Homeदेश-विदेशडॉक्टर्सवर हल्ले करणा-यांना या पुढे कुठेही उपचार मिळणार नाही!

डॉक्टर्सवर हल्ले करणा-यांना या पुढे कुठेही उपचार मिळणार नाही!

डॉ.संजय देवतळे यांचे पत्र परिषदेत वादग्रस्त विधान

१८ जून  रोेजी सकाळी ८ ते २ दरम्यान देशव्यापी बंद

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. १५ जून: करोनाचा पॅन्डॅमिक काळ आणि खासगी रुग्णालयांवर पडलेला ताण याची कल्पना सर्वसामान्य जनतेला कळणे अशक्य आहे.एका एका दिवसात नागपूर शहरात साढे सात हजारांच्यावर करोना संसर्गिताची संख्या असायची अश्‍यावेळी प्रत्येकालाच वेळेवर उपचार देणे हे शहरातील अनेक खासगी रुग्णालयच नव्हे तर शासकीय रुग्णालयांना देखील अशक्य बाब होती,तरीदेखील शासकीय असो किवा खासगी,प्रत्येक डॉक्टरने रुग्णांचा जीव वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्नच केला आहे मात्र अति गंभीर रुग्णांवर उपचार करुन देखील काही रुग्ण हे दगावले परिणामी रुग्णांच्या नातेवाईकांनी अनेक रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केली,रुग्णालयांची ताेडफोड केली एवढंच नव्हे तर नागपूरात एका रुग्णालयाला आग लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला,अश्‍या घटना पुन्हा डॉक्टर्ससोबत घडल्या तर अश्‍या नातेवाईकांना शासकीय असो किवा खासगी कोणत्याही रुग्णालयात उपचार मिळणार नसल्याचे वादग्रस्त विधान इंडियन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष् डॉ.संजय देवतळे यांनी आज मंगळवार दि. १५ जून २०२१ रोजी आयएमए येथे आयोजित पत्र परिषदेत केले.
याप्रसंगी मंचावर आयएमएचे सचिव डॉ.सचिन गठे,माजी राष्ट्रीय अध्यक्ष् डॉ.अशोक आढाव व आगामी  अध्यक्ष् डॉ.प्रकाश देव उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना डॉ.देवतळे म्हणाले,की काेणताही समाज वाईट नसतो समाजातील काही माणसे ही वाईट प्रवृत्तीची असतात.सूडो पब्लिसिटीसाठी ते अश्‍या घटना घडवून आणतात.ज्या रुग्णालयाला आग लावण्याचा प्रयत्न झाला त्या रुग्णालयात ३०-४० रुग्ण भर्ती होते,त्यांच्याही जिवितेला त्यांनी धोका निर्माण केला.मी त्यांना ही समज देतो अगामी काळात कोणत्याही डॉक्टर,स्टाफ किवा पॅरामेडिकल स्टाफसोबत असे कोणतेही कृत्य करु नका अन्यथा त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना शासकीय किवा खासगी कोणत्याही रुग्णालयात उपचार मिळणार नाहीत!

यावेळी बोलताना ते म्हणाले,की अश्‍या घटना फक्त भारतातच घडतात,जगातील कोणत्याही देशात डॉक्टर्ससोबत अश्‍या स्वरुपाची मारहाण होत नाही.आम्ही पदवीधर होतो तेव्हा शपथ घेत असतो,आमचे कार्य फक्त आणि फक्त रुग्णांचा जीव वाचवणे हेच असते.

करोनावर उपचार करताना के.के.अग्रवाल यासारखे निष्णात डॉक्टर्स तसेच नागपूरचे ६ डॉक्टर्स यांचा मृत्यू झाला मात्र तरीही एक ही डॉक्टर घरी बसला नाही.जीव धोक्यात घालून रुग्णांचे प्राण वाचवले मात्र देशभरात अनेक ठिकाणी डॉक्टर्सना मारहाण झाली व या पेशाला गालबोट लागले.तारेवरची कसरत करुनही काही रुग्णांचे जीव नाही वाचवू शकलो यामुळे चिडून रुग्णांच्या नातेवाईकांनी तसेच काही ठिकाणी राजकीय नेत्यांनी डॉक्टर्सना मारहाण केली!तोडफोड केली. का होतंय असं?फक्त खासगी नव्हे तर मेडीकलमध्येही अश्‍या मारहाणीच्या घटना घडल्या.

अश्‍याच बाबीची दखल घेऊन स्वर्गीय गृहमंत्री आबा पाटील यांनी डॉक्टर्संना सुरक्षा प्रदान करणारा एक कायदा पारीत केला होता.मात्र त्याची अंमलबजावणीच होत नाही.केंद्राने या संदर्भात विधेयक आणले व लगेच मागे ही घेतले.म्हणूनच नवीन पिढी आता विचार करेल जीव धोक्यात घालून का यावे वैद्यकीय क्षेत्रात?येणा-या नवीन पिढीचा विचार करुनच १८ जून रोजी आम्ही ‘सेव्ह द सेव्हियर्स’म्हणजे जीव वाचवणा-यांचा जीव वाचवा हे आंदोलन करीत असल्याचे डॉ.संजय देवतळे यांनी सांगितले.

देशात डॉक्टर्संना मारहाणीच्या २७२ घटना घडल्या असल्याचे ते म्हणाले. यावेळी बाबा रामदेव यांच्या मुद्दाला हात घालताना सगळ्या पॅथी चांगल्या नाहीत असे मॉर्डन पॅथी कधीही म्हणत नाही.आयुर्वेदीक,होमियोपॅथी औषधे घेऊ नका असे मॉर्डन पॅथी सांगत नाही.करोना काळात तर मॉर्डन पॅथीचाच फायदा रुग्णांना झाला.मात्र बुवाबाजी व भावनिक साद घालून रुग्णांचा जीव इतरांनी धोक्यात आणला.यविषयी जिल्हाधिकारी यांना लवकरच निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काही वर्षांपूर्वी ऑल इंडिया मेडीकल सायंसने एक सर्वेक्ष् ण प्रसिद्ध केलं त्यात देशातील लहान लहान शासकीय प्राथमिक दवाखान्यात येणा-या रुग्णांना सरळ इतर मोठ्या रुग्णालयात रेफर केल्या जात असल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली.अज्ञानातून ग्रामीण भागात होणारे डॉक्टर्सवर हल्ले यामुळे शासकीय दवाखान्यात गंभीर रुग्णांवर तेथील डॉक्टर उपचार करण्याची जोखिमच पत्करत नाहीत.डॉक्टरमुळेच त्यांचा रुग्ण दगावला असा आरोप हे समाजासाठी घातक व तेवढेच दूर्देवी असल्याचे डॉ.संजय देवतळे यांनी सांगितले.
कोणत्याही डॉक्टरची ईच्छा नसते उपचारासाठी आलेला रुग्ण दगावला जावा मात्र देशातील प्राथमिक रुग्णालयांमध्ये निर्भयपणे रुग्णांवर वेळेवर उपचार होत नसतील तर ही बाब समाजासाठी जास्त दूर्देवी असल्याचे ते म्हणाले.डॉक्टर्संना मारहाण हा काही उपाय किवा तोडगा ठरु शकत नाही.असे हल्ले काही गूंड प्रवृत्तीचे लोकं करीत असतात व काही राजकीय नेते त्यांना हाताशी धरत असतात,असा आरोप त्यांनी केला.

नुकतेच धुळे येथील शासकीय रुग्णालयात एका अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला आणण्यात आले,त्या रुग्णालयात एमआरआय काढण्याची सुविधाच नसल्याने रुग्णाचे एमआरआय बाहेरुन काढून आणावे एवढे सांगताच त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी त्या डॉक्टरला इतकी बेदम मारहाण केली की त्याचा डोळा कायमचा निकामी झाला.!नुकतेच वर्धा येथील रुग्णालयात एका पक्षाच्या आमदाराने तेथील डॉक्टरसोबत एवढ्या घाणेरड्या शब्दात अरेरावी केली जी सांगण्यासारखीही नाही.आमदार हे पद प्रतिष्ठित स्तरात गणल्या जातं मात्र त्या आमदाराची भाषा ऐकून ना त्यांच्या पक्षाने निषेध केला ना कारवाई केली.अश्‍या वातावरणात कोणत्या डॉक्टरला काम करण्याची ईच्छा होईल?असा प्रश्‍न डॉ.देवतळे यांनी उपस्थित केला.

कोविड काळात अनेक खासगी रुग्णालयांनी मनमानेल तसे शुल्क गरजू रुग्णांकडून वसूल केल्याचा आरोप आहे,शुल्काच्या संदर्भात पारदर्शता नव्हती म्हणून वाद झालेत त्याचे काय?या प्रश्‍नावर बोलताना डॉ.देवतळे म्हणाले,की आयएमएच्या पुढाकारातूनच न्यायालयाच्या निर्देशातून मनपाच्या सहभागाने समिती स्थापन करण्यात आली आहे.ही समिती रुग्णालये आणि रुग्ण दोन्ही बाजू ऐकून घेणार आहे.खरं काय ते समोर येईलच.करोनाच्या दुस-या लाटेत रुग्णालयांनी २९ हजार करोना बाधित रुग्णांवर उपचार केलेत त्यात फक्त ४५० तक्रारी समितीला प्राप्त झाल्या.यातील २५० तक्रारी यातर मॅन्यूली आहेत असा आरोप करीत माजी महापौर संदीप जोशी यांचे नाव न घेता तीन महिन्यांपूर्वी डिस्चार्ज झालेल्या रुग्णांच्या देखील तक्रारी दाखल करण्यात आल्या.अनेक रुग्णांना काही राजकीय नेत्यांनी तक्रारी दाखल करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आयएमचेचे सदस्य डॉ.अनिल लद्दड यांनी केला.या तक्रारींना चार मोबाईल क्रमांकासह सोशल मिडयाचा प्लेटफॉम उपलब्ध करुन दिल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.२९ हजार पैकी २०० तक्रार ही संख्या आरोपाचा इश्‍यू होऊ शकत नाही.आता समिती गठीत झाली आहे आयएमए,विदर्भ हॉस्पीटल असोशिएशन व मनपा प्रशासन या सर्व ४५० तक्रारींवर  निर्णय घेईल व या प्रयत्नातून न्याय नक्की मिळेल,काही खासगी रुग्णालयांनी तर पैसे ही परत केल्याचे डॉ.लद्दड यांनी सांगितले.

२९ हजार बाधितांपैकी ८० टक्के रुग्ण हे सुखरुप घरी परतलेत.यात नेत्यांचे फोन व ओळखीच्या रुग्णांना भर्ती करुन घेणे हा देखील एक मुद्दा होता.आयसीयूमध्ये अधिक काळ उपचारासाठी लागणे हे देखील बिल वाढण्यास कारणीभूत ठरले.

रुग्णालये हे व्यापारी प्रतिष्ठानच हे सत्य आधी समजून घ्या-डॉ.देव
खासगी रुग्णालये हे व्यापारी प्रतिष्ठानच आहेत सर्वात आधी हे सत्य लोकांनी स्वीकारावे.या प्रतिष्ठांनाना वीज,पाणी,इमारतीचा मेंटनेस,बायलॉजिकल वेस्टची विल्हेवाट लावणे,स्टाफ इ.वर भरपूर पैसा खर्च करावा लागतो.जरी सरकारने ८० टक्के व २० टक्केचा कोटा ठरवून दिला असला तरी स्टाफला पगार सारखाच असतो.सकरारी कोट्यातून मिळणारे प्रति रुग्ण ४ हजार रुपयांत स्टाफचा पगार निघू शकत नाही.ना मनपाने ना महावितरणने कोविडच्या महामारीच्या काळात खासगी रुग्णालयांचे विज बिल व पाण्याच्या बिलात काही सूट दिली.

महामारीच्या दुस-या लाटेत तर औषधांचे दर तसेच ऑक्सीजन सिलेंडरचे दर हे आभाळाला भिडले त्यामुळे देखील बिलांमध्ये वाढ झाली.खासगी रुग्णालयांनासुद्धा या महामारीच्या काळात २०० चा ऑक्सीजन सिलेंडर ५०० रुपयात घ्यावा लागत होता.रेमडिसिव्हिरसाठी खासगी रुग्णालयांना देखील भरमसाठ पैसा मोजावा लागला होता.फक्त खासगी रुग्णालयांना दोष देऊन उपयोग नाही.प्रत्येक समाजात ९५ टक्के लोक हे चांगले तर ५ टक्के हे वाईट प्रवृत्तीचे असतात मग खासगी रुग्णालये याला अपवाद कसे?

रामदेवबाबा अशिक्ष्ति माणूस त्याच्या विधानांना महत्व देण्याचे कारण नाही-डॉ.अशोक अढाव
आपल्या पहील्याच ऑन लाईन बैठकीत मी देशभरातील डॉक्टर्संना हेच सांगितले बाबा रामदेव हे  अशिक्षित आहेत,८ वी देखील पास नाही,त्यांना कोणत्याही पॅथीचा अभ्यास नाही त्यांच्या कोणत्याही ही वक्तव्याला खूप महत्व देणे गरजेचे नाही मात्र तरी देखील बाबा रामदेव यांच्यावर आता आयएमएने एक हजार कोटींचा मानहानिचा दावा ठोकला आहे.

एवढे हास्यास्पद विधाने करुन देखील बाबा रामदेवबाबांकडे योगाशिवाय आणखी एक कला आहे ती म्हणजे ते मिडीयाला ‘मॅनेज’करण्यात माहीर आहेत!एकीकडे वादग्रस्त विधाने करणे व लगेच माफी मागून मोकळे होणे.आता तर ते ॲलोपॅथी ही गूणकारी असून ॲलोपॅथीचे डॉक्टर्स हे सज्जन असतात असे देखील म्हणायला लागलेत.त्याला महत्व द्यायलाच नको.ते फक्त योगापुरुष आहेत त्यातही ते अति-योगा करीत असल्यामुळे अति-योगा हा देखील शरीराला धोकादायक असल्याची पुश्‍ती डॉ.अढाव यांनी जोडली.आता तर त्यांच्यावर एफआयआर दाखल झाली आहे त्यामुळे त्यांना अति महत्व देणे गरजेचे नसल्याचे मत अढाव यांनी एका प्रश्‍नावर बोलताना व्यक्त केले.

चांगले बोलणे तर सोडा त्यांच्या विषयी काही वाईट बोलणे हे आम्हालाच शोभत नाही!यावेळी डॉक्टर्स हे निर्भय राहीले तर आणि तरच समाज निरोगी राहील,असे महत्वाचे विधान डॉ.अशोक अढाव यांनी केले.रुग्णांच्या हल्ल्यांच्या भीतीने आम्ही भीतीत काम करत राहू तर यात समाजाचेच नुकसान आहे.याचा येत्या काळात समाजाला खूप मोठे नुकसान भोगावे लागतील.एखादा गंभीर रुग्ण उपचारासाठी आल्यास त्याला योग्य तो उपचार सुरु करण्यास वेळ लागत असतो,अनेक प्रकारचे आधी टेस्ट करणे गरजेचे असतात,अश्‍यावेळी डॉक्टर्सला मारहाण,रुग्णालयांची तोडफोड करणे हे योग्य नाही.रुग्णासाठी प्रत्येक क्ष् ण हा महत्वाचा असतो.न्यायालयांना तरी १५-१५ वर्षांचा कालावधी एखाद्या जजमेंटसाठी लागू शकतो किवा सर्वोच्च न्यायालयात मग आणखी उशिर होतो न्याय मिळण्यात,आम्हाला तर ५ मिनिटे ही वेळ मिळत नाही.

आज राजकीय नेते हे देखील संरक्ष् ण घेऊनन फिरतात,त्यांना जनतेकडून धोका आहे का?पुढे पत्रकारांना देखील सरंक्ष् ण घेऊन फिरण्याचे दिवस येऊ शकतात,ही प्रवृत्ती वेळीच थांबवता आली पाहिजे,यातच समजाचेही हित आहे,असे ते म्हणाले.

यावर डॉ.लद्दड यांनी १५ वर्षांपूर्वी हेच बाबा रामदेव नागपूरात कस्तूरचंद पार्कमध्ये शिबिरासाठी आले होते व योगामुळे कर्करोग बरा होत असल्याची वलग्ना केली होती.त्यावेळी नागपूर इंडियन मेडीकल असोशिएशनने त्यांना आम्ही ४ कर्करोगाचे रुग्ण व त्यांचे संपूर्ण केस पेपर तुमच्या हरिद्वारच्या शिबिरात पाठवतो योगामुळे त्यांना पूर्ण बरे करुन दाखवा असे आव्हान खुल्या मैदानात दिले होते,ते आव्हान त्यांनी स्वीकारलेही होते मात्र यांनतर त्यांनी विषयच नाही काढला,त्यांना तीन वेळा याबाबत स्मरणपत्र पाठवले पण एकाचेही उत्तर या बाबांनी दिले नसल्याचे डॉ.लद्दड यांनी सांगितले.सातत्याने चुकीची विधाने करुन नंतर आपली सूटका करुन घेण्यात हा योग गुरु माहीर असल्याची पुश्‍ती त्यांनी जोडली.

डॉ.अनिल लद्दड यांनी तक्ररींसाठी या देशात एक व्यवस्था निर्धारित आहे मात्र त्याचा वापर होत नसल्याचे सांगितले.देशभरात डॉक्टर्सवर हल्ले करणारे हे शिक्षित अशिक्षित,गरीब,श्रीमंत,सर्वच वर्गातील सर्वच स्तराच्या व्यक्ति असल्याचे सांगितले.डॉक्टर्स विरोधात करण्यात येणा-या ९५ टक्के तक्रारी या खोट्या तर ५ टक्के या ख-या असतात.कोविड महामारीत जनतेवर जे संकट ओढवलं त्यात जीव वाचवण्यासाठी एकमेव क्षेत्र उपलब्ध होते,वैद्यकीय क्षेत्र मात्र या वैद्यकीय क्षेत्राला जेवढा पाठींबा मिळायला हवा होतो,तेवढा मिळालाच नाही.मला आपल्या वैद्यकीय क्षेत्राचा अभिमान आहे मात्र आमच्या क्षेत्राने या महामारीच्या काळात केलेल्या अभूतपूर्व कामांना ना शासन ना प्रशासनाकडून कौतूक प्राप्त झाले!

प्रशासनाला जेव्हा गरज होती तेव्हा मदत घेतली,गरज संपली तेव्हा प्रशासनाने ‘यू-टर्न’ घेतला.एवढा संशय जनमाणसात आमच्या क्षेत्राविषयी दाटून आला की शेवटी आम्हाला न्यायालयात धाव घ्यावी लागली,हे आमच्या क्षेत्राचे केवढे मोठे दूर्भाग्य आहे.एका दिवसात साढे सात हजार बाधित रुग्ण आढळत होते आणि अश्‍यावेळी खासगी रुग्णालयात ६ पटीने जरी बेड्स वाढवले तरी ते अपूरे पडत होते,हीच वास्तवता आहे.

रुग्णालयांच्या दाराशी येणा-या रुग्णांना अनेक खासगी रुग्णालयांनी वेटिंग रुममध्येही ऑक्सीजन लावलेत.आमच्यासाठी जीव वाचवणे हे महत्वाचे होते मात्र त्यातील काही रुग्ण हे खरंच गंभीर होते ,त्यांचा मृत्यू ही झाला,तेवढ्या तीव्रतेने ऑक्सीजन त्यांना नाही पूरवू शकलो मात्र इतरांचे तर आम्ही प्राण वाचवलेत!आम्हाला या कामाचा पुरस्कार नाही हवा मात्र दोन कौतूकांचे शब्द तरी आमच्या वाट्याला आलेत का?ना शासन ना प्रशासनाने आमचे कौतूक केले.फक्त समाजाने काही प्रमाणात दखल घेतली.

आमच्या चारच मागण्या आहेत.सेंट्रल प्रोटेक्शन एक्ट भारतात लागू करा.इंडियन पिनल कोडमध्ये या एक्टचा समावेश करा,महाराष्ट्र सरकारने स्टेट रिझर्व पोलिसांकडून रुग्णालयांना सुरक्षा पुरविली होती,तीच सुरक्षा पुन्हा लागू करावी तसेच फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापून डॉक्टर्सवरील हल्ल्यांचे प्रकरण सुनावणीला आल्यास दोषींना त्वरीत शिक्षा मिळावी.याच मागण्यांसाठी येत्या १८ जून रोजी सकाळी ८ ते २ वाजे दरम्यान संपूर्ण देशभरात आयएमएचे सदस्य हे काम बंद आंदोलन करणार आहेत,अशी माहिती त्यांनी दिली.
जनतेला त्रास व्हावा,अशी आमची ईच्छा नाही मात्र सरकारने आमच्या मागण्यांची दखल जर घेतली नाही तर आंदोलनाची धार ही आणखी तीव्र करण्यात येईल,असा इशारा ही त्यांनी दिला.

यावेळी बोलताना आयएमएच्या माजी अध्यक्ष् डॉ.अर्चना कोठारी म्हणाल्या,की डॉक्टर्स काय कोणालाही मारहाण होणे ही बाब अतिशय निंदनीय व निषेधार्ह्य आहे.आम्ही जर ठरवलं रुग्णांवर उपचार करणार नाही तर कसं होणार?१० वर्ष अभ्यास करुन आम्ही डॉक्टरची पदवी मिळवत असतो मात्र नंतर हताश ही होतो,का या व्यवसायात आलो?लोकांनी डॉक्टर्सवर हात उचलण्या आधी विचार करावा.निषेधाची वेळ आणताच कशाला?माध्यमांकडून जनजागृतीची अपेक्षा ही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

Latest बातम्या