

विदर्भ साहित्य संघात नितीन करमरकर यांच्या कथासंग्रहाचे प्रकाशन
नागपूर, 3 एप्रिल: नवोदित लेखक डॉ. नितीन करमरकर यांच्या आविष्कारात सैलपणा असून कथेची बांधणी करणारे मन आहे. अनेक मोठ्या साहित्यिकांच्या तत्वज्ञानाची गुंफण असलेला ‘समर्पण’ हा त्यांचा पहिला दीर्घकथासंग्रह मानवी जगण्यातील अपूर्णता व्यक्त करतो, असे प्रतिपादन विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केले.

विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात रविवारी नवोदित लेखक डॉ. नितीन करमरकर यांच्या ‘समर्पण’ कथासंग्रहाचे प्रकाशन विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वि. सा. संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार डॉ. पराग घोंगे, ज्येष्ठ कवी विवेक घोडमारे व सी. पी. अँड बेरार महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. अजय कुळकर्णी यांची उपस्थिती होती. नितीन यांचे आईवडील डॉ. पंढरीनाथ करमरकर व विमल करमरकर यांचीही यावेळी मंचावर उपस्थिती होती.
डॉ. रवींद्र शोभणे यांनी नितीन करमरकर यांच्या कथासंग्रहाचे समीक्षण केले. त्यातील मजबूत धाग्यांसह कमकुवत बाजुही उलगडून दाखवल्या. नवोदित लेखकांना त्यांनी काही टीप्सही दिल्या.
डॉ. पराग घोंगे यांनी लेखन हे व्रत असून लेखकाने ते व्रतस्थपणे केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. तीन कथांचा संग्रह असलेल्या डॉ. करमरकर यांच्या कथांमध्ये तत्वज्ञानाचा शिरकाव असून निवेदनाची उत्कंठा आहे. नितीन यांच्या ठायी असलेली ऋजुता या कथांमध्ये झळकत असल्यामुळे त्या वाचनीय झाल्या आहेत, असे उद्गार काढले.
विवेक घोडमारे यांनी लेखन हे सर्वांच्या हिताचे असावे, ते अखिल विश्वाचे असावे असे मत व्यक्त केले. नितीन करमरकर यांच्या कथा मानवी मनाचा वेध घेणा-या असून तांत्रिकदृष्ट्या सकस आहेत.
सामान्यांच्या जीवनात येणारी संकटे व आघात सहन करण्याची ताकद त्यांच्या कथांमधून दिसते, असे डॉ. अजय कुळकर्णी कथासंग्रहावर भाष्य करताना सांगितले.
विलास मानेकर यांनी करमरकर यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नितीन करमरकर यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन ज्योती भगत यांनी केले तर आभार नितीन करमरकर यांनी मानले.




आमचे चॅनल subscribe करा
