Homeक्राइमकोळश्‍याच्या दलालीत पत्रकारांचे तोंड काळे!

कोळश्‍याच्या दलालीत पत्रकारांचे तोंड काळे!

कोल वॉशरिजच्या मालकाला मागितली एक कोटीची खंडणी

केंद्रिय मंत्री प्रल्हाद जोशींचा ओएसडी असल्याचा आरोपीचा दावा:हाय प्रोफाईल नावांमुळे सायबर सेल पोलिसांची झाकपाक

चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

दोघांना अटक: ३१ जानेवरीपर्यंत पोलिस कोठडी

नागपूरातील काही मोठ्या दैनिकांचे पत्रकारही रडार वर!

नागपूर,ता.२९ जानेवरी २०२३: पत्रकारितेच्या क्षेत्रातील चार आरोपींनी मिळून एका नामांकित कोळसा उद्योगपतीला एक कोटींची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ही तक्रार सायबर सेलकडे चार दिवसांपूर्वीच दाखल झाली असून यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.न्यायालयात हजर केले असता या दोन्ही आरोपींना ३१ जानेवरी पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

अटक करण्यात आलेल्या चार जणांमध्ये बंगळूरु येथील एकाचा समावेश आहे.मयंक कुमार नावाच्या या इसमाने केंद्रिय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांचा विशेष कक्ष अधिकारी(ओएसडी)असल्याचा दावा केला होता.कोळशाचा व्यवसाय करणा-या सिव्हिल लाईन्समधील रहीवाशी असणा-या एका कोळसा उद्योगपतीकडे या चारही आरोपींनी एक कोटीची खंडणी मागितली असल्याची तक्रार या उद्योगपतीने सायबर सेलकडे नोंदवली होती.

इतर आरोपींमध्ये शहरातील ‘विदर्भ चंडिका’नावाच्या साप्ताहिकाचे मालक असणारे व वयाने अतिशय ज्येष्ठ असणारे पुरोहित यांचा पुतण्या पियुष पुरोहित(वय वर्ष ३०) याला देखील अटक करण्यात आली आहे.याशिवाय मध्यप्रदेशच्या सिवनी येथील ‘राष्ट्रबान‘नावाच्या साप्ताहिकाचे दोन संपादक संजय बघेल(वय वर्ष ३०) व कार्यकारी संपादक संजीत बघेल यांचा समावेश आहे.

पत्रकार क्षेत्रातील या तिन्ही आरोपींनी या भागातील अनेक उद्योगपतींना व व्यवसायिकांना अश्‍याच स्वरुपाच्या खंडणीसाठी लक्ष्य केले असल्याचे बोलले जात आहे.

एक कोटीची खंडणी मागणे,धमकावणे आणि सरकारी कागदपत्रांचा वापर करुन बनावट कागदपत्रे तयार करण्याचा आरोप या कोळसा उद्योगपतीने केल्यानंतर, सायबर सेलच्या पोलिसांनी कारवाई करीत यातील दोन आरोपींना अटक केली. सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रतीक कापडीया यांनी आरोपींना ३१ जोनवरीपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी(पीसीआर)सुनावली.

आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये भारतीय दंड संहितेचे कलम २९४,३८५,३८७,३८९,४१९,४२०,४६८,४७१,५०६(ब)नुसार आयपीसीच्या ३४ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(सी) आणि ६६(डी)नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे या चारही आरोपींनी तक्रारदार कोळसा उद्योगपतीविरुद्ध कोळसा धुण्याच्या प्रक्रियेबद्दल गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२२ मध्ये आणि नोव्हेंबरमध्ये बदनामीकारण वृत्त छापले व ते सोशल मिडीयावर व्हायरल केले.यानंतर या उद्योगपतीने पत्रकारितेच्या क्षेत्रातील तिन्ही आरोपींविरुद्ध दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला.न्यायालयाने या कोळसा उद्योजकाविरुद्ध आरोपींना काहीही छापण्यास मज्जाव केला.

नंतर यातील एका आरोपीने तक्रारदाराच्या भाच्याला भेटून वृत्त प्रसारित न करण्यासाठी एक कोटीची खंडणी मागितली.ही मागणी फेटाळून लावल्याने, आरोपीने त्याला व तक्रारदाराला कोळशाच्या काळ्याबाजाराच्या गुन्ह्याखाली फसवण्याची धमकी दिली तसेच या उद्योजकाच्या भाच्याला शारिरीक अपाय देखील केला.पत्रकारितेच्या क्षेत्रातील तिन्ही आरोपी, तक्रारदाराला गेल्या तीन महिन्यांपासून खंडणीची मागणी करीत होते.या आरोपींनी या उद्योजकाविरुद्ध कोळसा मंत्रालय व इतर विविध सरकारी विभागाकडे सातत्याने तक्रारीही नोंदवल्या.

यानंतर बंगलुरु येथील मयंक कुमार या भामट्याने या कोळसा उद्योजकाला केंद्रिय कोळसा मंत्र्यांचा ओएसडी असल्याच्या नावाखाली बोलावून सांगितले की त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी आल्या आहेत.तो फिर्यादीच्या भाच्याला 999777770 आणि +44 7387602061 या मोबाईल क्रमांकावरुन वारंवार फोन करु लागला.

या कोळसा उद्योजकाच्या भाच्याने त्याला वारंवार सांगितले की त्यांच्याकडे लपविण्यासारखे काहीच नाही आणि त्यांनी न्यायालयात केस देखील दाखल केली आहे.यावर बंगळूरुच्या मयंक कुमार याने त्याला सांगितले की ते पत्रकारितेच्या क्षेत्रातील तिन्ही आरोपींना शिक्षा करतील.यानंतर कुमार याने केंद्रिय मंत्री प्रसाद जोशी यांच्या लेटरहेडवर या तिन्ही आरोपींविरुद्ध, तक्रारदार कोळसा उद्योजकाच्या भाच्याकडे पत्र पाठवले जे डीजीपी कर्नाटक प्रवीण सूद यांना उद्देशून लिहण्यात आले होते.या तिन्ही आरोपींविरुद्ध अशीच तक्रार नागपूरातही करण्यासाठी मयंक कुमार याने दहा लाख रुपयांची मागणी केली.त्याने तक्रारदाराच्या या भाच्याला सीबीआयच्या अधिका-यांना नागपूरात आणण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये खाेली बुक करण्यास सांगितले.

या भाच्याने कोळसा मंत्रालयात मयंक कुमार नावाच्या अधिका-या विषयी चौकशी केली असता,अश्‍या नावाचा कोणताही अधिकारी किंबहूना ओएसडी कार्यरत नसल्याचे वास्तव त्याला कळले.कुमार हा या तिन्ही आरोपींसोबत संगमताने कार्य करीत असल्याचा संशय या भाच्याला आला,परिणामी या काेळसा उद्योगजकाने व त्यांच्या भाच्याने सायबर सेलकडे छळ,खंडणी आणि वारंवार जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नोंदवली.

थोडक्यात, खंडणीखोर पार्श्वभूमीच्या या पत्रकाराने तक्रारदाराच्या विरोधात बदनामीकारक लेख प्रसिद्ध करने,तक्रारदाराने न्यायालयात धाव घेणे, न्यायालयाने आरोपींना कोणताही लेख प्रसिद्ध करण्यास मज्जाव करने,असे लेख प्रसिद्ध होऊ नये म्हणून या पत्रकारांनी तक्रारदाराला तब्बल एक कोटीची खंडणी मांगणे,खंडणी देण्यास नकार दिल्याने या आरोपींनी या कोळसा उद्योजकाला व त्याच्या भाच्याला गंभीर परिणाम भाेगण्याची धमकी देणे, यातील मयंक कुमार या आरोपीने केंद्रिय मंत्र्यांचा ओएसडी म्हणून तोतयागिरी करने ,या कोळसा उद्योजकाला बंगळूरु येथे बोलावणे,त्याने सीबीआय अधिका-याकडे तक्रार निकाली काढण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी करने,या कोळसा उद्योजकाद्वारे या सर्व घटनांची सायबर सेलेकडे तक्रार नोंदवणे,यातील दोन आरोपींना पोलिसांकडून अटक होने, यात पियुष पुरोहित व मयंक कुमार यांचा समावेश असने,सत्र न्यायालयाने या आरोपींना चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावणे,असा सर्व घटनाक्रम उजेडात आला आहे.

अश्‍या प्रकारे कोळशाच्या दलालीत काही पत्रकारांनी आपले तोंड काळे करुन घेण्याची अतियश गलिच्छ व संतापजनक घटना नागपूरात घडली असून, या क्षेत्रात अतिशय प्रामाणिकपणे काम करणा-या पत्रकारांनी या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे.कोळश्‍याचा या दलालीत नागपूरातील काही दैनिकांचे पत्रकार देखील सायबर सेलच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे एवढ्या हाय प्रोफाईल घटनेविषयी सायबर सेलच्या पोलिस अधिका-यांनी कमालीची गुप्तता पाळली.चार दिवस उलटून देखील या घटनेची ना हाक ना बोंब पत्रकारीतेच्या क्षेत्रात उमटली.

‘सत्ताधीश’ने नेमक्या याच बाबीचा मागोवा घेतला असता सायबर सेलचे इन्चार्ज व पोलिस अधिकारी अमोल काचाेरे यांनी पत्रकारांना या घटनेची माहिती देण्याचे आदेश नव्हते कारण घटनेतील आरोपी हे फरार झाले असते,असा युक्तीवाद केला.या घटनेत पत्रकार किवा संपादक यांचा सहभाग असल्याने ही गुप्तता पाळण्यात आली नसल्याचे काचोरे यांनी सांगितले.

मात्र, या घटनेत एका केंद्रिय मंत्र्यांच्या नावाचा उल्लेख असल्याने कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याची चर्चा आहे.

‘विदर्भ चंडिका‘ हे एक हिंदी साप्ताहिक असून एकीकडे वृत्तपत्रांना प्रामाणिकपणे वृत्तपत्रे छापणे कठीण झाले असताना हे साप्ताहिक रंगीत पानांवर प्रसिद्ध होतं.याशिवाय या साप्ताहिकाचे मालक व ज्येष्ठ पत्रकार पुरोहित हे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या घनिष्ठ परिचयाचे असून, काँग्रेसचे माजी मंत्री रणजीत देशमुख तसेच माजी केंद्रिय मंत्री मनेका गांधी यांच्या देखील अतिशय निकटवर्तीय मानले जातात.नुकतेच काही महिन्यांपूर्वी रजवाडा पॅलेस येथे पत्रकारितेच्या क्षेत्रातील अग्रगण्य म्हणून, पुरोहित यांचा सत्कार गडकरी यांच्या हस्ते पार पडला होता.

मात्र,पुरोहित यांचा पुतण्या पियुष पुरोहित याच्या विरुद्धच एक कोटीच्या खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने केवळ खंडणीबाजीसाठीच हल्ली काही साप्ताहिके छापल्या जातात का? असा प्रश्‍न नागपूरकर वाचकांना आता पडला आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे या खंडणीबाजीच्या प्रकरणात सायबरसेलच्या शिपायापासून तर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ज्याप्रकारे कमालीची गुप्तता पाळली ते संशय निर्माण करणारे असून, या घटनेची माहिती, ही पोलिस माहिती कक्षापर्यंत देखील पोहोचवण्यात आली नाही.माहिती कक्षाला सायबर सेलकडून दररोज माहिती पोहोचवली जात असते,हे विशेष!सरकारी लोकसेवक यांचे हे ‘गुप्त‘ वागणे याचा अन्वार्थ आता नागपूरकर जनता लावित आहे.

Latest बातम्या