Homeनागपूर न्यूजजिल्हाधिका-यांनी खासगी रुग्णालयांना रेमडिस्विहर घोटाळ्यासाठी केले रान मोकळे!

जिल्हाधिका-यांनी खासगी रुग्णालयांना रेमडिस्विहर घोटाळ्यासाठी केले रान मोकळे!

रुग्णांच्या नातेवाईकांचा आरोप:जिल्हाधिकारी हे काही डॉक्टर नाहीत!

नागपूर,ता. १९ एप्रिल: रेमडिस्विहर इंजेक्शनचा प्रचंड काळाबाजार करणा-यांसाठी करोना महामारीचा हा काळ अत्यंत फायदाचा ठरत असून या इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे मात्र शेकडो नागरिकांचे जीव गेले व जीव जात आहेत.करोना रुग्णांसाठी फायदेशीर ठरत असणा-या या इंजेक्शनचा काळाबाजार हे इतर कुठून नव्हे तर चक्क खासगी रुग्णयालयातूनच होत असल्याचे वास्तव असून यावर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्याकडे आता हे इंजेक्शन खासगी रुग्णालयांना मागणीनुसार पुरविण्याचे अधिकार असले तरी त्यांच्याच चुकीच्या धोरणामुळे खासगी रुग्णालयांना रेमडिस्विर इंजेक्शन्सचा घोटाळा करण्यासाठी रान मोकळे झाल्याचा आरोप नाव न छापण्याच्या अटीवर अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी केला.

सर्वात महत्वाचे म्हणजे जिल्हाधिकारी हे काही डॉक्टर नाहीत तर एक प्रशासकीय यंत्रणा असल्याचे बोलले जात आहे.मग ते अमूक रुग्णालयाला इतकेच इंजेक्शन पुरविले जातील,असे धोरण कसे राबवू शकतात?असा सवाल केला जात आहे. एखादे खासगी रुग्णालये त्यांच्याकडे १० रेमडिस्विरची मागणी करीत असले तर ते ५ इजंेक्शनच पुरवितात आणि येथेच रुग्णालयांना रुग्णांना वाटेल तसं लृटण्याची संधी मिळतेय.१० रुग्णांपैकी जो सर्वात जास्त पैसे मोजेल त्याला हे इंजेक्शन खासगी रुग्णालये उपलब्ध करुन देतात तर इतरांना चिठ्ठी लिहून बाहेर रणरणत्या उन्हात भटकवत राहतात.

वातानुकूलीत कक्ष्ामध्ये बसून जिल्हाधिकारी ठाकरे हे रेमडिस्विहरचे वाटप करीत आहेत.रेमडिस्विहर हे शेडल्यूल‘एच’ड्रग श्रेणीमध्ये येत असून या इंजेक्शनबाबत प्रत्येक पावतीची प्रशासनाकडे माहिती पाठवली जाते.आता रेमडिसिव्हिर हे जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली असल्याने त्यांच्याकडे खासगी रुग्णालये या इंजेक्शनची मागणी करते.मात्र १० इंजेक्शन्ची मागणी केल्यास फक्त ५ चाच पुरवठा केला जातो.इतर फॉर्मसीला हे इंजेक्शन विकण्यावर बंदी असल्याने खासगी रुग्णालयातील डॉक्टर्सने लिहून दिलेल्या चिठ्ठय्ा घेऊन रुग्णांचे नातेवाईक हे संपूर्ण शहरच नव्हे तर आजूबाजूचे शहरे देखील पालथी घालत आहेत.

एकेका रेमडिसिव्हिरसाठी नातेवाईक चक्क आपलं सर्वस्व पणाला लावून २५ हजार रुपयात एक इंजेक्शन मिळवत असल्याची भीषण वास्तविकता आहे.

आता रेमडिसिव्हिर इंजेक्शन हे देखील सरकारने मास्क आणि सेनिटायझर सारखेच कॅपिंगमध्ये आणण्याची मागणी केली जात आहे.गेल्या वर्षी ५ रुपयांचा मास्क हा कॅपिंग नसल्यामुळे औषधी दूकानात चक्क २५ रुपयांना तर सेनिटायझरची ४५ रुपयांची बाटली २५० रुपयांना विकल्या गेली!पुढे सरकारने यावर नियंत्रण आणले आता रेमडिसिव्हिरवर देखील असेच कॅपिंग बसवावे,हे इंजेक्शन खुल्या बाजारात विकण्यासाठी उपलब्ध करावेत,जेणेकरुन याच्या किंमतीबाबत पारदर्शिता राहील,अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली.
रेमडिस्विहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रणात गेल्याने रुग्णालयातूनच काळाबाजारीला वाव मिळाला असल्याचा आरोप केला जात आहे.खासगी रुग्णालयात भर्ती असणा-या रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी जिल्हाधिकारी यांना रुग्णांचे नातेवाईक फोन लावतात तर ते फोनच उचलत नसल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.

जिल्हाधिकारी यांचा कोणताची वचक खासगी रुग्णालयांवर नसल्यानेच रुग्णांची फरफट सुरु असल्याची टिका होत आहे.खासगी रुग्णालयांना रुग्णांना लृटण्यासाठी जिल्हाकिधारी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी रान मोकळे करुन दिले असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.

माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे नगरसेवकांची फाईल अडवून ठेवायचे.काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आधी द्या तेव्हा कामाचे पैसे मिळेल असे धोरण त्यांनी अवलंबिले होते,हे मनपा आयुक्त तर नगरसेवकांच्या फाईली धडाधड क्लिअर करण्यासाठीच कक्ष्ात बसले असल्याचा संतापही अनेकांनी व्यक्त केला.

रुग्णालयाबाहेर लावावे सीसीटीव्ही-
अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी लाखो रुपये भरुन आपले रुग्ण हे खासगी रुग्णालयांच्या अधीन सोपवले आहेत.एकदा आत गेल्यानंतर आपल्या रुग्णासोबत काय घडतंय,याची माहिती नातेवाईकांना मिळत नाही,रुग्णांकडे मोबाईल देखील ठेवला जात नाही.त्यामुळे अति दक्ष् ता वॉर्डमध्ये सीसीटीव्ही लावण्यात यावे व बाहेरील परिसरात नातेवाईकांना त्यांच्या रुग्णावर कोणते डॉक्टर कोणता उपचार करीत आहेत,याची माहिती दिसण्याची व्यवस्था करण्यात यावी,अशी मागणी आता केली जात आहे.हा आमचा संवैधानिक अधिकार असल्याचे ते सांगतात.

इंडियन मेडीकल असोसिएशनवर टिका-
करोनासारख्या भयंकर जिवघेण्या महामारीच्या काळात आज अनेक खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची केवळ आर्थिक लृटच सुरु नसून उपचाराच्या नावाखाली त्यांच्या जिवांशी खेळल्या जात आहे,असा आरोप करीत शहरातील रुग्णांच्या जीवावर उदार झालेली इंडियन मेडीकल असोसिएशन ही संघटना गप्प का?असा संताप आता व्यक्त केला जात आहे.

डॉक्टर्स हे कोविड योद्धे राहीले नसून कसाई झाले असल्याची टिका करीत खो-याने पैसा ओढल्यानंतर देखील रुग्णांचा जीव वाचविण्यात अपयशी ठरत असल्याचे बोलले जात आहे.अश्‍या काही लोभी व संवेदशनाशून्य डॉक्टरर्समुळे संपूर्ण डॉक्टरी पेशाच बदनाम झाला आहे.आयएमएने वेळीच दखल घेत आपल्या संघटनेतील सदस्यांचे कान टोचावे,अशी मागणी केली जात आहे.

१०० वर्षानंतर अख्ख्या मानवजातीवर ओढवलेले हे महाभयंकर संकट आहे अश्‍यावेळी पैसे याला महत्व न देता प्रत्येक जीव वाचविणे व रुग्णांचा विश्‍वास संपादन करणे,आप्त स्वकीय यांची दूआ घेणे,पैसा नाही पुण्य संचित करणे गरजेचे असल्याचे बोलल्या जात आहे.
वेळ तर रुग्णांची निघूनच जाईल मात्र डॉक्टरी पेशातील पांढ-या कोटधारी मानवांनी गमावलेला विश्‍वास हा पुढल्या १०० वर्षातही पुन्हा कमावता येणार नाही असे अनेक रुग्णांचे म्हणने आहे.

रेमडिसिव्हिरच्या काळाबाजारात आणखी चौघे अटकेत-
करोना रुग्णांसाठी जिवनदायी ठरलेल्या रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार करुन नातेवाईकांकडून पाच पट पैसे उकळणा-या आणखी चौघांना जरीपटका पोलिसांनी आज अटक केली.आरोपीमध्ये एका पोर्टलच्या पत्रकाराचा देखील समावेश आहे.
या आरोपींकडून पोलिसांनी वेगवेगळ्या कंपनींच्या ४ रेमडिसिव्हिरसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला.न्यायालयाने आरोपींना २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

विकास उर्फ विवेक लक्ष्मणराव ढोकणे पाटील(३४,आर्चर क्राऊन,मनीषनगर)अमन जितेंद्र शिंदे(२१,मॉडेल मिल चौक,गणेशपेठ)व ईश्‍वर उर्फ बिट्टू मुकेश मंडळ(२८ मार्टिननगर)रोहित संजय धोटे,रजत दिलीप टेंभरे,मनोज रामाजी नंदनकर आणि महेश दामोधर ठाकरे अशी आरोपींची नावे आहेत.विकास उर्फ विवेक ढोकणे फार्मा वितरक असून तो महाराष्ट्र न्यूज सेव्हन या पोर्टलचा पत्रकार आहे.ईश्‍वर,रोहित,रजत व मनोज शुअरटेक रुग्णालयामध्ये कामाला आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,विकास ढोकणे पाटील नावाचा पत्रकार रेमेडिसिव्हिर इंजेक्शन २० ते २५ हजारात विकत असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना मिळाली.आयुक्तांनी ही माहिती परिमंडच ५ चे पोलिस उपायुक्त निलोत्पल यांना देऊन कारवाई करण्यास सांगितले.

त्यानुसार १६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजतापासून पोलिसांची टोळीवर पाळत होती.पोलिस उपनिरीक्ष् क नवनाथ देवकाते यांनी विकास ढोकणेचा मोबाईल क्रमांक मिळवला.त्यानंतर पोलिसांच्या पंटरने विकाससोबत संपर्क साधला.त्यावेळी माझ्याकडे दोनच इंजेक्शन असून ते इंजेक्शन प्रत्येकी ३३ हजारात देईन असे सांगितले.

विकासने जरीपटका हद्दीत मार्टिननगर येथे येत असल्याचे पंटरला सांगितले.त्यानुसार पोलिसांनी मार्टिननगर पुलाभोवती सापळा रचला.रात्रीच्या वेळी विकास कारने मार्टिननगर येथे येताच दबा धरुन बसलेल्या पोलिस पथकाने त्याला पकडले.तपासात अमन शिंदे व ईश्‍वर मंडळ यांची नावे समोर आली.पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले.

पोलिसांनी तिघांची विचारपूस केली असता शुअरटेक हॉस्पीटलमध्ये कामाला असलेल्या वार्डबॉयने इंजेक्शन उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले.त्यांनतर अन्य चौघांनी अटक करण्यात आली.पोलिसांनी त्यांच्याजवळून वेगवेगळ्या कंपनीचे ४ रेमडिसिव्हिर,रोख १३ हजार रुलये,चारचाकी वाहन,महागडे घड्याळ,चार मोबाईल आणि दुचाकी असा साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला.विकास कन्यक फार्मा येथे तर अमन रेणूका फार्मा येथे काम करीत असल्याची माहिती आहे.महेश ठाकरे हा औषधीच्या दूकानात काम करतो.

शुअरटेक हॉस्पीटलमधील गोरखधंदा-
आरोपी ईश्‍वर मंडळ,रजत टेंभरे,रोहित धोटे व मनोज नंदनकर हे शुअरटेक हॉस्पीटलमध्ये कामाला होते.शुअरटेक येथे भरती असेलेल्या रुग्णांना रेमडिसिव्हिर आणण्यास सांगून त्यातील काही इंजेक्शन ते वापरायचे.उर्वरित इंजेक्शन चोरुन अमनला द्यायचे.अमन हा विकासला इंजेक्शन विकण्यासाठी द्यायचा.अतिदक्ष् ता विभागात रुग्णांशिवाय अन्य कोणालाही प्रवेश देण्यात येत नाही.त्यामुळे काही इंजेक्शन रुग्णाला देऊन उर्वरित इंजेक्शनची ते बाहेर विक्री करायचे,अशी कबुली त्यांनी दिली.

 

Latest बातम्या