

भाजपचे घनश्याम तिवारी विजयी
नवी दिल्ली: राज्यसभेच्या ५७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती. राज्यसभेच्या ५७ जागांपैकी ४१ जागांवर बिनविरोध निवडणूक पार पडल्यानंतर १६जागांसाठी आज मतदान पार पडलं आहे. महाराष्ट्रातील ६, राजस्थानातील ४, हरियाणातील २ आणि कर्नाटकमधील ४ अशा १६ जागांसाठी मतदान झालं.
महाराष्ट्रातील ६ जागांची मतमोजणी थांबलेली असताना राजस्थानमधून काँग्रेससाठी चांगली बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे प्रमोद तिवारी, मुकुल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला विजयी झाले आहेत. तर, भाजपचे घनश्याम तिवारी विजयी झाले आहेत. राजस्थानमध्ये सुभाष चंद्रा यांच्या उमेदवारीमुळं काँग्रेसपुढं आव्हान निर्माण झालं होतं. मात्र, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नियोजनामुळं काँग्रेसला विजय मिळाला आहे.
राजस्थानातील चार जागांसाठी निवडणूक लागली होती. कांग्रेसनं मुकुल वासनिक, प्रमोद तिवारी, रणदीप सुरजेवाला असे तीन उमदेवार दिले होते. काँग्रेसकडे स्वत: चे १०८ आमदार होते. एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी ४१ मतांची गरज होती. अशोक गेहलोत यांनी व्यवस्थित नियोजन करत विजय खेचून आणला आहे. त्यामुळं सुभाष चंद्रा यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
राज्यस्थानात तीन जागांवरील काँग्रेसचा विजय हा लोकशाहीचा विजय आहे. प्रमोद तिवारी, मुकुल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला यांचं अभिनंदन करतो. तीन खासदार राजस्थानचे प्रश्न संसदेत मांडतील, असा विश्वास अशोक गेहलोत यांनी व्यक्त केला. काँग्रेसकडे तीन जागांवर विजय मिळवण्यासाठी आवश्यक मतं आहेत. भाजपनं एक अपक्ष उमेदवार उतरवून घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केला. आमच्या आमदारांनी एकजूट करत भाजपला जोरदार उत्तर दिलं आहे. २०२३ मध्ये भाजपला अशाच पराभवाचा सामना करावा लागेल,असं गेहलोत म्हणाले.राजस्थानातील मतमोजणीपूर्वीच अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांनी राजस्थानमधून नवी दिल्लीकडे जाण्याचा निर्णय घेतला. राजस्थानचे धन्यवाद मानतो असं ते म्हणाले.




आमचे चॅनल subscribe करा
