

नागपूर: शिवसेनेने भाजपसोबत जाण्यास दिलेला नकार, त्यानंतर राज्यात लागू झालेली राष्ट्रपती राजवट या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. अर्धा तास चर्चा केल्यानंतर मुनगंटीवार संघ कार्यालयाबाहेर आले आणि ‘वेट अँड वॉच’ एवढंच मीडियाशी बोलले आणि निघून गेले. त्यामुळे भागवत-मुनगंटीवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? याचं गुढ वाढलं आहे.
शिवसेनेने भाजपसोबत युती करण्याचे सर्व दोर कापल्याने भाजपची प्रचंड कोंडी झाली आहे. त्यातच राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसनेही किमान समान कार्यक्रमावर शिवसेनेसोबत आघाडी करण्याचे संकेत दिल्याने भाजपला सत्तेपासून दूर रहावं लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यपालांच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनीही महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केल्याने आधीची विधानसभा विसर्जित झाली आहे. त्यामुळे सर्व मंत्र्यांची मंत्रिपदे आपोआपच संपुष्टात आली असून राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडत असल्याने सुधीर मुनगंटीवार यांनी आज सायंकाळी संघ कार्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. चर्चेवेळी दोघेच होते. बंद दाराआड झालेल्या या चर्चेत नेमके काय घडले हे मुनगंटीवार यांनी सांगितले नाही. मात्र ‘वेट अँड वॉच’ असं सूचक वक्तव्य करून ते निघून गेले. भागवत यांच्या भेटीनंतर मुनगंटीवार तडक भाजपच्या नागपूर कार्यालयात गेले. तिथून ते भागवतांचा निरोप घेऊन मुंबईकडे रवाना होणार असल्याचं सांगण्यात येतं.
मुनगंटीवार यांनी ‘वेट अँड वॉच’ असं सूचक वक्तव्य केल्याने राज्यात पुन्हा भाजपचं सरकार येणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. कालच भाजप नेते नारायण राणे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सत्ता स्थापन करायची आहे, कामाला लागा, असे आदेश दिल्याचं मीडियाला सांगितलं होतं. सत्ता स्थापन करण्यासाठी कोणताही प्रयत्न करणार असल्याचंही राणेंनी सांगितलं होतं. त्यामुळे राज्यात घोडेबाजार होणार असल्याचंही बोललं जात आहे.




आमचे चॅनल subscribe करा
