Homeनागपूर न्यूजगडकरींच्या मंत्रालयाचा एक लाख कोटींचा गैरव्यवहार!

गडकरींच्या मंत्रालयाचा एक लाख कोटींचा गैरव्यवहार!

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा यांनी फोडला नागपूरात आरोपांचा बॉम्ब

नागपूर,ता. १५ एप्रिल २०२४: केंद्रिय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयात भारतमाला परियोजनेत,द्वारका एक्सप्रेस महामार्ग तसेच राष्ट्रीय महामार्गांमध्ये एक लाख कोटींचा गैरव्यवहार झाला असून, कोणत्याही निविदांशिवाय खोट्या कागदपत्रांच्या आधारावर अनेक कंपन्यांना फायदा पोहोचविण्यात आला,पर्यावरण तसेच वनासंबंधीच्या सगळ्या नियमांची अक्षरश:धज्जीया उडवण्यात आली,केबिनेट कमेटी ऑफ एकॉनोमिक्स अफेअर्सनी दिलेल्या दोन लाख कोटींच्या कामांची परवानगी बाजूला सारुन, ९० हजार कोटींच्या अधिकच्या रोख्यांची अधिकची उचल केली.निविदेमध्ये जो विस्तृत प्रकल्प अहावाल असतो तो ही बोगस असून या संपूर्ण व्यवहाराला ‘सॉवरिंग‘ गॅरेंटी म्हणजे शासनाची परवानगी नसेल तर हे रोखे विकत घेणा-यांच्या कंपनींनी परतफेड कशी होणार?गडकरींच्या मंत्रालयाचा हा संपूर्ण बोगस कारभार असल्याचा उल्लेख डिसेंबर-२०२३ च्या कॅगच्या अहवालात असून,आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व काँग्रेस कमेटीचे सदस्य पवन खेडा यांनी प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन या अहवालातील अनेक गैरव्यवहारांवर कठोर ताशेरे ओढले.

याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की,प्रत्येक किलोमीटर मागे १३ कोटी ९८ लाख रुपयांच्या कामांची मंत्रीमंडळाची मंजुरी असताना २३ कोटी ८९ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे कॅगच्या अहवालात नमूद आहे.याचा अर्थ प्रत्येक किलोमीटर मागे गडकरी यांच्या विभागाने १० कोटी रुपये अतिरिक्त खर्च केले.आम्ही जेव्हा २०१४ मध्ये सत्ता सोडली तेव्हा राष्ट्रीय महामार्ग(एनएचएआय)विभागावर ४० हजार कोटींचे कर्ज होते.गडकरी यांनी हे मंत्रालय सांभाळल्यानंतर आता ३८ हजार कोटी हा विभाग फक्त व्याज भरतोय याचा अर्थ किती लाख कोटींची उचल या विभागाने गेल्या दहा वर्षात केली,याचा हिशेब मोदी सरकार देईल का?असा सवाल त्यांनी केला.कॅगच्या अहवालानुसार गरज नसताना अनेक महामार्गांवर जास्त रहदारी दाखविण्यात आली,जिथे रस्त्यांची गरज नव्हती तिथे देखील रस्ते बांधण्यात आले.जीएसटी दोन दाखविण्यात आल्या.टोल पेक्षा जास्त व्याज वसूली,३५ गोडाऊन बांधण्यात येणार होते मात्र मार्च २०२३ पर्यंत राष्ट्रासाठी नितांत गरजेचे हे वेअर हाऊसेस बांधण्यातच आले नाहीत. रस्ते बांधताना सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली करण्यात आली.निविदांचे स्पेशिफिकेशन ठेकेदारांकडून झालेच नाही इत्यादी अनेक मुद्दांचा त्यांनी उहापोह केला.

आता कुठे आहे ईडी?सीबीआय?प्राप्ती कर विभाग?का नाही ईडीची नोटीस गडकरींना गेली?आमच्या पक्षाचे अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेलेत आणि पवित्र झालेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता जेव्हा-जेव्हा भ्रष्टाचारावर बोलतात तर देशातील नागरिकांना आता हसू येतं.मोदी सरकारचा कार्यकाळ म्हणजे ‘धंदा व चंदा’चा कार्यकाळ राहीला असून, देशातील विविध उद्योजकांना धमक्या द्या,चंदा वसूल करा,ईडीची चौकशी लावा चंदा वसूल करा,गडकरी यांचा एनएचएआय या विभागातील भ्रष्ट कारभाराची ही फक्त एक झलक आहे,संपूर्ण मोदी सरकारच्या विविध विभागांचा कारभार असाच चालतो.मोदींनी उत्तर द्यावे देशाच्या प्रत्येक जिल्हात भाजपचे पंचतारांकित कार्यालय कसे बनले?असा सवाल त्यांनी केला.

मोदींचा कारभार ‘बाय वन गेट वन फ्रि’असा असून भाजपला मतदान करा संघाचे काम नि:शुल्क होतो,अशी टिका करीत दहा वर्ष खूप झाला असा कारभार, आता देशात बदल गरजेचे असल्याचे पवन खेडा म्हणाले.आता मतदान बदला,सरकार बदला असे आवाहन करीत, देश आज खूप संकटाच्या परिस्थितीतून जात असल्याचे त्यांनी सांगितले.देशाचा संविधान वाचेल की नाही यावर फार मोठे प्रश्‍नचिन्ह लागले आहे.कालच मोदींनी राजस्थानमध्ये प्रचार सभेत टिपेचा सूर लावित,स्वत:बाबासाहेब आंबेडकर जरी आले तरी ते ही संविधान बदलू शकत नसल्याचे सांगितले मात्र,कालच अयोध्येत भाजपचे खासदार लालू सिंग यांनी मोदींना ४०० जागा द्या आम्ही संविधान बदलू,असे विधान केले आहे.या पूर्वी देखील ज्योति निधी तसेच कर्नाटकचे मोठे नेते अनंत हेगडे यांनी देखील हेच विधान केले होते.त्यांचे श्रीरामाची भूमिका,मालिकेत वठवणारे उमेदवार अरुण गोविल हे दलितांच्या वस्तीत तर प्रचारासाठी गेले मात्र,त्यांच्या घश्‍या खालून दलितांनी दिलेला घास उतरत नव्हता.

महत्वाचे म्हणजे कालच मोदींनी देशाप्रति आपले संकल्प पत्र जाहीर केले मात्र,दहा वर्ष सत्तेत असणा-यांनी दहा वर्षात देशासाठी काय-काय केले याचा लेखाजोखा देशातील नागरिकांसमोर मांडण्याची तसदीही नाही घेतली.मोदींची गॅरेंटी देताना दहा वर्षात काय केले हे तर सांगायचे होते,अशी टिका त्यांनी केली.

या देशात पहील्यांदा असे घडतंय की दोन पांढ-या दाढीचे नेते संविधान,आरक्षण इत्यादी विषयीचे धोरण निश्‍चित करतात.मोदी सरकारच्या धोरणांवर कॅगचे अहवाल प्रसिद्ध होऊन देखील संसदेत यावर चर्चा देखील केली जात नाही.आमच्या काळात कॅगच्या अहवालावार संपूर्ण संसद डोक्यावर घेतली जात होती,रस्त्यांवर आंदोलने केली जात होती,या अहवालावर कृती देखील केली जात होती.डिसेंबर -२०२३ च्या कॅगच्या अहवालात गडकरी यांच्या मंत्रालयाच्या भारतमाला परियोजनेवर ताशेरे ओढले असून हजारो कोटींची कामे बोगस कागदपत्रांच्या आधारावर देण्यात आले,ये ‘बनाना रिपब्लीक है क्या?असा सवाल त्यांनी केला.देशातील लाखो हेक्टर जंगल या विभागाने नष्ट केल्याचा आरोप खेडा यांनी केला.

राहूल गांधींनी पाच न्यायाची हमी देशातील नागरिकांना दिली आहे.दर एका तासाला दोन तरुणांची तर दर एका दिवसात देशातील ३० शेतकरी आत्महत्या करीत आहेत.आम्ही ३० लाख नोक-या देणार असून आज देशात ३० लाख सरकारी पदे रिक्त आहेत,ती सर्व आम्ही भरणार.महिलांना दर वर्षी एक लाख रुपये देणार असून,युवा,शेतकरी,महिला,ओबीसी या सर्व वर्गांच्या उत्थानासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे खेडा यांनी सांगितले.

भाजप ही अभेद नाही,भाजपाला या साठी हरवता येत नाही कारण काँग्रेसमध्येच गटातटाचे राजकारण चालतं,स्वत: माजी पंतप्रधान एच.डी.देवीगौडा यांनी खर्गे पंतप्रधान बनलेत तर राहूल गांधींना चालणार का?असा प्रश्‍न केला होता,याकडे लक्ष वेधले असता,२००४ मध्ये पंतप्रधानाचा चेहरा देशासमोर होता का?असा प्रतिप्रश्‍न त्यांनी केला.विरोधक मुद्दामुन गैरसमज पसरवतात,२००४ मध्ये गांधी परिवारातील सदस्य पंतप्रधान नव्हते बनले असे सांगून,आमच्या ही पक्षात संवाद-वाद होतो,चर्चा होते परंतु संवादाद्वारे आम्ही आमचे वाद सोडवून देखील देतो,नागपूरात बसून तुम्ही विचारता की काँग्रेसमध्ये अंतर्गत गुटबाजी आहे तर,गडकरी यांना तर भाजपच्या संसदीय समितीवरुन बाहेर काढण्यात आले,का काढले बाहेर त्यांना?असा प्रश्‍न त्यांनी केला.

गडकरी जेव्हा भाजपचे अध्यक्ष होते तेव्हा ही त्यांना अध्यक्ष पदावरुन पायउतार व्हावे लागले होते.आम्हाला चांगल्याने आठवतं त्यांच्या विरोधात राण पेटविण्यासाठी भाजपचे मोठे नेते जे आज फार-फार मोठे नेते झाले आहेत आम्हाला रसद पुरवायचे गडकरींच्या विरोधात प्राप्ती कराचे कागद घेऊन आम्हाला शोधायचे की यावर बाेला,देशाला गडकरींचा कारभार सांगा,पण काँग्रेस पक्षात असं घडत नाही.पाठीवर वार आम्ही करीत नाही,मग गटबाजी तिथे नाही का?असा सवाल त्यांनी केला.(गडकरी हे भाजपाचे अध्यक्ष असताना त्यांच्या ‘पूर्ती बिग बाजार‘या प्रकल्पांना घेऊन देशात रान उठले होते,हे विशेष)

मोदींच्या काळात ४५ वर्षांच्या बेरोजगारीचा रेकॉड तुटला असल्याची टिका त्यांनी केली ६५ टक्के देशातील युवा हा बेरोजगार आहे.आम्ही आमचे न्यायपत्र घेऊन जनतेला इंडिया आघाडीला मत देण्याचे आवाहन करीत आहोत.नागपूर हे भौगोलिकदृष्टया देशाचे ह्दयस्थळ आहे.देशाच्या रक्तवाहीन्या नागपूरपासूनच वाहतात.नागपूरचे नागरिक हे तय करतील की यंदा सरकार बदलायची आहे तर सरकार निश्‍चितच बदलेल,असे हेडा यांनी सांगितले.

मोदींच्या ८० कोटी गरीबी रेषे खालील जनतेला आणखी पाच वर्ष मोफत धान्याची योजना या विषयी छेडले असता,मोदी सरकार जर यालाच आपली उपलब्धी समजत असेल तर याहून लज्जास्पद दुसरी कोणतीही गोष्ट नाही,अशी टिका त्यांनी केली.२०१४ मध्ये देशातील नागरिकांनी मोदींना ऐकून घेतले,२०१९ मध्ये मोदींच्या वचनांनी त्यांचे मनोरंजन केले आता लोकांना राग येऊ लागला आहे,अशी पुश्‍ती त्यांनी जोडली.

मोदींनी तर ’गॅरेंटी’हा शब्द ही आमच्यापासून चोरला असल्याचा आरोप त्यांनी केला.तेलंगणा,कर्नाटक,हिमाचल प्रदेश निवडणूकीत सर्वात आधी काँग्रेस पक्षाने हा शब्द वापरला असल्याचा दावा त्यांनी केला.

निवडणूक रोख्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाची भूमिका व अपारदर्शी रोखे पद्धत बंद करण्याचा सर्वोच्च न्यायलयाचा निर्णय यावर मोदींनी नुकतेच एका प्रचार सभेत टिका केली याकडे लक्ष वेधले असता,पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीने देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर टिपण्णी करने योग्य नसल्याचे ते म्हणाले.

भाजपचे नेते विरोधकांवर टिका करताना ‘आधे जेल मे आधे बेल पर’ असणारे देशाचा काय विकास करतील?याकडे खेडा यांचे लक्ष वेधले असता,भाजपच्या ८ हजार ५५२ कोटींच्या वॉशिंग मशीनमध्ये धूवून निघाल्यानंतर कोणी मुख्यमंत्री बनलेत कोणी केंद्रात मंत्री बनले कोणी खासदार बनले,त्या मशीनमध्ये जो कोणी जातो तो भ्रष्टाचाराच्या आरोपातून स्वच्छ होतो,अशी खोचक टिका याप्रसंगी खेडा यांनी केली.

ईव्हीएमच्या प्रश्‍नावर बोलताना,देशातील १५ राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला संपूर्ण व्हीव्हीपॅटची देखील मोजणी करण्यासाठी पत्र लिहले मात्र,निवडणूक आयोगाने आमचे म्हणने ऐकूनच घेतले नसल्याचे त्यांनी सांागितले.

पंतप्रधान माेदी हे अनेक गॅरंटी जनतेला देत आहेत,लोकसभेची निवडणूक दर पाच वर्षानंतर होत असताना ते २०४७ पर्यतचे वायदे जनतेसोबत करतात,ते २०४७ पर्यंत पंतप्रधान पदावर राहणार आहेत का?असा सवाल त्यांनी केला.

एका प्रश्‍नाच्या संदर्भात बोलताना,देशाचे भविष्य हे विदर्भ तय करेल.वैदर्भिय जेव्हा मनावर घेतात तेव्हा चांगले-चांगले घाबरुन जातात,असे खेडा म्हणाले.

काँग्रेसकडे नेता नाही,नेतृत्व नाही अशी टिका होते,याकडे लक्ष वेधले असता अटल बिहारी यांच्या काळापासून हीच टिका काँग्रेसवर होते मात्र तरी देखील पन्नास वर्षांपासून काँग्रेसनेच देशाचे नेतृत्व केल्याचे त्यांनी सांगितले.

एका प्रश्‍नाच्या उत्तरात,पंतप्रधान मोदींना पाकिस्तानसोबत जास्त प्रेम आहे,त्यामुळेच न बोलवता ते जेवणासाठी शरीफ यांना भेटायला गेलेत.आम्हाला ते टूकडे-टूकडे गँग म्हणून हिणवतात मात्र,आम्हीच १९७१ चे युद्ध जिंकून दिले होते त्यामुळेच पाकिस्तान काँग्रेसच्या नावाने थरथर कापतो.या निवडणूकीनंतर मोदी यांनी पाकिस्तानात निघून जावे,अशी पुश्‍ती त्यांनी जोडली.

देशाच्या इतिहासात मोदी यांचा कार्यकाळ सदैव लक्षात राहील ज्यांनी पंतप्रधान पदी असताना एक ही पत्र परिषद घेतली नाही.देशाच्या जनतेला उत्तर दिले नाही.मोदी हे पत्रकार परिषदा घेत नाहीत मात्र ‘मन की बात’तर करतात,याकडे लक्ष वेधले असता,‘आपके मन की बात करते है क्या?’असे उपहासात्मक उत्तर त्यांनी दिले.

पत्रकार परिषदेत काँग्रेसचे मुख्य प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढेसोशल मिडीया सेलचे प्रमुख व सरचिटणीस विशाल मुत्तेमवार उपस्थित होते.

……………………………….

 

Latest बातम्या