

विकसित भारताच्या अमृतकाळातील सेवा,सुशासन,गरीब कल्याणाच्या पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षातील योजनांची देणार नागपूरकरांना माहिती
१२ जून पासून भाजपतर्फे विविध कार्यक्रम होणार सादर: २५ जून आणिबाणिच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमांची सांगता
भाजप शहराध्यक्ष व माजी महापौर दयाशंकर तिवारी यांची पत्रकार परिषदेत माहिती
नागपूर,ता.१० जून २०२५: राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणूकीचे बिगूल वाजले असून आज महाराष्ट्र शासनातर्फे महानगरपालिकांंच्या प्रभाग रचना बाबतचे आदेश निर्गमित झाले.येत्या सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान निवडणूकांची घोषणा निवडणूक आयोगातर्फे होण्याची शक्यता आहे.याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षातर्फे प्रचाराची मुहूर्तमेढ आज हॉटेल सेंटर पॉईंट रामदासपेठ येथे आयोजित पत्रकार परिषदेतून झाली.येत्या १२ जून ते २५ जूनपर्यंत भाजपतर्फे विविधस्तरावर होणा-या कार्यक्रमांची माहिती भाजपचे नागपूर शहराध्यक्ष व माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली.
सुरवातीलाच काँग्रेस पक्षावर प्रहार करीत देशावर या पक्षाने ६० वर्षांपेक्षा अधिक काळ राज्य केले मात्र,’गरीबी हटाव‘चा नारा देत केंद्राची सत्ता हस्तगत करीत राहील्यानंतर देखील देशातील गरीबांची संख्या कमी झाली नाही उलट त्यात उत्तरोत्तर वाढ होत गेली,अशी टिका त्यांनी केली.दूसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात २६ कोटीपेक्षा जास्त नागरिकांचे जीवनमान सुधारले असा दावा त्यांनी केला.वीज,पाणी,सुलभ शौचालये,पंतप्रधान आवास योजना,राेजगार यासारख्या गरीबांच्या मुलभूत गरजा मोदी यांच्या कार्यकाळातच पूर्ण होऊ शकल्या,असे कौतूक त्यांनी केले.
देशातील महिलांसाठी,तरुणाईसाठी मोदी यांनी मग ते कोणत्याही जाती किवा समाजाचे असो त्यांच्या सामाजिक उत्कर्षासाठी अनेक योजना मोदी यांनी राबवल्या,त्या योजना घरोघरी पोहोचवल्या.प्रशासकीय पातळीवरील भ्रष्टाचाराची साखळी खंडित करुन लाभार्थ्यांना सरळ त्यांच्या बँक खात्यात लाभ मिळू लागला.
मोदी यांची देश-विदेशातील ११ वर्षांची कारर्कीद नागपूरकर जनतेसमोर मांडण्यासाठी भाजपतर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.‘विकसित भारत का अमृतकाल-सेवा,सुशासन,गरीब कल्याण के ११ साल बेमिसाल’या शीर्षकाखाली सर्वात पहीला कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १२ जून रोजी हॉटेल सेंटर पॉईंट येथे पत्रकार परिषद घेऊन होईल.यानंतर नागपूर महानगर संघटनेअंतर्गत सहा विधानसभा क्षेत्रातील २० मंडळ जे कार्यरत आहेत त्यातील प्रत्येक मंडळ हे जनतेमध्ये जाऊन १० जनसंवाद सभा आयोजित करतील.या २०० सभेच्या माध्यमातून घरोघरी मोदी यांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळातील कामगिरी पोहोचवली जाईल.
या २० मंडळामध्ये ‘संकल्प से सिद्धी तक’या विषयावर २० मोठ्या सभा घेतल्या जातील,या सभांमध्ये केंद्र,राज्य तसेच नागपूर महानगरपालिकेद्वारा केलेल्या जनकल्याणाच्या योजना नागरिकांसमोर मांडल्या जातील.
नागपूर शहरातील विधी क्षेत्रातील अधिवक्तांचे संमेलन होईल ज्यामध्ये मोदी यांनी विधी क्षेत्रात दिलेले योगदान यावर सकारात्मक चर्चा केली जाईल तसेच न्यायालय परिसरात केलेले बांधकाम व उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा यांचा देखील उहापोह केला जाईल.
शहरातील चार्टेड अकाऊंट,कंपनी सेक्रेटरी व फायनान्सच्या क्षेत्रात कार्यरत कन्सलटंट यांचे संमेलन पार पडेल व यामध्ये मोदी यांची आर्थिक नीती यावर सकारात्मक चर्चा पार पडेल.
केंद्र सरकारने शैक्षणिक क्षेत्रात केलेले सुधार व धोरणे यावर नागपूर शहरातील शिक्षकांचे संमेलन देखील पार पडेल.याशिवाय ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची तरुणाई यांना जे स्वालंबन व आर्थिक विकासाचे द्वार केंद्राच्या योजनांनी उघडले अश्या यशस्वी श्रमजीवींचे देखील संमेलन भरवले जाईल,अशी माहिती दयाशंकर तिवारी यांनी दिली.
भाजपच्या नागपूर महानगर आयटी सेलच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या प्रगतीवर प्रकाश टाकण्यासाठी ‘डिजिटल मिडीया स्पर्धे’चे देखील आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत रचनात्मक रिल्स,ब्लॉग,लघुचित्रफितीचे सादरीकरण स्पर्धा होईल.१२ जून रोजी या स्पर्धेसाठी,स्पर्धकांनी नाव नोंदणी करावी.२४ जून पूर्वी त्यांनी आपली रचना जमा करावी,असे आवाहन त्यांनी केले.या स्पर्धेविषयीची माहिती bjpnagpur.in यावर उपलब्ध राहील.या स्पर्धेत प्रत्येक गटासाठी आकर्षक पारितोषिक दिले जाईल.





आमचे चॅनल subscribe करा
