

नागपूर,ता.२६ ऑगस्ट २०२२: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड सोबत जी नवी युती केली आहे,ती युती करताना त्यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना विश्वासात घेतले आहे का?ही नवी युती पवार व सोनिया गांधींना मान्य आहे का?असा परखड सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी उद्धव ठाकरेंना केला. कारण या दोघांना विचारल्याशिवाय उद्धव ठाकरे काहीच करीत नसल्याचा टोला ही त्यांनी हाणला.
२०१९ मध्ये उद्धव यांनी भाजपसोबत बेइमानी करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत अभद्र युती केली. या अभद्र युतीमधून महाविकास आघाडी सरकार नावाची हिंदू विरोधी आघाडी जन्मास आली. परंतु उद्धव यांच्याच पक्षातील आमदारांना हे पटले नाही म्हणून त्या आमदारांनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी त्यांची साथ सोडली आणि हे आमदार विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानाने भाजप सोबत आले.
आता उद्धव यांनी संभाजी ब्रिगेड सोबत युती केली. ही नवी युती उद्धव ठाकरे यांच्या सोबत शिल्लक असलेल्या उर्वरित १५ आमदारांना मान्य राहणार आहे का? महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्यासाठी उद्धव ठाकरे यांची ही धडपड तर नाही ना? उद्धव ठाकरे यांच्या या नव्या ब्रिगेडचे काँग्रेस पक्ष स्वागत करणार का? वैफल्यग्रस्त झालेले उद्धव उद्या कुणासोबतही युती करतील याची शाश्वती आता राहिलेली नसल्याची टिका बावणकुळे यांनी केली.

आमचे चॅनल subscribe करा