|

आणखी १७ जणांना बाधा; शहरात ३५८ जण कोरोनाच्या विळख्यात
नागपूर, ता.१७ मे: आज रविवार दि. १७ मे रोजी सकाळी ५५ वर्षीय व्यक्ति जी अत्यधिक आजारी होती तिला रुग्णालयात दाखल करीत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला.किंबहूना घरीच मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
त्याला इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णलयातील (मेयो) अपघात विभागात आणले. मात्र त्याचा श्वास थांबला होता. डॉक्टरांनी मृत घोषित केले. मात्र शांतीनगर परिसरातील रहिवासी असल्याने कोरोनाचा संशय व्यक्त करीत या मृतदेहाचे नमूने घेण्यात आले. पहिल्या टप्प्यातच हे नमूने तपासण्यात आल्याने अवघ्या काही वेळात मेयोतील प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाला. कोरोनाबाधित असल्याचे उघड होताच, मृतदेहाची विशेष काळजी घेण्यात आली. या व्यक्तीच्या मृत्यूने नागपुरातील कोरोनाबाधिताच्या मृत्यूचा आकडा सहावर पोहचला आहे.
मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये गड्डीगोदाम परिसरातील ,६५ वर्षीय रुग्णाचा शनिवार दि.१६ मे रोजी मृत्यू झाला. यानंतर लगेच १७ मार्च रोजी शांतीनगरताली व्यक्ती कोरोनाच्या बाधेने दगावली असल्याने खळबळ उडाली आहे. विशेष असे की, अनेक दिवसांपासून हा व्यक्ती घरीच असल्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्यांनाही कोरोनाची जोखीम आहे. याशिवाय उपराजधानीत रविवारी एकाच दिवशी १७ जण बाधित आढळून आले, यामुळे बाधितांचा आकडा ३५८ वर पोहचला. यात मेयोतील प्रयोगशाळेतून ९ तर मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ४ आणि निरीच्या प्रयोगशाळेतून २ नमूने कोरोनाबाधित आढळले. शहरात आज २३५ नमूने तपासण्यात आले. आतापर्यंत सहा मृत्यूची नोंद नागपुरच्या कोरोना खात्यात झाली.
शनिवारपासून संचारबंदीत शिथिलता देण्यात आली. यामुळे आता नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. शहरातील अनेक दुकाने उघडली. ही बाब प्रशासनासाठी चिंतेची तर नागरिकांसाठी जोखिमेची ठरु शकते.
मेयोच्या आकस्मिक विभागात दगावलेल्या व्यक्तीवर उपचाराचाही संधी डॉक्टरांना मिळाली नाही. रुग्णालयात आणताना वाटेत किंवा घरीच दगावला असल्याची शंका मेयोतील सुत्रांनी व्यक्त केली. कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तत्काळ चार पदरी प्लास्टिकमध्ये गुंडाळून मृतदेह शवविच्छेदन कक्षात पोहचवण्यात आला. शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.
शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार
कोरोनाबाधित मृतकाच्या पार्थिवावर निवडक नातेवाईकांच्या उपस्थितीत नागपूर महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार केले. सतरंजीपुरा झोनल आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात वरीष्ठ आरोग्य निरीक्षक यांच्या उपस्थितीत कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यविधी पार पाडला. शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनाबाधिताच्या मृतदेहापासून संसर्ग होऊ नये यासाठी शांतीनगर घाट परिसरात सोडिअम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली.
शहरातील कोरोना संसर्गाचे ६ बळी-
-५ एप्रिल रोजी सतरंजीपुरा येथील रोजी ६८ व्यक्तीचा मृत्यू
-२९ एप्रिल रोजी मोमीनपुरा येथील ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू
-५ मे रोजी पार्वतीनगर येथील २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू
-११ मे रोजी पांढराबोडी येथील २९ वर्षीय युवकाचा मृत्यू
-१६ मे रोजी गड्डीगोदाम येथील ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
-१७ मे रोजी शांतीनगर येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
२९ जणांची कोरोनावर मात-बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या २२२ वर
उपराजधानीत कोरोना बधितांची संख्या जरी वाढत आहे तरी त्याच तुलनेत मेडिकल आणि मेयोत दाखल असलेले बाधित बरेही होत आहेत. ही प्रशासनासाठी नव्हे तर नागपूरकरांसाठी ही अत्यंत दिलासा देणारी बाब आहे.
शनिवारपासून कोरोनावर विजय मिळवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. रविवार दि.१७ मे रोजी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेडिकल) तब्बल २९ जणांना कोरोनामुक्त घोषित करण्यात आले. डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्यसेवकांनी प्रत्येक रुग्णासाठी टाळ्या वाजवून अभिनंदन केले. या सर्वांनी मेयोतील डॉक्टर परिचारिकांचे आभार मानले. ११ मार्चपासून आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या २२२ वर पोहचली.
मनपाच्या योग्य नियोजनातून विलगीकरणाचा पर्याय योग्यरीतीने हाताळल्याने केवळ विलगीकरणातूनच कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. रविवारी कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पाच पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. चार वर्षांच्या मुलासह ८ वर्षांच्या मुलीने कोरोनावर मात केली. चिंचभवन आणि आमदार निवास विलगीकरण कक्षातून या बाधितांना मेयो मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रशासनाच्या नियोजनामुळे बाधितांनी कोरोनावर विजय मिळवला.
|