
करोनोत्तर काळात रंगमंचाचे वैभव येणार परत:नाट्यरसिक सुखावणार
नागपूर,ता.२८ सप्टेंबर: स्वातंत्र्यांच्या ७५ वे अमृत महोत्सवाचे औचित्य साधून खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे २८,२९ व ३० ऑक्टोबर रोजी खासदार करंडक खुली एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.लक्ष्मीनगर येथी सायंटिफिक सभागृहात ही स्पर्धा पार पडणार असून ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता रेशीमबाग येथील कविविर्य सुरेश भट सभागृहात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल.यानिमित्ताने कारोना काळात गेल्या दीड वर्षांपासून हरवलेले नाट्यगृहांचे गतवैभव नाट्य रसिकांना पुन्हा अनुभवता येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष प्रा.अनिल सोले यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत सांगितले.
खासदार करंडक खुली एकांकिका स्पर्धा ही गतवैभवाची नांदी ठरणार असल्याचे ते म्हणाले.ही स्पर्धा जिल्हास्तरावर होणार असून स्पर्धेत विजेतेपद पटकविणा-याला संस्थेला प्रथम पुरस्कार करंडक व ५१ हजार रुपये रोख,द्वितीय पुरस्कार करंडक व ३१ हजार रोख तर तृतीय पुरस्कार करंडक व २१ हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.याशिवाय उत्तेजनार्थ पुरस्कार ११ हजार रुपये देण्यात येईल.
याशिवाय लेखक,दिग्दर्शक,अभिनय,नट आणि नटी,उत्कृष्ट नेबालनट,रंगभुषा,वेशभुषा,प्रकाशयोजना,नेपथ्य,पार्श्वसंगीत या आदी गटांसाठी देखील वैयक्तीक रोख पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.स्पर्धेचे प्रवेश शुल्क फक्त १०१ रुपये असणार आहे.
सादरीकरणाला लागणारे संपूर्ण साहित्य नाट्यसंस्थेलाच आणायचे आहे.दोन स्पॉट लाईट,एक डीमर,जनरल लाईट्स आयोजकांकडून पुरविण्यात येईल तसेच ध्वनी व्यवस्था ही देखील आयोजकांकडून उपलब्ध करुन दिली जाईल,अशी माहिती सोले यांनी दिली.
गडकरी यांच्या प्रेरणेतून उपराजधानीत गेल्या ५ वर्षांपासून खासदार सांस्कृतिक महोत्सव दणक्यात पार पाडला जात होता.मनोरंजनासोबतच समाज प्रबोधनाचा उद्देश्य या आयोजनामागे असतो मात्र गेल्या दीड वर्षांपासून करोना नावाचे फार मोठे अरिष्टय सांस्कृतिक क्षेत्रावर कोसळले.ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा रंगमंचाचे पडदे उघडणार असून शासनाचे कारोनासंबधीचे जे-जे काही दिशानिर्देश वेळोवेळी येतील त्या सर्व दिशानिर्देशाचे पालन करुन या स्पर्धा पार पाडल्या जातील असे प्रा.सोले यांनी सांगितले.
२२ ऑक्टोबर नंतर शासन रंगमंच देखील उघडणार आहे.असे जर घडले तर २९ नोव्हेंबर रोजी भव्य दिव्य कार्यक्रम घेण्याचा समितीचा मानस असल्याचे ते म्हणाले.या स्पर्धा हिंदी व मराठी अश्या २ भाषेत पार पडतील असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील नाट्यक्षेत्रातील वलयांकित विभूती यांच्या उपस्थितीबाबत विचारले असता निश्चितच तसे प्रयत्न करु,असे ते म्हणाले.परिक्षकांची नावे सध्या मात्र घोषित करता येणार नाही मात्र एक महिला परिक्षक निश्चित असणार,अशी माहिती त्यांनी दिली.
पत्र परिषदेला समितीचे उपाध्यक्ष मधुप पांडेय,सचिव जयप्रकाश गुप्ता,कोषाध्यक्ष राजेश बागडी,संदीप गवई,संजय गुळकरी,चेतन कायरकर,संजय गवळी आदी उपस्थित होते.
एकांकिकेचे विषय-
देशाच्या स्वातंत्र्याशी संबंधित कुठलीही घटना,स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणारे क्रांतीकारक,अहिंसा आंदोलन,विविध पातळ्यांवर स्वातंत्र्य लढा उभारणारे महापुरुष,पारतंत्र्यातही देशाला एकसंघ ठेवण्यासाठी झटणारी मंडळी,इंग्रज भारतात आले तेव्हापासून ते स्वातंत्र्य मिळाले त्या दिवसापर्यंत कुठलाही संदर्भ किंवा देशाचे स्वातंत्र्य आणि आजचा काळ या अनुषंगाने असलेले लिखाण.
प्रवेश अर्ज १ ऑक्टोबरपासून खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती कार्यालय,गंगोत्री अपार्टमेंट,सिद्ध गणेश मंदिर बुटी ले आऊट,लक्ष्मी नगर येथे उपलब्ध असतील.कार्यालयीन वेळ सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत.
१० ऑक्टोबर पर्यंत अंतिम प्रवेश अर्ज स्वीकारल्या जाईल.संपर्क क्रमांक-९१७५१२८३१५




आमचे चॅनल subscribe करा
