Homeनागपूर न्यूजफक्त सहानुभूती घेण्यासाठी युतीची बदनामी:आ.जयसवाल यांचा आरोप

फक्त सहानुभूती घेण्यासाठी युतीची बदनामी:आ.जयसवाल यांचा आरोप

रश्‍मी बर्वे प्रकरण: जात वैद्यता प्रमाणपत्र रद्द होणे ही इतिहासातील पहीलीच घटना नव्हे

नागपूर,ता.४ एप्रिल २०२४: माझ्या ओळखीतील धूर्वे नावाच्या महिला या खरोखर आदिवासी असताना त्यांचे देखील जात वैद्यता प्रमाणपत्र रद्द झाले होते.अनेक पक्षांच्या अनेक पदाधिका-यांवर अशी वेळ आली आहे,जात वैद्यता प्रमाणपत्र रद्द होण्याची पहीलीच वेळ नाही तर फक्त सहानुभूती घेण्यासाठी काँग्रेसच्या रश्‍मी बर्वे या युतीची बदनामी करीत असल्याचा आरोप ,आज रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल यांनी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे उपस्थित हाेते.

याप्रसंगी बोलताना जैस्वाल म्हणाले,की रामटेक लोकसभा मतदारसंघात ब-याच अंशी भ्रम पसरविण्याचे काम सुरु आहे.त्यामुळेच सत्य समोर आणावे यासाठी पत्रकार परिषद घेत आहोत.रामटेक निवडणूकीत महायुतीचे उमेदवार राजू पारवे तसेच काँग्रेसचे उमेदवार श्‍याम बर्वे रिंगणात आहेत.रश्‍मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे.त्या माझ्याच रामटेक मतदारसंघातून जिल्हा परिषदेत निवडून आल्या आहेत.जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष देखील झाल्या.त्यांच्याविरुद्ध भाजपने नव्हे तर कोराडीतील सुनील साळवे यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली व त्या आधारावर जात वैद्यता पडताळणी समितीकडे तक्रार नोंदवली.ते खूप दिवसांपासून या माहितीच्या मागे लागले होते.

आम्हाला तर माहिती देखील नव्हती मात्र,साळवे या सामाजिक कार्यकर्त्यांनी अपील टाकल्यानंतर माहिती आयुक्तांनी तपास करण्याचे आदेश दिले.वेगवेगळ्या टप्प्पयावर चौकशी सुरु होती.जात वैद्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचेच आदेश आहेत की कुठल्या ही जात वैद्यता प्रमाणपत्राचा कोणत्याही निवडणूकीत चुकीचा उपयोग होऊ नये.अशी तक्रार आल्यास ते प्रमाणपत्र सरळ जप्त करावे,वाटल्यास योग्य तपासणीनंतर ते परत द्या.

मूळात जात वैद्यता समितीचे गठन हे काँग्रेसच्या काळात झाले आहे.जातीच्या आरक्षणाचा कोणीही चुकीचा लाभ घेऊ नये यासाठी कलम ७(१)अन्वये न्यायालये सुमोटो घेऊ शकते.जगातील कुठल्याही व्यक्तीने माहिती दिल्यास जात पडताळणी होऊ शकते,जात प्रमाणपत्र रद्द होऊ शकतं.जात पडताळणी समिती ही स्वतंत्र विंग असल्याचे जैस्वाल यांनी सांगितले.

माझ्या मतदारसंघात संजय देवाळे हे सरपंच असताना त्यांचे देखील जात वैद्यता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले होते.त्यामुळे जगातील रश्‍मी बर्वे यांची पहीली केस नाही.भाजप,शिवसेना इत्यादी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांच्या विरोधात समितीने कारवाई केली आहे.

असे असताना, अनुसूचित जातीच्या महिलेवर अन्याय करण्यात आला,असे चुकीचे चित्र निर्माण केले जात असल्याची टिका त्यांनी केली.बर्वे यांच्या ऐवजी दूसरा उमेदवार जो उभा आहे तो ही अनुसूचित जातीचाच नाही का?बर्वे यांच्या जातीच्या संदर्भात आम्ही आक्षेप घेतला नसल्याचे त्यांनी सांगितलले.१० ऑगस्ट १९५० पूर्वीच्या रहीवाश्‍यांना अनुसूचित जाती-जमातीचे प्रमाणपत्र दिले जाते.ओबीसी यांच्यासाठी ही अट १९६७ पूर्वी,ही आहे.आज पर्यंत शेकडोच्या संख्येने जात वैद्यता प्रमाणपत्रे रद्द झालीत.चार वर्ष अवैद्यरित्या पदावर राहील्याने वैद्य ठरणार का?असा प्रश्‍न त्यांनी केला.

या प्रकरणात ते कोर्टात गेले.तीन वेळा त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला.आजही कोर्टाने त्यांना दिलासा दिला नसल्याचे जैस्वाल यांनी सांगितले.हायकोर्टाने त्यांचा उमेदवारी अर्ज रि-स्टोर केला नाही.देशात न्यायव्यवस्था भक्कम आहे.खोटे कागदपत्रे जोडून,फसवणूक करुन,चारशे विशी करुन,महाराष्ट्राचे रहीवाशी असल्याचे दाखवून,खोटी वंशावली उभी करुन,मध्यप्रदेशचे कागदपत्रे लपवून,शिक्षण लपवून,वडीलांना अशिक्षीत सांगून,बर्वे यांनी महाराष्ट्राची फसवणूक केली असल्याचा आरोप जैस्वाल यांनी केला.

मी सगळी कागदपत्रे बोलावली आहे.भारतात कायद्याचे राज्य आहे.योग्य वेळी चपराक बसते व योग्य निर्णय होतो.आम्ही राजकीय जीवनात काम करतो.महाराष्ट्रात जात पडताळणीसाठी विंग आहे.अनेकांनी खोटी कागदपत्रे देऊन जात प्रमाणपत्रे मिळवली होती.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही विंग काम करते.मात्र,फक्त सहानुभूती घेण्यासाठी रश्‍मी बर्वे या खोटा प्रचार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.साळवे हे याचिकाकर्ते आहेत भाजप नव्हे किवा युतीचे आमदार राजू पारवे हे नव्हे,असे जयसवाल यांनी सांगितले.युतीविषयी चुकीचे भ्रम निर्माण केले जात आहे. जात वैद्यता प्रमाणपत्राबाबत सरकार निर्णय घेत नसते,असे ते म्हणाले.निवडणूकीच्या तोंडावर रश्‍मी बर्वे या जातीचे भांडवल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.न्यायालय जो निर्णय देतील ताे निवडणूकीत लागू होईल.जिल्हा परिषदेतील माझ्या ही पक्षाच्या अनेकांचे जात प्रमाणपत्र रद्द झाले आहेत.नुकतेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोवारी समाजाचे जात प्रमाणपत्रही रद्द झाले.

महायुतीच्या उमेदवाराची म्हणजे राजू पारवे यांची मते मिळवण्याची लायकी नाही,असा भ्रामक प्रचार ते करीत आहेत.अमरावतीच्या माजी खासदार व भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत छेडले असता,दुटप्पी भूमिका घ्यायची नसते,एक तर सांगून टाका न्यायालयावर विश्‍वास आहे की नाही?असे सांगत, राणा यांना अंतरिम स्थगिती मिळाल्याचे जयसवाल यांनी सांगितले.राणा या १९५० पूर्वीचे दाखले देतील तर ते सिद्ध होईल नसेल तर दीर्घकाळ खोटे टिकू शकत नाही,असे जयसवाल म्हणाले.‘सत्य परेशान हो सकता है पराजित नही’,अशी पुश्‍ती त्यांनी जोडली.नवनीत राणाच कशाला सगळ्याच पक्षातील शेकडो उमेदवार जात वैद्यता प्रमाणपत्राच्या बाबतीत अपात्र ठरु शकतात,असे ते म्हणाले.

काँग्रेसचे उमेदवार श्‍यामकुमार बर्वे यांच्यावर शेकडो गुन्हे दाखल आहेत,याकडे लक्ष वेधले असता,रामटेक हा प्रभू श्रीरामाचा गड आहे.वनवास भोगत असताना प्रभू श्रीरामाने या ठिकाणी काही काळ वास्तव्य केलं होतं म्हणूनच हे स्थळ ‘रामटेक’ म्हणून प्रसिद्ध आहे.अश्‍या ठिकाणचे मतदार हे गुन्हेगारी पाश्‍वभूमीच्या उमेदवाराला निवडून देतील का?संपूर्ण देश हा राममय झाला असताना रामटेक मधून गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उमेदवार असावा का?श्‍याम बर्वे यांच्या प्रतिज्ञापत्रात ४० पेक्षा जास्त गुन्हे त्यांच्यावर दाखल असल्याचे नमूद आहे.निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर कोणीही हे बघू शकतो.ज्या रामाला आपण आदर्श मानतो त्या रामटेकमधली जनता अश्‍या पार्श्वभूमीच्या खासदाराला निवडतील का?असा प्रतिप्रश्‍न याप्रसंगी आ.जयसवाल यांनी केला.
……………………………

Latest बातम्या