

संतांच्या आशीर्वचनांनी जयप्रकाश नगर येथील उत्सवाचा समारोप
नागपूर, २६ मार्च :गुरुमंदिराची ही भूमी असून अनेक संत, महात्मे, प्रवचनकारांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. अशा या पावनभूमीत भगवान दत्तात्रयाच्या पुनर्प्रतिष्ठापनेचे कार्य पार पडले असून भाविकांसाठी ही भूमी मन प्रसन्न व प्रवित्र करणारी झाली आहे. या भूमीत ज्ञानगंगा आणि भक्तिरसाचा प्रवाह वाहत असल्यामुळे हे एक ज्ञानमंदिरदेखील झाले आहे, अशा शब्दात सोहळ्याला उपस्थित संतांनी आशीर्वाद दिले.
जयप्रकाश नगर येथील श्रीगुरुमंदिरच्या नववास्तूचा वास्तुपूजन सोहळयाचे तीन दिवस कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सोमवारी या आशीर्वचनाने उत्सवाचा समारोप झाला. दिवसभर झालेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने गुरुपरंपरेनुसार श्रींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची स्थापना सद्गुरूदास महाराजांनी केली तर श्रीनृसिंह सरस्वती महाराजांची स्थापना अजय देशमुख यांनी केली. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची स्थापना श्रीरंग फाटक यांनी व विष्णुदास महाराजांच्या मूर्तीची स्थापना आवदे महाराज अकोला यांनी विधिवत केली. दत्तात्रयांची पूनर्स्थापना करण्यात आली. त्यानंतर परमहंस आचार्य विद्याभारती स्वामी यांची तांदळाने तुला तर अकोल्याचे आवदे महाराजांची गुळाने मंत्राच्चारात तुला करण्यात आली. त्यानंतर आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
सायंकाळच्या संतपूजन व आशीर्वचन कार्यक्रमाला कर्नाटकातील परमहंस आचार्य नारायण विद्याभारती स्वामी, अकोल्याचे आवदे गुरुजी महाराज, वे.शा.स. विनायक शास्त्री आर्वीकर, तेलंगणातील प्रसिद्ध संत अब्रु महाराज, वाशीमचे विजय पोफळी महाराज, भागवतकार श्रीरामपंत जोशी, तुळजापुरचे सत्पुरुष नागोशास्त्री नंदीबुवा अंबुलगे व सद्गुरूदास महाराज यांची मंचावर उपस्थिती होती.
सद्गुरुदास महाराजांच्या धार्मिक व आज्ञात्मिक कार्याचा गौरव करताना सर्व संतांनी भाविकांनी नित्यउपासनेवर भर देण्यास सांगितले. या कार्यक्रमात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे सीईओ शैलेश जोगळेकर व नागोशास्त्री आंबोलगे यांचा सत्कार करण्यात आला. चार दिवस चाललेल्या या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने गुरुमंदिराला भेट दिली. त्या प्रामुख्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह पत्रकार व परिसरातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिकांचाही समावेश होता.




आमचे चॅनल subscribe करा
