
‘सत्ताधीश’सोबत साधला विशेष संवाद
डॉ.ममता खांडेकर
( Senior Journalist)
नागपूर,ता. १६ ऑगस्ट: ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार हे शहरातील एक बहूचर्चित व्यक्तिमत्व. गेल्या वर्षी पार पडलेल्या विधान सभेची निवडणूक त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दक्षिण -पश्चिम मधून लढली होती तेव्हा ही ते चांगलेच चर्चेत आले होते. आज दि. १६ ऑगस्ट रोजी त्यांनी पुन्हा विधिवत राष्ट्रवादीचे खासदार व ज्येष्ठ नेते प्रफूल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.यावेळी ’सत्ताधीश’ने त्यांच्याशी विशेष संवाद साधला.
प्र. पक्ष् प्रवेशासाठी राष्ट्रवादीच का?
उ. हा पक्ष् प्रवेश नाही,ही माझी घरवापसी आहे. १९९९ साली मी राष्ट्रवादीतच होतो.पाच वर्षे मी याच पक्षाचा कार्यकर्ता होताे. तेव्हा ही पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफूल्ल पटेल, विद्यमान गृहमंत्री अनिल देखमुख यांच्याच मार्गदर्शनात पक्षासाठी झटत होतो, मात्र तत्कालीन काही स्थानिक नेते यांच्याशी झालेल्या वैचारिक मतभेदामुळे मला पक्ष् सोडावा लागला.
तेव्हा देखील मी स्थानिक जनतेच्या प्रश्नांसाठीच आवाज उठवत होतो. राजकीय आणि सामाजिक जिवनात जनसामान्यांचे प्रश्न सोडवणे ही माझी पहीली प्राथमिकता होती,आहे आणि कायम असणार. मात्र काम करु दिले जात नव्हते. याच मुद्दावर पक्ष् सोडला व विचारधारेच्या साम्यतेमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश घेतला. मनसेत देखील काही स्थानिक नेत्यांना माझ्या कामांचा झपाटा सहन झाला नाही.शेवटी पाच वर्षे त्याही पक्ष्ासाठी झटलो मात्र तत्वांशी तडजोड न जमल्यामुळे त्याही पक्षातून बाहेर पडलो.
प्र.आता सरकार तुमचीच आहे,यावर काय मत आहे?
उ.मी नेहमीसारखाच प्रामाणिकपणे जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करील. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफूल्ल पटेल व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली २०० टक्के मी नव्या दमाने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देईल. पुढचा महापौर हा राष्ट्रवादीचा आणनार,हा मी शब्द दिला आहे. मराठी माणसाचा हा स्वभावच आहे की तो कोणाला समाेर जाऊ देत नाही,पक्षातर्गतच त्याचे पाय ओढणारे खूप लोकं असतात.मात्र माझा तेव्हा देखील खा.प्रफूल्ल पटेल व आ.अनिल देशमुख यांच्यावर विश्वास होेता,आज ही आहे.खा.पटेल यांच्यासोबत तर मी भंडारा जिल्हा बँकेच्या पॅनलवरही होतो. आ. अनिल देशमुख यांच्याशी देखील माझे सलोख्याचे संबंध आहेत.सर्वांच्या प्रयत्नातून शहरातच नव्हे तर नागपूर जिल्ह्यात जिथे जिथे माझी संघटना आहे तिथे तिथे पक्ष् आता बळकट करणार.
प्र.राष्ट्रवादीचा झेंडा पुन्हा खांद्यावर,काय सांगाल?
उ. राष्ट्रवादी पक्षाला मोठे करण्याचा प्रयत्न करणार.ज्या लोकांच्या समस्या संघटनेमार्फत सोडवण्यासाठी आंदोलन करीत होतो,ते आता सरकारच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करील.त्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करील.राष्ट्रवादी झेंड्याच्या खालील नेतृत्व हे मी मनापासून मान्य केलं आहे. शेवटी हा माझ्या काळजातला पक्ष् आहे. खा.प्रफूल्ल पटेल व आ.अनिल देशमुखच नव्हे तर महानगरपालिकेतील दुनेश्वर पेठे हे देखील माझे चांगले मित्र व सहयोगी राहीले आहेत. माझ्या अनेक आंदोलनात त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर आंदोलनात सहभाग नोंदवला.पक्षाच्या झेंड्याखाली जनतेच्या प्रश्नांना सोडविण्याचे बळ या पक्ष् प्रवेशामुळे मला आता प्राप्त झाले आहे.
राष्ट्रवादीत घरवापसी केल्यामुळे आता जनतेच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत.त्यांच्या अपेक्ष्ांवर खरे उतरण्याचा पूर्ण प्रयत्न करील आणि राष्ट्रवादी पक्ष् घरोघरी पोहोचवील.विदर्भात राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा प्रचंड जनादेश मिळवून देण्यासाठी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणार.पुन्हा एकदा शब्द देतो,पुढचा महापौर हा राष्ट्रवादीचाच असेल,अशी आमची आतापासूनच तयारी असणार आहे.भाजपच्या १३ वर्षांच्या सत्ताकाळात मनपात भ्रष्टाचार,खाबूगिरी आणि नागपूरकर जनतेच्या शोषणाशिवाय दूसरे काहीच घडले नाही. दुनेश्वर पेठे यासारख्या मित्रासोबत हा संबंध भ्रष्टाचार निखंदून काढण्याचा प्रण केला आहे.जनतेसमोर मनपामधील भ्रष्ट्राचाराचे सत्य मांडणार.

आमचे चॅनल subscribe करा