
मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाची रिपरिप सुरू असून येत्या ४८ तासांत मुंबईसह राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या मतदानाला पावसाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने सर्वपक्षीय उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.गेल्या तीन दिवसांपासून मुंबई-ठाण्यासह राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या तर काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
आज कोल्हापूर, सातारा आणि पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. सातारा आणि कोल्हापूरला तर पावसाने अक्षरश: झोडपून काढले. कोल्हापूर आणि साताऱ्यात जोरदार पाऊस झाल्याने महामार्गावर पाणी भरले होते. त्यामुळे साताऱ्यात काही काळासाठी वाहतूक बंद करण्यात आली होती. काही काळाने पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरू करण्यात आली असून ही वाहतूक धीम्या गतीने सुरू असल्याचं सांगण्यात आलं. कोल्हापूर आणि साताऱ्यात अनेक घरांमध्ये पाणीही भरल्याने येथील नागरिकांची दाणादाण उडाली आहे. मात्र, सायंकाळपर्यंत कोल्हापूर आणि साताऱ्यातील पावसाचा जोर कमी होणार असल्याचंही हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, कोल्हापूर आणि साताऱ्यात उद्याही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, उद्या मुंबई, पालघर, ठाण्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. जळगाव, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, औरंगाबादमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. तर धुळे आणि नंदूरबारमध्ये आकाश निरभ्र राहणार असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांवर पावसाचं सावट असल्याने त्याचा फटका उद्या होणाऱ्या मतदानाला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वपक्षीय उमेदवारांची चिंता वाढली आहे.
दुपारी तीन वाजल्यापासून कोल्हापूरला मुसळधार पावसाने जोरदार झोडपून काढले आहे. ढगफुटीसारख्या कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक भाग जलमय झाले असून रस्त्यांवर पाण्याचे प्रचंड लोट वाहत आहेत. त्यामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. लक्ष्मीपुरी, धान्य लाइन, जयंती नाला पूल, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक, यल्लमा मंदिर चौक, विश्वपंढरी, बिंदू चौक, रंकाळा व दुधाळी परिसरातील रस्त्यांवर जवळपास फूटभर पाणी साचले आहे. महाद्वार रोडवर दिवाळीच्या खरेदीसाठी अनेक विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. पण ऐन गर्दी होण्याच्या वेळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. सुट्टीचा दिवस असूनही पावसामुळे नागरिकांना खरेदीसाठी बाहेर पडता आले नाही.
दरम्यान, ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक मतदान केंद्रांवर चिखल झाला आहे. काही ठिकाणी पाणी साचले असून या पाण्याचा उपसा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुण्यातही काही मतदान केंद्रांभोवती पाणी साचल्याने चिखल झाला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या मतदान केंद्रांवर जाऊन परिस्थितीची पाहणी केली.

आमचे चॅनल subscribe करा