Advertisements

(२१ मार्च जागतिक वन दिन विशेष(भाग-१)

नागपूर,ता.२४ मार्च २०२६: गेल्या वर्षी ८ डिसेंबर २०२५ रोजी एक बातमी प्रसिद्ध झाली होती,जागतिक वननिधीचे निरीक्षकपद भारताकडे….!‘वैश्विक तापमानवाढीला पायबंद घालण्यासाठी झालेल्या पॅरिस कराराला काही दशके उलटून गेली तरीसुद्धा याबाबतची जगभरातील देशांची कटिबद्धता ही कमीच असल्याचे दिसून येते’,असे निरिक्षण ब्राझाीलच्या बेलेम शहरात राजदूत दिनेश भाटिया यांनी भारताच्यावतीने भूमिका मांडली.उष्णकटिबंधीय जंगलांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी ब्राझीलच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या नव्या वैश्विक निधीचा निरीक्षक म्हणून भारत काम करणार आहे….!
याच वर्षी भारतात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २९ ऑगस्ट २०२५ रोजी ‘एन्वायरमेंट ऑडिट रुल्स,२०२५’ही नवी नियमावली लागू केली.या मागे सुशासन राबवणे आणि भारतात व्यवसाय-सुलभता आणणे अशा महान उद्दिष्टांनी हे धाेरण स्वीकारण्यात आले मात्र,उद्योगांवर प्रगाढ विश्वास दाखवणारे व पर्यावरणरक्षणाचा प्रश्नच मिटवण्यात आल्याची केंद्र सरकारच्या या धोरणावर पर्यावरणवाद्यांनी टिका केली.केंद्र सरकारचे हे धोरण वरकरणी कितीही नि:स्पृह,उद्योगांना विविध पर्यावरणीय नियम पाळायला लावणारी वाटत असली तरी,हे धोरण केंद्र सरकारचे निसर्ग-पर्यावरणाप्रतीचे धोरण स्पष्ट करतो.
आजवर विविध औद्योगिक प्रकल्प पर्यावरणीय नियम पाळत आहेत की नाही हे पाहण्याचे काम केंद्रीय व राज्य प्रदुषण मंडळे आणि संबंधित मंत्रालयाची स्थानिक कार्यालये करीत असत.सरकारच्या म्हणण्यानुसार या सर्वच यंत्रणांवर अपुरे मनुष्यबळ,पुरेशा आस्थापना नसणे,क्षमता आणि संसाधने यांची कमतरता आदी गोष्टींचा ताण येतो आहे.औद्योगिक प्रकल्पांच्या मूल्यांकनास त्यामुळे त्या असमर्थ ठरताहेत.यावर उपाय म्हणून नव्या नियमावलीनुसार आता हे काम ‘खासगी’संस्थांकडे देण्याचे ठरले आहे!अशा खासगी संस्था किंवा व्यक्ति आताप्रमाणे जसे सनदी लेखापाल असतात,त्यांप्रमाणे नोंदणीकृत खासगी पर्यावरणीय लेखापरीक्षक म्हणून नोंदणी करु शकतील व विविध प्रकल्प,पर्यावरणीय नियमांचे पालन करत आहेत की नाहीत,तसेच प्रदुषण टाळण्यासाठी,ते नियंत्रित्र करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी सर्वोत्तम मार्ग स्वीकारला जात आहे की नाही याचे लेखापरीक्षण करु शकतील.
सर्वात म्हत्वाचे म्हणजे हे लेखापरीक्षक उद्योगांकडून ग्रीन क्रेडिट नियम,वेस्ट मेनेजमेंट नियम,ई-वेस्ट नियम,प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट नियम याचे ऑडिट करतील तसेच विविध उत्सर्जने,सांडपाणी आणि कच-याचे नमुने गोळा करणे,त्याचे विश्लेषण करने,नुकसानभरपाईची रक्कम ठरवणे यासोबतच विविध पर्यावरणीय आणि वन-विषयक(इथेच खरी मेख आहे)नियमांची अंमलबजावणी कशी हाेते आहे,हे ते तपासतील!हे लेखापरीक्षक एकतर त्यांच्या पूर्वानुभावचा विचार करुन किंवा राष्ट्रीय प्रमाणनपरीक्षेतून निवडले जातील.या कामाचा ‘पूर्वानुभव’हाच मोठा विनोद आहे.
या धोरणानुसार केंद्र व राज्य प्रदूषण मंडळे आणि पर्यावरण मंत्रालयाची स्थानिक कार्यालये,हे सर्व जेव्हा’जसे लागेल तसे आणि तेव्हा(म्हणजे नेमके केव्हा?)आपले काम चालूच ठेवतील आणि पर्यावरण मंत्रालयाला नियमांची अंमलबजावणी होते आहे ना,यावर देखरेख करण्यात मदत करतील,अशी केंद्र सरकारची ही नवी नियमावली सांगते.याचा अर्थ देशाच्या पर्यावरण संरक्षणासाठी आधीपासून अस्तित्वात असलेल्या यंत्रणाना शक्तीहीन करुन उद्योगपतींचे हित,हेच एकमेव या धोरणाचे उद्दिष्ट असल्याचे लक्षात येतं.
केंद्राची हि ‘एन्वाायरमेंट ऑडिट डेसिमेंट एजन्सी‘(ईडीए),वने,पर्यावरण,हवामान मंत्रालय,जी गेल्या बारा वर्षांपासून उद्योग खात्याचे बटिक म्हणूनच अस्तित्वात आहेत,याशिवाय पर्यावरण मंत्रालयातील एक अतिरिक्त सचिव जिचा अध्यक्ष असेल अशी एक सुकाणू समिती गठीत करण्यात आली असून यामध्ये इतर संबंधित संस्थांचे,यंत्रणांचे प्रतिनिधीही असतील.ही समिती एकूण प्रगतीवर देखभाल करेल,अंमलबजावणीतील आव्हानांवर उत्तरे शोधेल आणि जिथे गरज आहे तिथे दुरुसत्याही सूचवेल.महत्वाचे म्हणजे ‘पूर्वानुभवाच्या’पर्यायामुळे एखाद्या व्यक्तिीला ’तात्पुरते’लेखापरीक्षकाच्या पदावरही बसवता येईल.केंद्र सरकारची हीच ती ‘फाईन प्रिंट’.एक अत्यंत महत्वाची करुन ठेवलेली सोय(पळवाट).म्हणजे लेखापरीक्षकाने केलेल्या ऑडिटसंबंधी कोणताही वाद
उत्पन्न झाल्यास त्याबद्दल नेमलेल्या सरकारी अधिका-याचा अहवाल हा ‘अंतिम’असेल.म्हणजे काय निकाल लागणार हे उघडच आहे.
आजवर भारतातील उद्योगमार्तंडांनी,आस्थापनांनी निसर्ग-पर्यावरण कसे आणि किती ओरबडले आहे,याचा हिशेब स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षात देखील पूर्ण होऊ शकत नाही.तरी देखील केंद्र सरकारचा म्हणजे मोदी सरकारचा अश्यांवरच इतका प्रगाढ विश्वास?ज्या जागतिक संस्थेने व्यवसायसुलभतेचे प्रमाणपत्र आपल्याला दिले,त्याच संस्थेने पर्यावरणीय कुशासनाबद्दल भारताचे वाभाडेही काढले,हा इतिहास जुना नाही.
त्यामुळे अस्तित्वात असणा-या यंत्रणा खिळखिल्या करत जाऊन,सोयिस्कर माणसे नेमून त्यांच्याद्वारा उरलासुरला भवताल संपवण्याचा मोदी सरकारचा हा प्रयत्न असा आरोप पर्यावरणवादी करतात तर त्यांना दोष देता येणार नाही.जर सरकारच्या म्हणण्यानुसार ह्या सर्व अस्तित्वात असलेल्या यंत्रणांवर अपुरे मनुष्यबळ,पुरेशा आस्थापना नसणे,क्षमता आणि संसाधने ह्यांची कमतरता आदि गोष्टींचा प्रचंड ताण येत असेल तर त्यांचेच सक्षमीरकण करणे केंद्र सरकारला का जड गेले?मूळात ही नवी यंत्रणा उभी करण्यासाठी लागणारा पैसा जुनीच यंत्रणा सक्षम करण्यासाठी उपयोगी पडली नसती का?
२०४७ मध्ये ‘विश्वगुरु‘ होण्याची वल्गना करणा-या भारतातील एकूण अर्थसंकल्पनेत ०.१ टक्का सुद्धा निधी पर्यावरणासाठी राखीव नसतो.‘पर्यावरणीय आयएसओ १४००० सल्लागार’ या नावाखाली कोण लोक काय करीत आहेत यावर तर अख्खे संशोधन होऊ शकतं.मग हे नव निर्वाचित लेखापरीक्षक पर्यावरणासाठी काय काम करणार आहेत,याचीही प्रचिती येते.ते कोणाच्या दावणीला बांधलेले असणार,हे कळणे अवघड नाही.तात्पुरते लेखापरीक्षक म्हणजे,आवडत्या उद्योजगांसाठी सोयीस्कर पळवाट असून त्या काही विशिष्ट उद्योग समूहांबाबत ‘सबुरीने घ्या’,केसेस दाखलच करु नका अशा सूचना प्रत्यक्ष,’नॅशनल ग्रीन ट्रायब्यूनला’,’दिल्लीवरुनच’ दिल्या जाण्याचे हे दिवस आहेतच.
एखाद्या औद्योगिक प्रकल्प उभा करतांना १२ वर्षांपूर्वी म्हणजेच मोदी सरकार येण्यापूर्वी सर्वात विश्वसनीय प्रक्रिया होती ,ती म्हणजे पर्यावरण आघात पडताळणी(ईआयए)प्रक्रिया.२०२० च्या पूर्वार्धात पर्यावरण पडताळणी नियम अमूलाग्र बदलण्यासाठी ‘ईआय-२०२०’विधेयक प्रस्तावित करण्यात आले.त्याला देशभर विरोध झाला,व ते मसुदा स्वरुपातच राहीले.त्यातल्या एकेक दुरुस्त्या संसदेत मांडण्याऐवजी ‘अध्यादेश’काढून सरकारनेही पडताळणी प्रक्रिया २०२५ पर्यंत जवळपास मोडीत काढली.गोरगरीब,बाधित जनतेला ‘ईआयए’ हा शेवटचा आधार हाेता.पर्यावरण खात्याच्या अहवालानुसार २०१८ ते २०२३ या काळात मूळ २००६ च्या ‘ईआयए’कायद्यात ‘ऑफिस मेमोरंडम’काढून केंद्र सरकारने तब्बल ११० बदल केले आहेत….!कोणाच्या हितासाठी?जनतेच्या?कि लाडक्या उद्योगपतींच्या?मोदी सरकारच्या या नव्या नियमातील एक ही नियम पर्यावरण हिताचा नसून मोदी सरकारची ही नवीन नियमावली म्हणजे चोराच्याच हातात जामदारखान्याच्या किल्ल्या देण्याचा प्रकार आहे….!
२०२३ च्या वन कायद्यातील सुधारणे विरोधात पर्यावरणवाद्यांनी दाखल केलेल्या अनेक याचिकांवर तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई व न्या के.विनाद चंद्रन यांच्या खंडपीठा समोर सुनावणी झाली.’वनक्षेत्रांची हानि होईल अशी कोणतीही कृती करण्यास आम्ही परवानगी देणार नाही,तसेच पुढील आदेश येेईपर्यंत वनक्षेत्रावर गदा येईल,असे कोणतेही पाऊल केंद्र सरकार व राज्यांनी उचलू नये,असे खंडपीठाने नमूद केले.१७ मार्च २०२३ रोजी मोदी सरकारने वन(संवर्धन)सुधारणा विधेयक आणले होते.
२०२३ च्या सुधारित वनसंरक्षण कायद्यांतर्गत ‘वन’या व्याख्येनुसार वन या कक्षेतून सुमारे १.९९ लाख चौरस किमी वनजमीन वगळली जाते आणि ती अन्य गोष्टींसाठी उपलब्ध करण्यात आली,असा दावा याचिकाकर्त्यांनी केला.त्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली.केंद्र सरकारला म्हणजे पर्यायाने मोदी सरकारला या वनांमध्ये प्राणि संग्रहालये तसेच सफारी सुरु करण्यासाठीच्या प्रस्तावास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल,असे खंडपीठाने म्हटले होते.याशिवाय केंद्र व राज्याने ३१ मार्च २०२४ पूर्वी आपापल्या कार्यक्षेत्रातील वनजनिमीचा तपशील देण्याचे आदेशही दिले होते.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे दिल्या जाणा-या ‘जंगलासारखे क्षेत्र,अवर्गीकृत आणि सामुदायिक वनजमीन‘यासंबंधीचे सर्व तपशील पर्यावरण,वन आणि हवामानबद्दल मंत्रालये त्यांच्या वेबसाईट्सवर १५ एप्रिल २०२५ पर्यंत टाकतील असे न्यायालयाने २०२४ मध्येच नमूद केले होते.हा कायदा रद्दबातल करण्याची मागणी याचिकांद्वारे करण्यात आली होती.
याच पंतप्रधान मोदींनी,‘पर्यावरण बदलामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत.अशा स्थितीत धरणी मातेला वाचविण्यासाइी प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड अवश्य लावावे’,असे आवाहन ३१ जून २०२४ च्या ‘मन की बात’मध्ये केले होते!याशिवाय सन २०२८ मध्ये होणारी संयुक्त राष्ट्रांची हवामानविषयक परिषद भारतामध्ये घेण्याचा प्रस्ताव दुबई येथे पार पडलेल्या जागतिक हवामान परिषदेत दिला आहे.या परिषदेत,नागरिकांच्या सहभागातून वृक्षारोपण करुन,वातावरणातील कार्बन शोषणारी केंद्रे तयार करणा-या ‘ग्रीन क्रेडिट’ उपक्रमाचाही घोषणा त्यांनी केली!भारताने विकास व पर्यावरण संवर्धनाचा आदर्श जगासमोर ठेवला आहे.जागतिक तापमान वाढ १.५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवण्याचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या मार्गावर असलेल्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो असे सांगून,सर्वांनी पर्यावरणस्नेही जीवनशैली स्वीकारायला हवी.आपल्या पृथ्वीला पोषक असणा-या जीवनपद्धती सर्व देशांनी स्वीकारायला हवी व उपभोगवादी जीवनशैली सोडून द्यायला हवी,’असे आवाहन ही त्यांनी या परिषदेत केले.मात्र,भारतासाठी पर्यावरण संवर्धनातील त्यांची धोरणे पूर्णपणे विसंगत व उद्योगस्नेही आढळतात,हे विशेष.
याशिवाय केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा आणखी एक निर्णय अतिशय बोलका आहे.प्रदूषित भाग,अभयारण्य किंवा आंतरराष्ट्रीय सीमा जवळ असेल तर मोठ्या बांधकाम प्रकल्पांना आता लागणारे पर्यावरण खात्याचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’केंद्रा ऐवजी राज्य सरकारअंतर्गत समिती देणार,अशी माहिती अध्यादेशानुसार जाहीर करण्यात आली.यासाठी बांधकाम व्यवसायिकांची शिखर संघटना ‘क्रेडाई’ने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.वीस हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या आकाराचे बांधकाम प्रकल्प प्रदुषित भागांत असतील,तर तेथील आणि पाच किलोमीटरच्या परिसरातील प्रकल्पांची मंजुरी पर्यावरण ‘ना हरकत‘ प्रमाणपत्रावर अवलंबून असते.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा प्रदुषण निर्देशांक ६० पेक्षा कमी असूनही पिंपरी-चिंचवड आणि सीमावर्ती भागांतील पाच किलोमीटरचा समावेश प्रदूषित क्षेत्रात झाला होता.राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मोजणीनुसार प्रदूषण निर्देशांक हा ३४ ते ४६ दरम्यान आहे.तरीही पिंपरी-चिंचवडचा समावेश प्रदूषित शहरात झाल्याने तेथील बांधकाम प्रकल्पांची मंजूरी रखडली होती.नवी मुंबई,मुंबईत अभयारण्ये असल्यामुळे तेथेही मंजुरीवर मर्यादा आल्याने क्रेडाई न्यायालयात गेली होती.
महत्वाचे म्हणजे,डिसेंबर २०२४ मध्ये देशातील वनाच्छादनाची आकडेवारी सांगणारा ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिर्पोट-२०२३’प्रसिद्ध केला होता.पृथ्वीवरचा कर्बठसा कमी करण्यासाठी ठरलेल्या उद्दिष्टांचा निराळा ताण वनवृद्धी आणि वन व्यवस्थापनावर आहे.त्यामुळे,असे अहवाल प्रकाशित होतात,तेव्हा त्यांचा मुख्य रोख भारताकडे लक्ष ठेवून असणा-या जागतिक संस्था,स्वयंसेवी संस्था किंवा जगाला प्रमाणपत्रे वाटणा-या बलाढ्य शक्ती यांचे समाधान करण्यावर असतो.मात्र,या अहवालांकडे बारकाईने पाहिले तर त्यातील अनेक गफलती किंवा असमाधान लक्षात येतं.या अहवालात ,भारतातील एकूण वनाच्छादानाची टक्केवारी २५ च्या वर गेली आहे,असे नमूद करण्यात आले….!राजीव गांधी पंतप्रधान असताना १९८८ मध्ये राष्ट्रीय वन धोरण जाहीर झाले,तेव्हा एकूण भूभागाच्या २५ टक्के वनाच्छादन असावे,असे म्हटले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात २०१८ मध्ये अधिक व्यापक असे नवे राष्ट्रीय वन धोरण आले.त्यात शहरी वनसंपदा वाढवणे,वनवृद्धीसाठी खासगी संस्थांचे साह्य,तंत्रज्ञानाची मदत आणि ईशान्यकडील जंगलांकडे खास लक्ष आदि कलमे आहेत.मात्र,भारताची विकासाची घोडदौड आणि वनसंपदेचे रक्षण यात मूलभूत अंतर्विरोध आहे.
वृक्षलागवड किंवा वनीकरणाच्या मोहिमा यातून वनाच्छादन वाढते.मात्र,झाडांबाबत नगाला नग असे करुन चालत नाही.किंबहूना,जंगलातील प्रत्येक वृक्ष हा विशाल नैसर्गिक परिसंस्थेतील एक जैविक घटक असतो आणि ही सारी परिसंस्था परपस्परानुकूल तसेच परस्परावलंबी असते.त्यामुळेच देशातील वनाच्छादन वाढत असतानाच घनदाट जंगलांचे प्रमाण कमी होणे, ही खरी चिंतेची बाब आहे.जंगलातील एक वटवृक्ष धरातीर्थी पडणे आणि त्या बदल्यात कुठे तरी बरड जमिनीवर एक झाड लावणे,यात मोठा गुणात्मक फरक असतो.
महाराष्ट्राचा विचार केला तर चंद्रपूर हा राज्यातील उत्तम वने असणारा दुस-या क्रमांकाचा वनाच्छादित जिल्हा आहे.मात्र,तिथे ज्या प्रमाणात विविध खाणींसाठी एकूण जंगल कमी झाले,त्यापेक्षा अधिक प्रमाणात घनदाट जंगल कमी झाले आहे,परिणामी चंद्रपूर हा भारतातील सर्वाधिक उष्ण व प्रदूषित शहरांच्या रांगेत पोहोचला.सर्वात चिंतेची बाब म्हणजे जंगलाच्या एकूण क्षेत्रफळाच्या बाबतीत छत्तीसगड आणि ओडिसासारखी लहान राज्येही महाराष्ट्राच्या पुढे आहेत.इतकंच नव्हे तर गडचिरोलीसारख्या भागातील विशाल घनदाट जंगले आणि डोंगर विविध प्रकल्पांसाठी नष्ट होत आहेत.घनदाट जंगलेच नव्हे तर झुडपी जंगले आणि कांदळवनेही देखील खूप महत्वाची असतात,ती कसोशीने राखायची असतात.परंतू,ठाणे परिसरात ९३ हेक्टर कांदळवने नष्ट झाल्याचे अलीकडेच आढळले….!

(छायाचित्र : महाराष्ट्राचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार,जे चंद्रपूरचे आमदार आहेत ज्यांनी ३३ कोटी वृक्षारोपणाची लोकप्रिय घोषणा केली होती.यासाठी बजेटमध्ये प्रावधान केले होते मात्र,स्वत:च्याच मंत्रीपदाचा काळात चंद्रपूरच्या घनदाट जंगलाचा -हास थांबविण्यास असक्षम ठरले!आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच जागतिक वन दिनी ३०० कोटी झाडे लावणार असल्याची घोषणा केली आहे!)
निसर्गाशी ही क्रूर थट्टा आणि बहूमुखी -हास आणि तोटा केवळ कुठेही रोपलागवडीच्या मोहिमा उघडून भरुन निघणारा नाही.महाराष्ट्राने आता तरी राज्यातील असंख्य जातीच्या वृक्षांची वनराजी,पक्षी,प्राणी,जलचर आणि डोंगरांचा एकत्रित विचार केला नाही तर,केवळ झाडांच्या वाढत्या संख्येने परिसंस्थेची होणारी हानि कधीही भरुन निघणार नाही.सरकारी अहवाल आणि आकडेवारींचे गणित निसर्गाचे कमीत कमी नुकसानीचे चित्र उत्तमरित्या रेखाटत असली तरी..सर्वार्थाने असे सरकारी अहवाल मानव जातीच्या दिर्घकालीन हिताचे नाहीत,हे सरकारी अहवालाने पुन्हा ठलकपणे अधोरेखित केले आहे….!
(वाचा जागतिक वन दिन भाग-२ मध्ये तत्कालीन महसूलमंत्र्यांनीच दिली वनजमीन बिल्डरच्या घश्यात)
………………………………………………
Advertisements

Advertisements

Advertisements
