांनी सांगितले.
(छायाचित्र : विद्यार्थ्याचे वडील व हॉल तिकीट)
ही तांत्रिक चूक असल्याचे एनटीएने सांगितले तसेच अब्दुल्ला याला नागपूरातच परिक्षा केंद्र मिळवून देण्यात आल्याचे स्पष्टीकरण एनटीने दिले.मात्र,अवघ्या चोवीस तासांवर परिक्षा जवळ अाल्यानंतर विद्यार्थ्यासोबत झालेल्या या गोंधळावर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांनी देखील ट्टीट करीत एनटीएचा चांगलाच ‘समाचार’घेतला.
’
पासपोर्ट नाही..परिस्थिती नाही…पैसे नाही अशा परिस्थितीत हा विद्यार्थी रात्रभर रडत होता व परिक्षा देण्यास मनाई करत होता…या तणावाची काेणी कल्पना तरी करु शकतं का…अखेर हे झालंच कसं?एनटीए खरंतर देशातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या सहनशक्तीची परिक्षा घेतेय…जी व्यवस्था एका विद्यार्थ्याला त्याच्याच शहरात एक परिक्षा केंद्र देऊ शकत नाही..त्या व्यवस्थेला परिक्षा घेण्याचा काहीही अधिकार नाही..आमच्या मुलांच्या भविष्यासोबत जुगार खेळणं बंद करा…’असे ट्टीट राहूल गांधीनी केले.
नाना पटोले,विजय वडेट्टीवार यांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला.एनटीएची नीटची परिक्षा घेण्याची पात्रताच नाही,त्यामुळेच विद्यार्थ्याला दुस-या देशात परिक्षा केंद्र दिल्याचा टोला वडेट्टीवारांनी हाणला.
‘कॉक्रोच जनता पार्टीचे’ संस्थापक अभिजित दीपके यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त करीत,ज्या विद्यार्थ्याकडे पासपोर्टही नाही त्याला अबुधाबीचे परिक्षा केंद्र देण्यात आले.एनटीएचा अजून किती भोंगळ कारभार चालत राहणार आहे,कळत नाही,असे ते म्हणाले..आधीच नीटची परिक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास १७ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली व आपले आयुष्य संपवले.नीटच्या पुनर्परिक्षेमुळे विद्यार्थी आधीच खूप जास्त तनावात असताना,तेच पुनर्परिक्षा घेत आहेत,परिक्षेचे पेपर आता विमानाने पाठवतात आहेत,परिक्षा केंद्रावर अर्ध सैन्य दलाची सुरक्षा लावण्यात आली मात्र,विद्यार्थ्याला केंद्र काय देतात आहे? केंद्र सरकारने विद्यार्थ्यांची नुसती थट्टा चालवली असल्याची जहाल टिका दीपके यांनी केली.
थोडक्यात,गेल्या महिन्याभरात संपूर्ण देश ’नीट’परिक्षा व पेपरफुटीला घेऊन ढवळून निघालेले असताना,एक ही तांत्रिक चूक एखाद्या विद्यार्थ्याला आयुष्यातून पुन्हा उठवू शकते याचे भान एनटीएला अद्याप आले नसल्याचा संताप आज सोशल मिडीयावर चांगलाच उमटला.केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याची मागणी आज जंतरमंतरवर तीव्र आंदोलन करीत आज ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने केली असून,नागपूरच्या घटनेची चर्चा देखील हे आंदोलन अधिक तीव्र करण्यास कारणीभूत ठरले.
………………………………………