

पत्रभेटच्या उपक्रमाचा चौथा दिवस
नागपूर,ता.२४ जुलै: संस्कृत ही सर्वाधिक प्राचीन भाषा असून त्यात भारतवर्षाच्या संस्कृती आणि सभ्यतेचा इतिहास आहे. धर्मग्रंथ, पुराण, रामायण, महाभारत, महाकाव्य, नाटक, गद्यकाव्य, व्याकरण, ज्ञान विज्ञान अशा सर्वच विषयात ऋषी, महर्षी, कवी, तत्वज्ञांनी अथक परिश्रमाने साहित्य लिहून ठेवले आहे. संस्कृतने देशविदेशातील साहित्य व भाषांवर आपला अमीट ठसा उमटलवला आहे, असे प्रतिपादन संस्कृतच्या अभ्यासक व लेखिका डॉ. मुग्धा कुळकर्णी यांनी व्यक्त केले.
पत्रभेट संपादकीय मंडळाच्यावतीने गुरुपौर्णिमेच्या पर्वावर आयोजित ‘आबार एसेछे आषाढ’ या उपक्रमात आज चौथे पुष्प डॉ. मुग्धा कुळकर्णी यांनी सादर केले. ‘संस्कृत साहित्याचा समालोचनात्मक इतिहास’ विषयावर संस्कृत अभ्यासक व लेखिका डॉ. मुग्धा कुळकर्णी भाष्य केले.
वैदिक साहित्य, आर्ष महाकाव्य आणि अभिजात व लौकिक संस्कृत साहित्य असे तीन भाग संस्कृत साहित्याचे भाग पडतात. त्यातील अभिजात साहित्यावर डॉ. कुळकर्णी यांनी प्रकाश टाकला. त्यांनी संस्कृत काव्य, नाटकाचा विस्तार सांगितला तर भास, भवभूती, कालिदास यासारख्या संस्कृत साहित्यिकांच्या साहित्यविषयक कार्याचा आढावा घेतला.
सूर्यपुत्र या सद्गुरूदास महाराज लिखित ‘हृदयगत’ या लेखाचे अभिवाचन मृदूला कोलारकर यांनी केले. महारथी कर्ण, पराक्रमी कर्णाशी संबंधित असलेल्या या लेखातून अतिशय सुंदर अभिवाचन त्यांनी केले. सूर्यपुत्र म्हणून जन्माला आलेला कर्ण नंतर सुतपुत्र म्हणून मरण पावला पण मधल्याकाळात तो सूतपुत्र कसा झाला, त्याचा रथचक्राशी कसा संबंध होता, याचे अभ्यासपुर्ण विवेचन या लेखात करण्यात आले आहे. सूत्रसंचालनदेखील मृदूला कोलारकर यांनी केले.
…….
आज समारोप
सायंकाळी 7 वाजता रवींद्र संगीतातील एक प्रकार ‘सहजपाठ’ समीर हेजीब सादर करतील. त्यानंतर ‘मागणे ते एक तुजप्रति आहे !’ या लेखाचे स्मिता महाजन अभिवाचन करणार आहेत. या कार्यक्रमाने ”आबार एसेछे आषाढ’ या उपक्रमाचा समारोप होईल.
…….




आमचे चॅनल subscribe करा
