

नागपूर: ‘करोना’ विषाणूमुळं निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत दक्ष नागरिक म्हणून कर्तव्य बजावण्याचं काम संघ स्वयंसेवकांनी सुरू केलं आहे. प्रशासनाच्या सल्ल्यानं व परवानगीनं आवश्यक तिथं सहकार्याचा हात दिला जात आहे. समाजानंही सरकारच्या सूचनांचं पालन करून ‘करोना’वर विजय मिळवण्याचा संकल्प करावा,’ असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.
करोना व्हायरसच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशभरात लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याच्या निमित्तानं सरसंघचालकांनी आज संघ स्वयंसेवकांना संबोधित केलं. लॉकडाऊन व सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं पालन करून संघाचं कार्य सुरू ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी स्वयंसेवकांना दिल्या. त्याचवेळी देशावर सध्या ओढवलेल्या करोनाच्या संकटावरही भाष्य केलं. ‘करोनाचं संकट मोठं आहे यात वाद नाही. मात्र, समाजाच्या सामूहिक जबाबदारीतून या संकटावर यशस्वीरित्या मात करता येऊ शकते. औषधं व आरोग्याच्या इतर सोयीसुविधा या गोष्टी नंतरच्या आहेत. त्या सहाय्यक आहेत. मात्र, या विषाणू युद्धात लढताना पहिली आणि महत्त्वाची गरज आहे ती संसर्ग टाळण्याची. ‘सोशल डिस्टन्सिंग’ हीच या लढाईतील प्रमुख बाब आहे. ती समाजानं पाळावी,’ असं भागवत म्हणाले.
करोनाची लागण होण्याच्या घटना सुरूच असून रोजच्या रोज नवनवे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यातील करोना रुग्णांची संख्या आतापर्यंत १०७वर पोहोचली आहे. त्यात सर्वाधिक मुंबईतील रुग्ण आहेत. त्या खालोखाल पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाबाधित आढळले आहेत. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे उपचारानंतर रुग्ण बरे होत असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. आजही १५ रुग्णांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.




आमचे चॅनल subscribe करा
