Homeनागपूर न्यूजदक्षिण-पश्‍चिममध्ये ’सीएमची’ लढाई ’सीएम’ सोबत:आशिष देशमुख

दक्षिण-पश्‍चिममध्ये ’सीएमची’ लढाई ’सीएम’ सोबत:आशिष देशमुख

नागपूर: नुकतेच एका सभेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशिष देशमुख,नाना पटोले हे पळपुटे आहेत, लांडगे आहेत असे शब्दप्रयोग केले,मी एक सामान्य नागरिक आहे आणि ते फार मोठे नेते आहेत मात्र तरीही मी त्यांना सांगू इच्छितो दक्षिण-पश्‍चिमध्ये मी एक सामान्य नागरिक म्हणून लढत असून ही एका कॉमन मॅनची चीफ मिनिस्टरसोबत म्हणजेच एका ‘सीएमची’ लढाई ’सीएम’ सोबत होत आहे आणि या लढतीत कॉमन मॅन विजयी झाल्याशिवाय राहणार नाही असे विधान काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांनी केले.

सोमवारी प्रेस क्लब येथे दूपारी १२.३० वा. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची पत्र परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यांना यायला उशिर होता, या दरम्यान देशमुख यांनी पत्र परिषदेला संबोधित केलं. पुढे आशिष देशमुख म्हणाले,की मुख्यमंत्री हे बाहेरचे उमेदवार असून गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी नागपूरातील आपले घर बंद करुन मुंबईला मुक्काम हलवला आहे, मुंबईमध्येच ते स्थायिक झाले आहेत. मुंबईकर मुख्यमंत्र्यांना नागपूरचे मतदार हे का म्हणून मत देतील? असा सवाल त्यांनी केला. शरद पवार हे कधीही आपले बारामतीचे घर बंद करुन दिल्लीला नाही गेलेत किवा नाना पटोले हे देखील घर बंद करुन इतर ठिकाणी स्थायिक झाले नाहीत मात्र मुख्यमंत्री हे मुंबईकर झाल्यानंतरही नागपूरवरुन निवडणूक लढत आहेत.दक्षिण-पश्‍चिम मतदार संघात यावेळी जबरदस्त परिर्वतन बघायला मिळणार असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या पराभवाचा एक नवा इतिहास नागपूरकरच घडवतील असे देशमुख म्हणाले. याला कारण सर्वच वर्गांची मुख्यमंत्र्यांवर पराकोटीची नाराजी आहे. ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’आंदोलनकर्ते त्यांच्यावर नाराज आहेत, अवाजवी जीएसटी लादून व्यापारी वर्गाची त्यांनी नाराजी ओढवून घेतली आहे,नोटबंदीमुळे लहान व्यापारी उधवस्त झालेत, रोजगाराची कोणतीही संधी उपलब्ध करुन दिली नसल्यामुळे तरुण वर्ग हा मुख्यमंत्र्यांवर नाराज आहे. नवे कोणतेही उद्योग शहरात आले नाहीत, त्यांचा कार्गो हब म्हणजे फक्त धावपट्टी झाली आहे,निवडणूकीच्या धाव पट्टीवर मुख्यमंत्री यांचेच विमान क्रॅश लॅण्ड होणार असल्याची कोटी त्यांनी केली. सामान्य माणसाच्या घरापर्यंत आर्थिक संपंन्नता आणण्यासाठी मुख्यमंत्री यांनी काहीच केले नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. समाजातील सर्वच घटकांवर त्यांनी अन्याय केला असल्याचे ते म्हणाले.

बावणकुळे यांच्यावर अन्यायच!
राज्याचे उर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्यावर देखील मुख्यमंत्री यांनी अन्याय केल्याचा आशिष देशमुख यांनी आरोप केला.बावणकुळेंवर झालेल्या अन्यायामुळे समाजातील एक घटक आणखी नाराज झाला.बावणकुळे यांचे फक्त मंत्रीपदच नव्हे तर मुख्यमंत्री यांनी आमदारकीही घेतली. ‘रेरा’कायद्यामुळे बिल्डर वर्गही चांगलाच नाराज आहे.परिणामी मुख्यमंत्र्यांचे पारंपारिक मतदार व विरोधक सगळेच मिळून मुख्यमंत्र्यांच्या पराभवाचा इतिहास घडवणार असल्याचे ते म्हणाले. येत्या २४ तारखेला निवडणूकीच्या निकालात तुम्हाला दक्षिण-पश्‍चिममधून आशिष देशमुख हे विजयी झाल्याचे चित्र दिसेल असा आशावाद ही व्यक्त करण्यास ते विसरले नाही. ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’आंदोलनाला तुमचा पाठींबा आहे का? या प्रश्‍नाला मात्र बगल देत,काँग्रेस ही काही सत्तेत नाही. फक्त सर्वच नाराज घटक एकत्रित येऊन मुख्यमंत्री यांचा पराभव करणार आहेत हे मात्र निश्‍चित असे ते म्हणाले.

Latest बातम्या