Homeनागपूर न्यूजराजकारण खेळण्यासाठी नव्हे समाजकार्याची व्यापकता वाढविण्यासाठी भाजप प्रवेश :अर्चना कुटे

राजकारण खेळण्यासाठी नव्हे समाजकार्याची व्यापकता वाढविण्यासाठी भाजप प्रवेश :अर्चना कुटे


बिडच्या सुप्रसिद्ध समाजसेवी अर्चना कुटे यांचा भाजप प्रवेश

पंकजा मुंडे माझ्या दैवत:अर्चना कुटे यांचा खुलासा

जात-पात मानत नाही माझयासाठी सर्व समान

नागपूर,ता.१० नोव्हेंबर २०२३: आजपर्यंत मी समाजकार्यात होते,समाजकार्यातून जवळपास पन्नास हजार महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला मात्र,समाजकार्याची व्यापकता वाढवण्यासाठी कोणाच्या तरी आर्शिवादाची गरज असल्यामुळे मी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.राजकारणात मी राजकारण खेळण्यासाठी आले नसल्याचे विधान सुप्रसिद्ध समाजसेविका अर्चना कुटे यांनी आज रामदासपेठ येथील तुली इम्पेरियल येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी त्यांनी आज विधिवत भाजपमध्ये प्रवेश घेतला.यावेळी शेकडो समर्थकांनी त्यांचे नारेबाजीतून जोरदार स्वागत केले.

बिडमध्ये समाजकारणातून महिलांमध्ये तसेच समाजामध्ये आतापर्यंत चांगली प्रतिमा असल्याने व आता राजकारणात प्रवेश केल्यानंतर राज्यातील विरोधक हे राजकीय चिखलफेक करतील,त्याचा सामना कसा कराल?या प्रश्‍नावर बोलताना,माझे कोणीही विरोधक नसल्याचे त्या म्हणाल्या.माझ्यासाठी सगळे सारखे आहे,असे उत्तर त्यांनी दिले.

बिड ऐवजी नागपूरात धनत्रयोदशीच्या दिवशी बावणकुळे यांच्या बंगल्यावर पक्ष प्रवेश का केला?असा प्रश्‍न केला असता,बिड ऐवजी नागपूरात पक्ष प्रवेश करावा अशी बावणकुळे यांची ईच्छा होती त्यामुळे नागपूरात पक्ष प्रवेश केला,असे त्या म्हणाल्या.

बिडमध्ये पंकजा मुंडे या भाजपच्या कद्दावर नेत्या आहेत मात्र,अलीकडे त्या भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे त्यामुळे तुम्हाला पंकजा मुंडेंचा पर्याय म्हणून पक्षात प्रवेश दिला आहे का?असा प्रश्‍न केला असता,पंकजा मुंडेंच्या नाराजीचा माझ्या पक्ष प्रवेशाशी कोणताही संबंध नसल्याचे अर्चना यांनी सांगितले.मी त्यांना अडथळा नव्हे तर सपोर्ट करण्यासाठी राजकारणात आले.मी त्यांची प्रतिस्पर्धी नसून त्या माझ्यापेक्षा दहा वर्षांनी राजकारणात पुढे आहेत.मी जेव्हा राजकारणात दहा वर्ष पूर्ण करेल तेव्हा त्या वीस वर्ष माझ्या पुढे असतील,त्यामुळेच पंकजा मुंडेंची मी प्रतिस्पर्धी नसून त्या माझ्या दैवत असल्याचे उद् गार अर्चना यांनी काढले.

इतर अनेक राजकीय पक्ष असताना भाजपच का निवडला?या प्रश्‍नावर बोलताना,भाजप सरकारच्या नेतृत्वात आपण नुकताच चंद्रावर भारताचा झेंडा फडकवला,हे सरकार आपल्यासाठी चांगले आहे हा विचार पक्का झाला.मला महिलांच्या सबळीकरणासाठी आणखी जास्त कार्य करायचे आहे त्यामुळेच मी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे त्या म्हणाल्या.

याच प्रश्‍नावर बोलताना भाजप उपाध्यक्ष अमर साबळे यांनी भाजप एकमेव पक्ष आहे ज्यात महिलांना प्रतिष्ठा प्रदान करण्यात येत असल्याचे म्हणाले.इतर एक ही पक्ष असा नाही ज्या पक्षात कोणत्याही जातीचा कार्यकर्ता तसेच अगदी चहा विकण्यापासून ते भांडी घासणारा कार्यकर्ताही मुख्यमंत्री,पंतप्रधान,आमदार,खासदार बनू शकतात.पंकजा मुंडे यांच्या कुटूंबाचे भाजपच्या पक्षवाढीत फार मोठे योगदान असल्याचे साबळे यांनी सांगितले.अर्चना कुटे यांचे समाजकारणात फार मोठे योगदान असून दोन्ही महिलांचे मिशन हे एकच असल्याचे ते म्हणाले.

भाजप हा एकमेव राजकीय पक्ष आहे ज्या पक्षाने महिलांना ३३ टक्के राजकीय आरक्षण मिळवून दिले.आम्ही हा लढा तब्बल पंधरा वर्ष लढलो.आम्हाला आमदार पती,खासदार पती यांच्या ऐवजी महिला या आमदार,खासदार झालेल्या बघायच्या होत्या.येथूनच अर्चना कुटे यांची भूमिका सुरु होते.सामान्य माणसाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्य भाजप पक्ष करीत असल्याचे शुक्ला म्हणाले.

पंकजा मुंडे या पक्षावर नाराज आहे, हा गैरसमज असल्याचे साबळे यांनी सांगितले.पंकजा मुंडे या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या आहेत.पक्षाने सोपवलेले दायित्व त्या प्रामाणिकपणे निभवत असल्याचे साबळे म्हणाले.गोपीनाथ मुंडे हे आमचे दैवत असून त्यांच्याच मुळे भाजप बहूजनांमध्ये पोहोचला.त्यांचे योगदान हे सर्वमान्य असून पंकजा या त्यांच्याच कन्या आहेत,त्या लोकनेत्या असून त्या नाराज नसल्याचे साबळे यांनी सांगितले.

महिलांना ३३ टक्के आरक्षण जाहीर झाल्यावर अर्चना कुटे यांचा पक्ष प्रवेश झाला,हा योगायोग आहे का?असा प्रश्‍न केला असता,महिला,भगिनींना लोकसभेत,विधान सभेत ३३ टक्के आरक्षण लागू करुन देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य भाजपने केले असल्याचे साबळे उत्तरले,अर्चना यांचा पक्ष प्रवेश हा त्यांचे कार्य बघून झाला आहे,असे उत्तर त्यांनी दिले.

भाजपमध्ये पक्ष प्रवेशानंतर येणारी निवडणूक लढणार का?असा सवाल केला असता,पुढील परिस्थिती काय असेल हे आताच मी सांगू शकणार नसलयाचे उत्तर अर्चना यांनी दिले.समाजकारणातील माझी स्वच्छ छवि व महिलांच्या सबळीकरणासाठी मला आणखी जास्त कार्य करण्याची गरज वाटते व त्यासाठी मला कोणाच्या तरी आर्शिवादाची गरज वाटल्याने मी भाजपमध्ये प्रवेश घेतला,असे उत्तर अर्चना यांनी दिले.

सध्या मराठा-ओबीसी आंदोलनाने राज्य ढवळून निघाले आहे,याकडे लक्ष वेधले असता,मी जात मानत नसल्याचे उत्तर त्यांनी दिले.माझ्यासाठी सगळ्या जातीचे लोक हे सारखेच असल्याचे त्यांनी सांगितले.भाजप पक्ष जाती-पाती मध्ये नव्हे तर विकासामध्ये विश्‍वास ठेवणारा पक्ष असल्याचे शुक्ला म्हणाले.इतर राजकीय पक्ष विचार ही करु शकणार नाही फक्त तीन-चार हजार जातीची लोकसंख्या असणा-या जातीतील व्यक्ती ही देशाचा पंतप्रधान बनू शकते,असे पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता शुक्ला म्हणाले.

यावर भाजपमध्ये तर जातीच्या नावावर अनेक संघटना व त्यांचे जातीनिहाय अध्यक्ष आहेत,याकडे लक्ष वेधले असता,लहान लहान संघटनांद्वारे सर्वांना विकासाची संधी मिळायला हवी,यासाठी भाजपमध्ये जातीनिहाय संघटना असल्याचे उत्तर शुक्ला यांनी दिले.

अर्चना कुटे यांचे बिडमधील समाजकार्य,महिलांना दिलेला रोजगार,महिलांच्या सक्षमीकरणाचे कार्य बावणकुळे यांच्या निर्दशनास आल्यानंतर पक्षातील महिला कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी अर्चना कुटे यांच्यावर सोपविण्यासाठी त्यांना पक्ष प्रवेश देण्यात आल्याची भूमिका याप्रसंगी अमर साबळे यांनी मांडली.

अर्चना कुटे यांनी राजकारणात पदासाठी पक्ष प्रवेश केला नसून महिलांचे कल्याण,गोर गरीबांची सेवा,सामाजिक कार्य तसेच भाजपच्या विचारधारेवर श्रद्धा असल्यामुळेच पक्ष प्रवेश केला असल्याचे शुक्ला म्हणाले.निवडणूकीत उभे राहण्यासाठी त्यांनी पक्षात प्रवेश केला नसल्याचा खुलासा त्यांनी केला.भाजपच्या प्लेटफॉर्मवर त्या आपले सामाजिक कार्य पुढे ही सुरुच ठेवणार असल्याची पुश्‍ती शुक्ला यांनी जोडली.
…………………

 

Latest बातम्या