
मनपाच्या अग्निशमन पथकाची कामगिरी
नागपूर, ता. ३१ : संततधार अतिवृष्टीमुळे मौदा तालुक्यात ओढावलेल्या पूर परिस्थितीमुळे जनजीवन प्रभावित झाले. अशा स्थितीत अनेक नागरिक पूरामध्ये अडकले होते. या सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी नागपूर महानगपालिकेच्या अग्निशमन पथकाने बचाव कार्य राबवून ५८ नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचविले. मनपाच्या सक्करदरा व लकडगंज अग्निशमन स्थानकातील पथकाद्वारे संयुक्तरित्या हे बचाव कार्य करण्यात आले.
रविवारी (ता.३०) मौदा येथे पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याकरिता मौदा तहसील कार्यालयाद्वारे मनपाच्या अग्निशमन विभागाला सूचना देण्यात आली. मनपाच्या सक्करदरा व लकडगंज स्थानकातील बचाव कार्य कर्मचारी बोट व बोटीच्या सर्व साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्य पथकातील अग्निशमन विमोचक श्री.शिर्के, विमोचक एस.घुमडे, बी. पालवे, आर.चवरे, यंत्र चालक एस.देशमुख, यंत्र चालक जी.बावने व एन. यडवे यांनी वळणा व कोट या दोन्ही गावातील पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले. प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या मार्गदर्शनात ही संपूर्ण कारवाई करण्यात आली.
मनपाच्या अग्निशमन पथकाच्या या कामगिरीबद्दल महापौर संदीप जोशी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी कर्मचा-यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

आमचे चॅनल subscribe करा