

आसावरी नायडू लिखित ‘झॉलीवूड‘चित्रपटाचा वाद उफाळला
नागपूर,ता.२९ जून २०२२:एकीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या नावाने गळे काढायचे,दूसरीकडे स्त्री-पुरुष समानतेचे गोडवे गायचे,तिसरीकडे कलावंत हा निधर्मी असल्याची मखलाशी जोडायची मात्र प्रत्यक्षात एखाद्या कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूळावरच बहीष्काराचे ‘अमानवीय’अस्त्र उगारुन त्या कलावंताला आयुष्यातूनच उठवायचं, अशी कृती झाडीपट्टी संघटनेच्या अध्यक्षाकडून एका स्त्री कलावंतांबाबत घडली असून त्यांच्या या कृत्याचा आता कलाकार जगतामध्ये सर्वत्र निषेध नोंदवला जात आहे.
विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेल्या, महाराष्ट्रभर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि सर्व स्तरातून कौतूक झालेल्या ‘झॉलिवूड’ या चित्रपटाची लेखिका व प्रतिभावंत अभिनेत्री आसावरी नायडू यांच्यावर झाडीपट्टी निर्माता संघटनेने आजन्म बंदी घातली आहे. सोशल माध्यमांवर आसावरी नायडू यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असून त्यांचा पोटापाण्याचा व्यवसायच या संघटनेने त्यामुळे हिरावून घेतला आहे.
सात वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीची पार्श्वभूमी लाभलेला ‘झॉलिवूड’ हा चित्रपट तयार झाला आहे. ‘झॉलिवूड’ हा चित्रपट झाडीपट्टीचा इतिहास सांगणारा ‘माहितीपट’ नसून झाडीपट्टी रंगभूमीवर घडलेल्या काही ‘निवडक’ सत्य घटनांचा आधार घेऊन त्यांना एका ‘काल्पनिक’ कथेत गुंफून अत्यंत प्रामाणिक हेतूने तयार केलेला चित्रपट आहे.
या चित्रपटाची कथा झाडीपट्टी अभिनेत्री आसावरी नायडू यांची असून दिग्दर्शन व पटकथा तृषांत इंगळे यांची आहे. हा चित्रपट ३ जून २०२२ रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे U/A प्रमाणपत्र मिळाले आहे. फ्रान्स चित्रपट महोत्सवात स्पेशल ‘ज्युरी अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले असून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातर्फे ही या विदर्भात तयार झालेल्या चित्रपटाच्या कलावंतांना विशेषत्वाने आमंत्रित करण्यात आले होते.
चित्रपट व साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांनी या चित्रपटाचे भरभरून कौतूकही केले . एकीकडे, सर्वत्र चर्चिल्या गेलेल्या व कौतूकाचा वर्षाव झालेल्या चित्रपटाच्याच लेखिका, आसावरी नायडू यांच्यावर मात्र झाडीपट्टी निर्माता संघटनेचे अध्यक्ष ’परमानंद गहाणे’ व झाडीपट्टी नाट्य विकास महामंडळाने बहिष्कार टाकला आहे! आसावरी नायडू यांनी झाडीपट्टीची बदनामी केल्याचे कारण पुढे करत, या दोन संघटनांनी त्यांच्यावर आजन्म बंदी घातली आहे.
आसावरी नायडू या मागील २२ वर्षांपासून झाडीपट्टी रंगभूमीवर कार्यरत आहेत. त्यांचे वडील प्रभाकर आंबोणे व आई वत्सला पोलकमवार-आंबोणे यांनीदेखील ४० वर्ष झाडीपट्टी रंगभूमीची सेवा केली आहे. त्यांचे सासरे ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू हे नागपुरातील रंगभूमीवरचे एक प्रतिष्ठीत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. झाडीपट्टी रंगभूमी हे आसावरी नायडू यांच्या अर्थार्जनाचे एकमेव माध्यम असून त्यांच्यावर झाडीपट्टी संघटना व विकास महामंडळाने घाव घातला.
मूळात संवैधानिक लोकशाही असणा-या देशात एखाद्या अभिनेत्रीवर,लेखिका,दिग्दर्शक किवा कोणत्याही स्त्री-पुरुष कलावंतांवर बहीष्कार घालण्याचे अधिकार एखाद्या संघटनेच्या अध्यक्षाला हा देश बहाल करतो का?हा मूळ प्रश्न यातून उद् भवला आहे.

(छायाचित्र- देवेंद्र दोडके यांची मुक्ताफळे)
पुरोगामी महाराष्ट्र हा खाप पचांयतीच्या रांगेत जाऊन बसणार असेल तर भावी पिढी समोर आम्ही मराठी माणूस म्हणून,कलावंत म्हणून,रंगभूमीकार म्हणून कोणता आदर्श प्रस्थापित करीत आहोत?याचा विचार आता करावा लागेल.
अासावरी यांना हा देश,या देशातील संविधान आणि संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार,कलाकृती अविष्काराचा अधिकार प्रदान करतो.एखादय्ा चित्रपटाचे कथानक झाडीपट्टी संघटनेच्या अध्यक्ष व त्यातील काही सदस्यांना रुचले नाही या सबबीखाली एखाद्या कलावंतांच्या पोटापाण्यावरच घाव घालण्याचा,त्यांच्यासोबत कोणीही या पुढे काम करणार नाही,असा अलिखित आदेश काढण्याचा,त्यांच्यावर कायमस्वरुपी बंदी घालण्याचे आदेश काढणारी ही कृती ‘मानवतेला न शोभणारीच’ आहे.
खालच्या पातळीवर जाऊन एका स्त्रीविषयी सातत्याने बदनामीकारक व आपत्तीजनक मॅसेज व्हायरल करने,असे कृत्य कलाकार म्हणून घेणा-यांना न शोभणारेच आहे.झाडीपट्टीची गोष्ट पुणे-मुंबईत अगदी फ्रांसपर्यंत वाखाणल्या गेली.चित्रपट, चित्रपटासारखाच पहावा,आनंद घ्यावा त्यात ‘तथ्य’ शोधण्यासाठी ते अध्यक्ष किवा ते सदस्य हे तत्वज्ञानाचे विद्यार्थी नाहीत.
सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंदूलकर यांनी तर काळाच्या कितीतरी पुढच्या आणि वास्तववादी कथानकांवर आधारित नाट्यनिर्मिती केली होती,आज ते हयातीत असते तर अाजचे हे झाडीपट्टी संस्थेचे अध्यक्ष,सदस्यांनी त्यांनाही शूळावरच चढवले असते,यात शंकाच नाही.

(छायाचित्र- अध्यक्ष गहाणे यांचा बंदीचा फतवा!)
एखादा कलाविष्कार खटकला,नाही आवडला तरी लोकशाही पद्धतीने त्यावर चर्चा घडविली जाऊ शकते,चर्चेतून चूका टालण्याचा समज दिला जाऊ शकतो मात्र अध्यक्षांनी चर्चेसाठी बोलावलेल्या या बैठकीत एका गुणी अभिनेत्रीच्या,लेखिकेच्या प्रतिभेला अक्षरश: नग्न करण्याचे दृष्कृत्य घडले! नागपूरकरांना ज्या ‘माझ्या नव-याची बायको’फेम देवेंद्र दोडके यांच्यावर अभिमान वाटत होता ते देखील इतक्या कोत्या मनाचे निघाले व एका अविष्कारावर तुटून पडलेत याचेच नागपूरकरांना आश्चर्य वाटत आहे.
ज्यांनी या चित्रपटात अतिशय छान भूमिका पार पाडली ते अखिल भरतीय मराठी नाट्य महामंडळ मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष नरेश गडेकर यांनी देखील या सर्व प्रकरणावर ’मूग गिळून गप्प बसणे पसंद केले!’
जी व्यक्ती आपल्याच एका वैदर्भिय कलावंताला न्याय देऊ शकत नाही,त्यांचे फोन उचलत नाही,मॅसेज वाचून देखील उत्तर देत नाहीत,दिलासा देत नाहीत,ती व्यक्ती अख्ख्या महाराष्ट्राच्या नाट्य कलावंतांना काय न्याय देणार?असा संताप आता व्यक्त होत आहे.
आपल्या पदाची गरिमा राखत गडेकरांनी तरी संघटनेला ,अासावरी यांना बंदीचे लिखित पत्र द्या किवा बंदी नाही असे पत्र देण्यासाठी पुढाकार घ्यावा. अध्यक्ष पदाची खूर्ची ही फक्त ’उबवण्यासाठी’नसते हे त्यांनी सिद्ध करावं.
लोकशाही देशात ‘बंदी आणि बहीष्काराची ’ दादागिरी मुळीच खपवून घेण्यात येणार नाही.राजकारण करायचंच असेल तर राजकारणात जावे.राजकारणातही अतिशय उच्च दर्जाचे ‘नाट्य’ घडत असतात,मात्र रंगभूमी आणि कलेच्या पावन क्षेत्रात आपल्या सडक्या मेंदूतून निघणा-या विखारी कलृपत्या, पुरोगामी महाराष्ट्र खपवून घेतल्या जाणार नाही,असा इशारा अनेक कलावंत देत आहेत.
आधीच विदर्भावर ‘मागासलेपणाचा’ठपका पश्चिम महाराष्ट्रातर्फे सातत्याने ठेवला जातो ,याच विदर्भाची कीर्ती वाढवाणा-या एखाद्या कलाकृतीचा अविष्कार, एखादी स्त्री कलावंत घडवित असेल आणि त्याचे कौतूक करने सोडून त्यांच्यावरच ‘बहीष्कार’घालण्या-या असंवैधानिक भाषेचा प्रयाेग करण्यात येत असेल, तर त्या स्त्रीच्या आत्मसन्मानाची लढाई ही समस्त स्त्रियांची लढाई समजून, हुडकेश्वर पोलिस ठाण्यातील अधिका-यांनी, कठोर कलमा लावून सन्माननीय संघटनेच्या अध्यक्षांना त्वरीत तुंरुंगात डांबणे नितांत गरजेचे आहे,अशी मागणी केली जात आहे.
आत्मसन्माला ठेस- आसावरी नायडू
‘झाडीपट्टी निर्माता संघटना’ व ‘झाडीपट्टी नाट्य विकास महामंडळाने’ आजन्म बंदी घालत माझ्यावर अन्याय केला अाहे. झाडीपट्टी कलावंत म्हणून असलेले माझे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल माध्यमांवर माझा निषेध, बहिष्कार टाकणारे आक्षेपार्ह व अपमानजनक पोस्ट टाकून माझे मानसिक खच्चिकरण करण्यात येत आहे. एक स्त्री कलावंत या नात्याने माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेला हा घाला आहे’.
चित्रपटाशी संबंधित निर्माता, दिग्दर्शक, कलावंत या सर्वांना सोडून केवळ वैयक्तिक आकसापोटी परमानंद गहाणे, देवेंद्र दोडके, शेखर डोंगरे, प्रल्हाद मेश्राम, युवराज गोंगले, प्रियंका गायधने, ज्ञानेश्वरी कापगते, प्रतिभा साखरे, सुषमा चांदेकर इत्यादी मंडळींनी झाडीपट्टी नाट्य महामंडळ व झाडीपट्टी निर्माता संघटनेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर माझी सातत्याने बदनामी करणारे व माझ्यावर कायमची बंदी घालणारे पोस्ट टाकण्यात आले.
इतका मोठा निर्णय घेण्याआधी या लोकांनी एकदाही माजी बाजू ऐकून घेण्याचे सौजन्य दाखवले नाही. एक स्त्री कलावंत म्हणून फक्त माझ्या उदरनिर्वाहाचाच नाही तर माझ्या अस्मितेचा हा प्रश्न आहे. माझी बाजू सगळ्यांसमोर मांडण्यासाठी आता कायद्याला शरण जाण्याशिवाय माझ्याजवळ दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नसल्यामुळे मी आज हुडकेश्वर पोलिस ठाणयात माझी बदनामी करणा-यांवर व माझ्यावर अघोषित बंदी घालणा-यांच्या विरोधात रितसर तक्रार नोंदवली आहे.
या व्हॉट्स ग्रूपवर कलावंत म्हणून, माझे आई-वडील व यजमान हे देखील आहेत. त्यांना माझ्याविषयी एवढ्या अशलाघ्य शब्दांचा मारा बघून वेदना होतात.माझ्या चित्रपटात नायकाने नायिकेच्या करंगळीला देखील स्पर्श केला नाही.
सुरवातीलाच या चित्रपटात झाडीपट्टी रंगभूमीवर घडलेल्या काही निवडक सत्य घटनांचा आधार घेऊन काल्पनिक कथेत गुंफण्यात आले असल्याचे डिस्कमेलर अर्थात खुलासा करण्यात आला आहे मात्र माझ्या कर्तुत्वावर,माझ्या यशावर जळणा-या काही विघ्नसंतोषी पदाधिका-यांनी माझी कोणतीही बाजू ऐकून न घेता,मी झाडीपट्टी रंगभूमीची बदनामी केल्याचा आरोप परस्पर संघटनेच्या सदस्यांच्या व्हॉट्स ॲप ग्रुप्सवर केला.
सुरवातीला बैठकीची नोटीस ही संघटनेच्या जमा-खर्चावर तसेच ’झॉलिवूड’चित्रपटावरील चर्चेसाठी असल्याचे वरवर दाखविण्यात आले मात्र चर्चेत माझ्यावर अत्यंत खालच्या दर्जाची टिका झाली ,एवढंच नव्हे तर मी त्या ठिकाणी उपस्थित असते तर मला चांगली अद्दल घडविली असती अशी देखील भाषा वापरण्यात आली .
…………
आसावरी नायडू
8999830426




आमचे चॅनल subscribe करा
