
भाजपमध्ये गेलेल्यांची घरवापसी शक्य
नागपूर, ता. १६: भाजपमध्ये गेलेल्यांची घरवापसी शक्य असल्याचे नमुद करीत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या‘ घरवापसी’ अभियानाबाबत राजकीय क्षेत्रात सुरू असलेल्या चर्चेला बळ दिले. सरकारबाबत भविष्यवाणी करणाऱेच भविष्याबाबत अनभिज्ञ असल्याचा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
काँग्रेसला सरकारमध्ये महत्त्वाचे स्थान असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील सरकार व्यवस्थित काम करीत असल्याचे स्पष्ट करीत अंतर्गत वादाचा धोकाही नसल्याचे संकेत दिले.
राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल सिव्हिल लाईनमधील प्रेस क्लबमध्ये प्रसारमाध्यमासोबत बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीला विदर्भात बळकट करण्यापासून तर सरकारच्या कामावर स्पष्ट मत मांडले.
सरकारमध्ये काँग्रेसला कुठेही कमी लेखले जात नाही. राष्ट्रवादी व शिवसेनेप्रमाणेच कॉंग्रेसचीही महत्त्वाची भूमिका आहे. यासाठी तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची समिती बनली आहे. सर्वांना समान अधिकार आहे. कॉंग्रेसला दोन कॅबिनेटमंत्री वाढवून दिले आहे. त्यामुळे कुठेही वाद नाही. सरकार व्यवस्थित सुरू आहे, असे ते म्हणाले.
विदर्भात राष्ट्रवादी बळकट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एककाळ होता कॉंग्रेस मोठा पक्ष होता. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष क्रमांक एकवर आहे. कॉंग्रेसने विदर्भात राष्ट्रवादीच्या लोकांना सोबत घेऊन साथ द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विदर्भातून किमान १५ आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गेल्या पाच वर्षात नागपूरचे मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री होते, परंतु मिहानला हवी तशी चालना मिळाली नाही, असे नमुद करीत आता नक्कीच मिहानबाबत आश्वस्त असल्याचे ते म्हणाले.
कोव्हीडबाबत कुणीही भविष्य करू शकले नाही. त्यामुळे जे भविष्यवेत्ते सरकारबाबत भविष्यवाणी करीत आहे, तेच भविष्याबाबत अनभिज्ञ आहे, असे टोला त्यांनी लगावला. लॉकडाऊनमुळे देशाच्याच अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला. परंतु महाराष्ट्र सरकार यातून मार्ग काढत आहे. राज्याची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्न करीत असल्याचेही ते म्हणाले.
चूका दाखविण्याचा पवार यांना अधिकार-
पार्थ पवार यांचे पत्र आणि ट्विटला प्रसिद्धी माध्यमांनी राजकीय स्वरूप दिले, त्यावरून महाराष्ट्रात काही उलथापालथ होण्याची शक्यता नाही. नुकतेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या श्रीराम मंदिराबाबत केलेल्या ट्वीटमुळे कठोर भूमिका घेत ’पार्थ यांच्या मताला मी कवडीची किंमत देत नसल्याचे माध्यमांसमोर सांगितले होते,याशिवाय राष्ट्रवादी हा पक्ष् च धर्मनिरपेक्ष् तेवर आधारित असल्याच्या कानपिचक्या पार्थ यांना दिल्याचे सांगितले जाते,यावर शरद पवार हे ज्येष्ठ नेते तसेच राष्ट्रवादीच्या कुटुंबाचे प्रमुख आहे. ते पार्थबाबत बोलले, त्यात वावंग काय? असा सवाल करीत पार्थच नव्हे तर राष्ट्रवादी परिवारातील सदस्यांचे काही चुकत असेल तर त्यांची चूक दाखवण्याचा त्यांना अधिकार आहे, असे खासदार पटेल म्हणाले.

आमचे चॅनल subscribe करा