
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद मिळवण्याचे स्वप्न शिवसेना पाहत असून आजच्या दसरा मेळाव्यातही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणांतून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्याचा उच्चार केला. त्यात शिवसेना नेते व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी तर पुढच्या वर्षी दसरा मेळाव्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसलेला असेल, असे विधान केले. विशेष म्हणजे आजच्या मेळाव्यात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे उद्धव यांच्या बाजूला बसले होते. राऊत यांच्या म्हणण्याचा रोख त्याकडेच होता.
भाजप-शिवसेना युतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला १२४ जागा आल्या आहेत. त्याचा उल्लेख करत राऊत यांनी ‘अब की बार शंभर पार’चा संकल्प सोडला. शिवसेना यावेळी १०० पेक्षा जास्त जागा जिंकेल व सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या हाती असतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. सध्या वाकड्यात आणि आकड्यात जायचे नाही, ही उद्धव ठाकरे यांची सूचना आहे. आपल्याला सर्वच्या सर्व गड जिंकायचे आहेत, बाळासाहेबांचे स्वप्न साकार करायचे आहे, असेही राऊत म्हणाले.
कधीकाळी शिवसेनेत असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावरही राऊत यांनी निशाणा साधला. शिवसेना ‘हिंद केसरी’ आहे, आमच्यासमोर कोणताही पहिलवान टिकला नाही. किती पहिलवान आले आणि किती गेले, असे नमूद करत यंदा पहिला विजय शिवसेना कणकवलीत मिळवेल, असे राऊत म्हणाले. ज्या ज्या लोकांनी शिवसेनेशी गद्दारी केली ते राजकीय पटलावरून नामशेष झाले आहेत आणि यावेळी कोकण, नवी मुंबई आणि नाशिकमध्ये हे तुम्हाला पाहायला मिळेल, असे राऊत यांनी निक्षून सांगितले. विशेष म्हणजे कोकणात कणकवली मतदारसंघात नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तिथे शिवसेनेने सतीश सावंत हा आपला अधिकृत उमेदवार त्यांच्याविरुद्ध उतरवला आहे. नवी मुंबईत ऐरोली मतदारसंघातून एकेकाळचे शिवसेना नेते गणेश नाईक भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्याकडे राऊत यांचा रोख होता.

आमचे चॅनल subscribe करा