

मुंबई,२८ सप्टेंबर २०१९: : राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांचे नाव नाहक गोवण्यात आले. मी बँकेच्या संचालक मंडळावर असल्यामुळंच पवारसाहेबांचं नाव आलं. त्यांना माझ्यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याचं पाहून अस्वस्थ झालो. त्याच उद्विग्नतेतून राजीनामा दिला,’ असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज स्पष्ट केलं.
अजित पवार यांनी शुक्रवारी तडकाफडकी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते ‘नॉट रिचेबल’ झाले होते. त्यामुळं त्यांच्या राजीनाम्याचे गूढ वाढले होते. अखेर शरद पवारांशी झालेल्या चर्चेनंतर अजित पवार यांनी आज स्वत:च सगळ्या गोष्टींचा खुलासा केला. ‘कोणालाही कल्पना न देता राजीनामा दिल्याबद्दल त्यांनी सर्वप्रथम पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांची माफी मागितली. ‘पवार साहेबांवर होणाऱ्या आरोपांमुळं मी व्यथित झालो होतो. सतत आमची नावं टीव्हीवर झळकत होती. साहेबांवर गुन्हा दाखल झाला. ज्यांच्यामुळं आपण इथवर आलो, त्यांना आपल्यामुळं त्रास होतोय हे मला सहन होत नव्हतं. काय करावं मला कळत नव्हतं. त्याच उद्विग्नतेतून मी राजीनामा दिला,’ असं अजित पवार म्हणाले.
पत्रकार परिषद पवारांच्या सांगण्यावरूनच-
अजित पवारांच्या राजीनाम्याचा संबंध कालपासून पवार कुटुंबातील कलहाशी जोडला जात होता. त्यावरही त्यांनी खुलासा केला. ‘आमच्या कुटुंबात कसलाही कलह नाही. आमचं कुटुंब मोठं असलं तरी घरातल्या मोठ्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखालीच सर्व गोष्टी होतात. पवार साहेब सांगतील तेच आम्ही ऐकतो हे त्रिवार सत्य आहे. ही पत्रकार परिषदही मी त्यांच्या सांगण्यावरूनच घेतोय, असं ते म्हणाले.
अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:
अचानक राजीनामा दिल्यामुळे पक्षनेते, कार्यकर्त्यांना वेदना झाल्या, उपमुख्यमंत्री असतानाही काही घटनांमुळे मी राजीनामा दिला होता. कोणालाही न कळवता राजीनामा दिल्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तीन दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्षांसोबत बोलणं झालं होतं. विवेकबुद्धीला स्मरून राजीनामा दिला. ११८८ कोटी रुपयांची अनियमितता झाली असल्याचे सहकार मंत्र्यांनी विधीमंडळाला सांगितले.२५ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याची आवई उठवली. साडे बारा हजार कोटींच्या ठेवी बँकेत असताना २५ हजार कोटींचा घोटाळा कसा होईल? एवढा मोठा घोटाळा झाला असता तर बँक बुडाली असती. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही शिखर बँक आहे. राज्यात संकट आले तर आऊट अॉफ वे जाऊन मदत केली जाते. कारखाने अडचणीत असताना नाबार्ड, केंद्र सरकार ही मदत देते. त्यावर शून्य टक्के दराने ही कर्ज दिले जाते. वेळ प्रसंगी अशी मदत करावी लागते. संचालक मंडळाच्या काहीच बैठकांना उपस्थित होतो. बँक नफ्यात सुरू आहे. बँकेला कोणताही तोटा नाही. शरद पवार यांचा बँकेच्या व्यवहारांशी कोणताही संबंध नाही. शरद पवार यांचा कोणताही संबंध बँकेशी नाही. तरीही त्याचे नाव घेण्यात येत होते. महत्वाच्या पदांवर शरद पवारांमुळे पोचलो,मी अस्वस्थ झालो, माझ्यामुळे साहेबांंना त्रास सहन करावा लागतो. शरद पवार यांचे नाहक नाव आल्यामुळे व्यथित झालो. या वयात शरद पवार यांना त्रास झाला. हा त्रास सहन न झाल्यामुळे राजीनामा, हे प्रकरण निवडणुकीच्या काळात कसे काय बाहेर काढले जाते? एवढी वर्षे सरकारने कारवाई का केली नाही? अजित पवार यांचा सवाल, अजित पवार हे नाव सहकारी बँक घोटाळ्यात नसते तर हे प्रकरण एवढं मोठे झाले नसते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते.
……………………………………….

आमचे चॅनल subscribe करा