
मुंबई: शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीची अखेर संयुक्त पत्रकाद्वारे घोषणा करण्यात आली आहे. मात्र ही घोषणा करताना जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या पत्रकावर केवळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्याच सह्या आहेत. मित्रपक्षातील इतर नेत्यांच्या या पत्रकावर सह्या नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइं नेते रामदास आठवले, रासप नेते महादेव जानकर, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांच्यात झालेल्या चर्चेनंतर महायुतीचा निर्णय घेण्यात आला असून तशी घोषणा करण्यात येत असल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. महायुतीतील कोणता पक्ष किती जागा व कोणत्या जागा लढवणार याचा तपशील लवकर जाहीर करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे चार दिवस बाकी असतानाही महायुतीच्या जागांचा तपशील लवकर जाहीर करण्यात येणार असल्याचं पत्रकात म्हटलं आहे. यावरून युतीत जागा वाटपावरून वाद असल्याचं अधोरेखित होत आहे.

चंद्रकांत पाटील प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात-
जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात ठेवून मित्र पक्षांना झुलवण्याचाही यामागे उद्देश असू शकतो, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. दरम्यान, काही तासांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे युतीबाबत संयुक्तपणे सांगतील. मला काहीही अधिकार नाहीत. त्यामुळे युतीबाबत काहीही सांगू शकत नाही, असे म्हटले होते. त्यानंतर पाटील यांच्याच सहीचं पत्रं व्हायरल झाल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत.दरम्यान, चंद्रकांत पाटील यावेळी प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ते पुण्यातील कोथरुडमधून निवडणूक लढणार आहेत. कोथरुड भाजपासाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ आहेत. चंद्रकांत पाटलांसाठी विद्यमान आमदार मेधा कुलकर्णींना पक्षासाठी त्याग करावा लागणार आहे. मेधा कुलकर्णी कोथरुडमधून मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. मात्र अधिकृत घोषणा झाल्याशिवाय बोलणार नसल्याचं आमदार मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.

आमचे चॅनल subscribe करा