फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमनुष्याला खरा मनुष्य बनण्याचे साधन सेवेतून : डॉ. मोहनजी भागवत

मनुष्याला खरा मनुष्य बनण्याचे साधन सेवेतून : डॉ. मोहनजी भागवत

Advertisements

 सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते सायंकालीन भरड धान्य थाळीचे लोकार्पण

 आपुलकी जपत, निस्वार्थ सेवेचा दिला संदेश

 दीनदयाल थाळीच्या पाच वर्षपूर्ती निमित्त ‘कृतज्ञता’ सोहळा संपन्न

नागपूर,ता.२५ एप्रिल २०२३: निस्वार्थी भावनेने समाजासाठी काहीतरी करावे ही भावना मनात बाळगणारा म्हणजे मनुष्य, अशाच मनुष्याला खरा मनुष्य असण्याचे साधन हे त्यांच्यातील सेवाभावी वृत्ती आणि त्याने केलेल्या सेवाकार्यामुळेच मिळते. आपुलकी भावना ही सेवेसाठी अत्यंत महत्वाची असते, त्यामुळे आपुलकी जपत निस्वार्थपणे सेवा करावी असे मार्गदर्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  सरसंघचालक  डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. ते दीनदयाल थाळीच्या पाच वर्षपूर्ती निमित्त आयोजित ‘कृतज्ञता’ सोहळ्यात बोलत होते.
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील श्री सिद्धिविनायक मंदिरात सुखकर्ता दु:खहर्ता विनायकाकडून मांगल्याची प्रेरणा घेऊन स्थापन झालेल्या श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनद्वारे गेली कित्येक वर्षे अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या राबविले जात आहेत. याच उपक्रमाचा एक भाग असलेल्या  मेडिकल कॉलेज परिसरात असलेल्या दीनदयाल थाळी उपक्रमाच्या पाच वर्षपूर्तिच्या निमित्ताने मंगळवारी कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते सायंकालीन भरड अन्न थाळीचे लोकार्पण करण्यात आले.

कार्यक्रमात श्री सिध्दीविनायक सेवा फाऊंडेशन नागपूर व दीनदयाळ थाळी संचालन समितीचे अध्यक्ष संदीप जोशी, आमदार मोहन मते, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता  डॉ. राज गजभिये,  पराग सराफ, यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सायंकालीन भरड अन्न थाळीचे लोकार्पण सोहळ्यात मार्गदर्शन करतांना डॉ. मोहनजी भागवत यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. तसेच भरड अन्न हे घरच्या भोजनाप्रमाणे असल्याने दीनदयाळ थाळी येथे येणाऱ्यांना सकाळ प्रमाणे सायंकाळीही  घरचे भोजन मिळेल असे सांगितले.

समाजासाठी कार्य करणे हे केवळ शासन प्रशासनाचे कार्य नसून प्रत्येकाने आपले दायित्व समजून समाजासाठी कार्य करायला हवे, माझा समाज, माझा देश अशी भावना प्रत्येकाने मनात बाळगायला हवी, दया आणि करुणा यात केवळ आपुलकीचा फरक आहे, व्यक्तीने माणुसकीची भावना जपून निस्वार्थपणे इतरांची सेवा करायला हवी.सेवेच्या माध्यमातून जोवर समाजातील लोक माणुसकीच्या सामानपातळीवर येत नाही तोपर्यंत आपले सेवाकार्य सुरूच ठेवायला हवे, देशातील लोक एक बरोबर आल्यावर, हे संपूर्ण जग माणुसकीच्या पातळीवर आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे असे मार्गदर्शन  प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. तर कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात अनिस गयूर, देवांश गजभिये, अनुज नैताम या दिव्यांग मुलांना ‘हेल्थ कार्ड‘ चे वितरण करण्यात आले.

(छायाचित्र :दिव्यांगांना हेल्थ कार्ड वितरीत करताना मोहनजी भागवत)

यावेळी श्री सिध्दीविनायक सेवा फाऊंडेशन नागपूर व दीनदयाळ थाळी संचालन समितीचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी सांगितले की, संस्थेमार्फत दिव्यांग मुलांना ‘हेल्थ कार्ड देण्यात येत आहे.  कोरोनामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या दुर्दैवी जीवांच्या अती गरजू परिवारांचे पालकत्व स्वीकारले गेले. या परिवारांतील सदस्यांसाठी शिक्षण, समुपदेशन, आरोग्य, पोषक तत्वे, कौशल्य प्रशिक्षण या पाच आघाड्यांवर कार्यरत होऊन मायेचा आधार देण्याचे महत्वाचे कार्य ‘सोबत‘ या प्रकल्पाद्वारे केल्या जात आहे. या माध्यमातून आजवर जवळपास ३०० परिवारांना या अनोख्या प्रकल्पांतर्गत दिलासा मिळून सन्मानपूर्वक जगण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच या सायंकालीन भरड धान्य दीनदयाल थाळीचा निश्चितच फायदा गरजू रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळेल, असा विश्वास देखील संदीप जोशी यांनी व्यक्त केला.

आमदार मोहन मते यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी तर आभार पराग सराफ यांनी मानले.

…………………………..

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या