

गुरुपौर्णिमेनिमित्त पत्रभेटचा विशेष आभासी कार्यक्रम
नागपूर: गुरुपौणिमेच्या मुहूर्तावर पत्रभेट संपादकीय मंडळाच्या वतीने ‘आबार एसेछे आषाढ’ उपक्रम २१ ते २५ जुलै दरम्यान राबविण्यात येणार आहे. या आभासी कार्यक्रमात ज्येष्ठ, श्रेष्ठ कवी, साहित्यिकांच्या साहित्याचा व प. पु. सद्गुरूदास महाराजांच्या विविध लेखांच्या अभिवाचनाचा आस्वाद रसिकांना घेता येईल.
२१ जुलै रोजी या उपक्रमाला प्रारंभ होणार असून सायंकाळी ७ वाजता ‘कालिदासाचे काव्य सौंदर्य’ विषयावर संस्कृत विदुषी डॉ. नंदा पुरी यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर ‘दिंडी निघाली पंढरपुरा’ या लेखाचे अपूर्वा जगदाळे अभिवाचन करतील.
२२ तारखेला साहित्यिक डॉ. माधवी भट यांचे ‘रवींद्र संगीत – सगुणातून निर्गुणाकडे’ विषयावर भाषण देणार असून ‘आबार एसेछे आषाढ’ या ललित लेखांचे प्रज्ञा फडणीस अभिवाचन करणार आहेत.
२३ तारखेला गुरुपौर्णिमा असून त्या दिवशी सकाळी ११ वाजता ‘गीत विष्णुदास’ या गाण्याच्या संग्रहाचे प. पू. सद्गुरूदास महाराजांच्या हस्ते उद्घाटन होणार असून त्यानंतर महाराजांच्या आशीर्वचनाचा लाभ मिळेल.
२४ तारखेला सायंकाळी ७ वाजता ‘संस्कृत साहित्याचा समालोचनात्मक इतिहास’ विषयावर डॉ. मुग्धा कुळकर्णी भाष्य करतील. मृदूला कोलारकर या सूर्यपुत्र या पुस्तकातील ‘हृदयगत’ या लेखाचे अभिवाचन करतील.
तर २५ जुलै रोजी रवींद्र संगीतातील एक प्रकार ‘सहजपाठ’ समीर हेजीब सादर करतील. त्यानंतर ‘मागणे ते एक तुजप्रति आहे !’ या लेखाचे स्मिता महाजन अभिवाचन करणार आहेत.
रसिकांनी या आभासी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीकरिता शरयु देशपांडे व प्रणोती रोटीवार यांच्याशी संपर्क साधावा.
हा ऑनलाईन कार्यक्रम आहे, याची नोंद घ्यावी.




आमचे चॅनल subscribe करा
