Homeनागपूर न्यूजबसपा नेत्यांचे पुतळे जाळले

बसपा नेत्यांचे पुतळे जाळले

कार्यकर्ते संतप्त: जोरदार नारेबाजीही

नागपूर: एकेकाळी महाराष्ट्रात अत्यंत प्रभावी असलेला बहूजन समाजवादी पक्षाची स्थिती आता दारुण झाली आहे. पक्षाची ही अवस्था नेत्यांमुळे झाली असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. २०१४ च्या विधानसभेच्या निवडणूकीपेक्षाही कमी मतदान २०१९ च्या निवडणूकीत बसपाला झाले. यामुळे बसपा कार्यकर्त्यांनी टेकानाका परिसरात प्रदेशाध्यक्ष् ॲड. संदीप ताजने आणि प्रभारी व राज्यसभाचे खासदार ॲर.वीरसिंग या नेत्यांचे मंगळवार दि. ५ नोव्हेंबर रोजी प्रतिकात्मक पुतळे जाळले.

यापूर्वी पक्षाध्यक्षा मायावती यांनी नेमलेल्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला जायचा. आता कॅडरबेस व शिस्तीत असलेल्या या पक्षातील कार्यकर्ते  पदाधिकाऱ्यांचे पुतळे पेटवित आहे. पक्षात असा प्रकार पहिल्यांदाच घडला असून या दोन्हीविरुद्ध जोरदार नारेबाजीही करण्यात आली.

बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांचा शब्द अखेरचा असतो. त्यांनीच महाराष्ट्रातील निवडणुका संपल्यानंतर अॅड. संदीप ताजने यांची प्रदेशाध्यक्षपदी व खासदार अॅड. वीरसिंग यांची परत प्रदेश प्रभारीपदी नेमणूक केली. त्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांतील संताप बाहेर आला. पक्षातून निलंबित माजी प्रदेशाध्यक्ष व उत्तर नागपुरातून पराभूत उमेदवार सुरेश साखरे यांना मतमोजणीच्या दिवशी तडकाफडकी हटविण्यात आले. तेव्हापासून सुरू झालेला हा कलह दिवसेंदिवस अधिक स्फोटक होत आहे.

एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत पैसे मागण्याचा गंभीर आरोपही करण्यात आला. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध पत्रकबाजी सुरू आहे. गेल्या काही वर्षांत पक्षाची झालेली पिछेहाट व होणारे आरोप बघता कार्यकर्तेही प्रचंड नाराज झाले आहेत. त्यामुळेच ते आता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ऐकून घेण्याचा मनस्थितीत नाहीत. प्रदेशाध्यक्ष अॅड. ताजने यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी अमरावती येथे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. तेव्हापासून आता प्रत्येक ​जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांविरुध्द संताप व्यक्त करीत आहेत. प्रभारी अॅड. वीरसिंह हे गेल्या १३ वर्षांपासून राज्याचे प्रभारी आहेत. मात्र, त्यांनी पक्ष बळकट करण्याऐवजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये भांडणे लावली, असा आरोप होत आहे. नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात बसपाची जी अवस्था झाली त्यावरून कार्यकर्त्यांचा संताप उफाळून येत असून, नेत्यांना बदडण्याची भाषा करीत आहेत.

कुठल्याही निवडणुका संपल्या की अॅड. वीरसिंह दोन ते तीन महिने ढुंकूनही पाहत नाही. वातावरण शांत झाल्यावर आढावा व कार्यकर्ता बैठक होते, अशी  कार्यकर्त्यांची जाहीर भावना आहेत. त्यामुळे पुढील काळात प्रदेशाध्यक्ष अॅड. ताजने व प्रदेश प्रभारी अॅड. वीरसिंह यांना राज्यात पक्षकाम करण्यात अनंत अडचणी येतील, याचे हे संकेत आहेत. या आंदोलनात ​जिल्हा प्रभारी उषा बौद्ध, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गजभिये, उत्तर नागपूर अध्यक्ष राजेश नंदेश्वर, नगरसेवक इब्राहीम टेलर, तपेश पाटील, उमेश मेश्राम, चंद्रशेखर भंडारे, दीपक खंडारे, विजय कैकाडे, आशिष सोमकुंवर, बळवंत राऊत, अक्षय जांभुळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

ॲड.ताजने यांना अमरावतीत मारहाण झाली होती-
प्रदेशाध्यक्ष् ॲड. ताजने यांना विधानसभा निवडणूकीपूर्वी अमरावती येथील कार्यकर्त्यांनी देखील मारहाण केल्याची घटना ताजीच आहे. याच नेत्याला पुन्हा प्रदेशाध्यक्ष् सारख्या पदावर मायावतींनी नेमल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. ॲड.वीरसिंह यांचा पूर्ण पाठींबा ताजने यांना सुरवातीपासूनच होता. आता जिल्ह्यातील कार्यकर्ते अश्‍या पदाधिकारी यांच्या विरोधात संताप व्यक्त करीत आहेत. प्रभारी ॲड.वीरसिंह हे गेेल्या बारा वर्षांपासून महाराष्ट्राचे प्रभारी पद भूषवित आहेत ते अजून किती वर्षे प्रभारी पदावर कायम असतील,असा संताप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी राज्यात पक्ष् बळकट करण्याऐवजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये भांडणे लावण्याची कार्य केली असा आरोप कार्यकर्त्यांनी केला.

……..

Latest बातम्या