Homeनागपूर न्यूजकाळे सोने....

काळे सोने….

पाकिस्तानचा स्वातंत्र दिन साजरा करणा-यांचा नागपूरात कौतूक सोहळा!

नागपूर,ता.२ मार्च २०२४: सोने ही समाजात प्रतिष्ठा वाढवणारी वस्तू मानली जाते.धातूरुप सोन्यावर भारतीयांचा विशेषत: महिलांचा भावनारुपी जीव जडला असतो.अश्‍या या सोन्याची फार मोठी बाजारपेठ देशातच नव्हे तर जगात आढळते. अशाच एका नव्या ब्रॅण्डच्या सोन्याच्या शो रुमचे उद् घाटन नागपूरात झाले मात्र,झळाणा-या,लखलखीत,पिवळ्या धमक सोन्या मागे एक खुरापती,धोकादायक,राष्ट्रद्रोही मानसिकताही असू शकते,याची जाणीव भलेभले ही करु शकत नाही.

सोशल मिडयावर अजून ही काही माहिती अपलोड आहे जी देशावर नितांत प्रेम करणा-यांना अस्वस्थ करते.केरळ….भारतातील एक राज्य,या राज्यात वामपंथियांचाच एकछत्री कारभार, विवेक अग्निहोत्री या दिग्दर्शकाचा ‘द केरळ स्टोरी’नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि संपूर्ण जगभरच या चित्रपटाने वाद-प्रतिवादाचे वादळ उठवले होते.

त्याच केरळमधील या सोन्याच्या बादशाहाचे मूळ वास्तव्य.संपूर्ण देशभरात जवळपास सर्वच शहरात त्याचे शो रुम.व्यवसाय करने हा भाग अलहिदा,व्यवसायातून ५० हजार कोटींचा वार्षिक टर्नओवर असणे यात ही काहीच आक्षेप नाही मात्र,केरळसारख्या राज्यातील एका लहानशा शहरात १४ ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्रय दिन खुलेआम साजरा करने ते ही तोंड गोड करुन,केक कापून ही निदान भारतीयांसाठी तरी खूप निषेधार्ह्य बाब आहे.याचे समर्थन भारतातील सच्ची मुस्लिम कौमच करणार नाही.

या घटनेचे वृत्त संपूर्ण पुराव्यानिशी देशातील एका हिंदी वृत्त वाहीनीने प्रसारित केले.मात्र,या लखलखत्या बादशाहाने उलट त्या वृत्त वाहीनीच्या मालकाच्या विरोधात केरळमधील लहानश्‍या शहरातील सत्र न्यायालयात मानहानिची केस दाखल केली!जीवाला भिती असल्याचे सांगत, वृत्त वाहीनीच्या मालकाने ती केस दिल्लीतील न्यायालयात सुनावणीसाठी न्यायालयात अर्ज केला आहे.देशभरातील शो रुम्समध्ये त्याच धर्मातील मुलांची आणि हिंदू मुलींची भर्ती यावर भर देत ‘लव्ह जिहाद‘ची संकल्पना मांडण्यात आली होती,असे सांगण्यात येते.

येथे प्रश्‍न देशभक्तीचाही नाही,मुल्यांचा आहे,नीतीमत्तेचा आहे आणि या शोरुमच्या उद् घाटनासाठी जे मान्यवर उपस्थित होते ते देखील महाराष्ट्राच्या फार मोठ्या प्रचार-प्रसार माध्यमाशीच निगडीत होते.त्यांनीच उद् घाटनपर भाषणात ज्या शब्दात साखरपेरणी केली,या ब्रॅण्डच्या यशस्वीतेमध्ये मालकाच्या जीवनातील नीतीमत्ता(एथिक्स)वर लेक्चर झाडले,ते ऐकून खासगीत चर्चा झडली नसती तर नवलच असतं.

या ब्रॅण्डच्या जाहीराती त्या उद् घाटकाच्याही वृत्तपत्रात पानभरुन झळकल्या होत्या.सर्वच वृत्तपत्रांचे पहीले पान त्याच्या जाहीरातीने झळाळले (की झाकोळले)होते.५० हजार कोटींचा टर्नओवर असणा-यांसाठी पाच-१० कोटींच्या जाहीरातीने फरक पडत नाही मात्र,या जाहीरातींची किमया ही दुस-या दिवशीच्या बातमीत उमटत असते जी…. वाचकांच्या मनोवृत्तीवर विश्‍वासाची जी पेरणी करते ती पत्रकारितेसाठी सर्वाधिक घातक ठरत असते.

ज्या सार्वभौम आणि संवैधानिक देशात पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन उजळ माथ्याने साजरा होत असेल,जो हे करीत असेल त्याच्या ‘एथिक्स’ विषयी भरभरुन बोलणा-याने तर कमरेचं सोडून दिलं असेलही मात्र,ऐकणा-यांच्या मनात राग आणि संतापाच्या भावनेशिवाय दूसरी भावना उमटू शकली नाही….!

योगायोग म्हणजे,ज्या दिवशी या ज्वेलरी शो रुमचे उद् घाटन झाले त्याच सकाळी एका माऊलीचा फोन ‘सत्ताधीश’ला खणाणला.तिचा एकूलता एक मुलगा नेव्हीमध्ये मोठा अधिकारी झाला होता.या मागे तिच्या मुलाने सामान्य माणूस कल्पना ही करु शकत नाही इतक्या खडतर शारीरिक परिक्षा दिल्या होत्या.त्याचे लहानपणापासूनच ध्येय नेव्हीमध्ये जाऊन देशसेवा करण्याचे होते.करोनासारख्या महाभंयकर विषाणूच्या संक्रमणात त्याचे वडील पहील्याच लाटेत सापडले आणि २०२० मध्ये मृत्यू पावले.देशात संक्रमण व आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा लागू असल्याने करोना बाधित रुग्णांना रुग्णालयातूनच स्मशान घाटावर घेऊन जात होते,त्याच्या वडीलांच्या पार्थिवाला देखील नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी गाडीत टाकून श्‍मशान घाटावर घेऊन गेले,पत्नी पीपीई किट घालून उधवस्त नजरेने आयुष्याच्या जोडीदाराच्या निपचित पार्थिवाकडे बघत राहीली,स्पर्श ही वर्ज्य होता,मनपाचे कर्मचा-यांनी फक्त चेहरा उघडून दाखवला आणि पुन्हा झाकून घेतला.. एकुलता एक मुलगा हाच तिचा धीर होता,जगण्याचे प्रयोजन होता,त्यावेळी तो फक्त २१ वर्षांचा होता.आज चार वर्षांनी वयाच्या २५ व्या वर्षी तो देशसेवेसाठी तत्पर झाला आहे.

यासाठी त्याला आईला सोडून ट्रेनिंगसाठी जावे लागले.ट्रेनिंग पूर्ण होईपर्यंत मोबाईलसुद्धा जवानांना दिल्या जात नाही.फक्त शरीरानेच नव्हे तर मनाने देखील कठोर होण्याचे पहीले शिक्षण त्यांना अशारितीने दिले जाते.आईने त्याच्याशी न बोलता संपूर्ण ट्रेनिंगचा एवढा प्रदीर्घ काळ कसा काढला,याची जाणीव एक आईच करु शकते.आता त्याची ट्रेनिंग पूर्ण होऊन येत्या ८ मार्च रोजी सैन्याच्या पासिंग आऊट परेडच्या( पीओपी) सोहळ्यात त्याच्या आईच्या हाताने सिल्वर स्टार त्याच्या यूनिफॉर्मवर लावण्यात येणार आहे.शब्दात ओसंडून वाहणा-या त्या आनंदात त्या जवानाच्या आईचे मन आधीच आपल्या पिलाकडे पोहोचले आहे.

पुढे त्या जवानाला बंकर मध्ये राहायचे आहे.१२५ जवानांची जवाबदारी अवघ्या २५ वर्षीय या नागपूरकर मुलाकडे आहे. युद्ध प्रसंगी किवा संकटात आपल्या अधिका-यासाठी जीव का द्यायचा?याचे उत्तर १२५ जवानांच्या सहवासात त्या तरुणाला मिळवायचे आहे,त्यांच्या सुख दु:खाशी एकरुप होऊन त्यांना ही कर्तव्य भावना शिकवण्याची जवाबदारी त्या तरुणावर आहे.आता आयुष्यभर या आईचे काळीज अभिमानासोबतच ‘काळजीने’देखील पोखरलेले असणार,हे वेगळे सांगायला नको.या देशात अश्‍या माता आहेत जे पतीच्या निधनानंतर ही एकुलत्या एक मुलाची सैन्यात जाऊन देशसेवा करण्याची ईच्छा पूर्ण करतात,अशा देशावर कधीही गंडांतर येऊ शकत नाही मात्र,भारतात राहून पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा करणा-या धनादांडग्यांची बहाद्दूरी बघितली,सोन्याच्या झळाळीवर भारुन माध्यम सम्राटाची साखरपेरणी ऐकली, मंत्र्यानेच येऊन उद् घाटनाची फित कापतानाचे दृष्य बघायला मिळाले तर…अशा सोन्याला ‘’काळे सोनेच ‘म्हणावे लागेल,यात शंका नाही…..!
……………………………

Latest बातम्या