Homeनागपूर न्यूजसाहेबांच्या आदेशाचे पालन होणारच:हेमंत गडकरी

साहेबांच्या आदेशाचे पालन होणारच:हेमंत गडकरी

Advertisements

पोलिसांकडून परवानगीचा प्रयत्न सुरु:सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात पोलिसांनीच सहकार्य करावे

पोलिसांकडून मनसे पदाधिकारी-कार्यकर्त्यांना नोटीसा जारी

नागपूर,ता.३ मे २०२२: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी १ मे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे घेतलेल्या आपल्या तिस-या जाहीर सभेत महाराष्ट्रात मशिदींसमोर भोंगे वाजणारच,ते ही दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केल्याने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे.राज्याची उपराजधानी नागपूर शहरातही याचे पडसाद उमटले असून मनसे शहराध्यक्ष हेमंत गडकरी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना ’साहेबांच्या आदेशाचे पालन होणारच’असे सांगितले.

पोलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था चिघळू नये यासाठी आधीच खबरदारी घेऊन मनसे पदाधिका-यांना व कार्यकर्त्यांना नोटीसा जारी केल्या आहेत मात्र मनसेचे राज ठाकरेंनी आज देशातील समस्त हिंदू बांधवांना व कार्यकर्त्यांना उद्देशून जे आव्हानात्मक पत्र समाज माध्यमांवर व्हायरल केले त्या अनुषंगाने, मनसे सैनिकांनी आता पोलिस विभागाकडेच त्यांना मशिदींसमोर कायद्याच्या चौकटीत राहून हनुमान चालीसा पठण करण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे.

देशातील सर्वोच्च न्यायालयानेच रात्री १० ते पहाटे ६ पर्यंत कोणत्याही धार्मिकस्थळी लाऊडस्पीकरचा वापर होणार नाही असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.राज ठाकरे यांनी देखील लाऊडस्पीकर हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय असल्याचे वारंवार आपल्या जाहीर सभांमध्ये सांगितले आहे.मुंबई उच्च न्यायालयाने देखील मशीदीवरील लाऊडस्पीकर हा मूलभूत अधिकार नसल्याचे आपल्या निकालात स्पष्ट केले असताना महाराष्ट्रात मात्र अनाधिकृतपणे अनेक मशिदींवर नियमांचे उल्लंघन करुन लाऊडस्पीकरवरुन पाच वेळा अझान दिली जात आहे.याचा सामाजिक आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी जो आदेश दिला आहे त्याचे पालन होणारच,पोलिस पोलिसांचे काम करतील आम्ही आमचे काम करु असे हेमंत गडकरी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले.कायद्याच्या चौकटीत राहून साहेबांच्या आदेशाचे पालन केले जाईल,अशी पुश्‍तीही त्यांनी जोडली.

आम्ही पोलिसांना हनुमान चालीसा पठणाची परवानगी मागितली आहे,पोलिसांनी देखील सर्वोच्च न्यायालयच्या आदेशाचे पालन करण्यात आम्हाला सहकार्य करावे,अशी विनंती त्यांनी केली.
राज ठाकरे यांच्यावर आज नियमांचे भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल असून त्या पार्श्वभूमीवर त्यांना अटक देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे यांनी समाज माध्यमावर तिन्ही भाषेत एक पत्र व्हायरल केले असून मशिदीवरचे भोंगे ४ मे पर्यंत उतरवा असे आम्ही सरकारला आधीच सांगितलं होतं,असे नमूद करीत याबाबत सरकारची भूमिका बोटचेपेपणाची असल्याचे ते लिहतात.

या देशातल्या राज्य सरकारांतला प्रत्येकजण सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देतोय.धर्माच्या नावाखाली वयोवृद्ध,रुग्ण,अशक्त व्यक्ति,लहान मुले,विद्यार्थी यांना भोग्यांच्या आवाजामुळे होणा-या त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जो र्निणर्य आहे त्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे की रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत कुणालाही ध्वनिक्षेपक वापरता येणार नाही.प्रत्येक धर्मियांच्या सणांना तेवढ्याच दिवसांपुरती ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी मिळेल,परंतु ३६५ दिवस परवानगी मिळणार नाही.ध्वनिक्षेपकासाठीची परवानगी दररोज घ्यावी लागेल.

ध्वनिक्षेपक किती क्षेमतेने लावावा,त्याबाबतच्या मर्यादाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या आहेत मात्र याचे पालन केले जात नाही.१० डेसिबल मध्ये एकमेकांच्या कानात कुजबुत करने तर ५० डेसिबलची मर्यादा म्हणजे घरातल्या मिक्सरचा आवाज असे ते सांगतात. प्रश्‍न असा आहे की सर्व भोंगे अनाधिकृत आहेत.भोंगेच कशाला बहूतांश मशिदीही अनाधिकृत आहेत.हे सरकार अनाधिकृत मशिदंीवरील भोंग्यांना अधिकृत परवानग्या का आणि कशी देते?आणि जर परवानगी देणारच असाल तर आम्हालाही,हिंदू देवळांनाही भोंगे लावण्याची परवानगी द्यायलाच हवी.मूळात हा विषय धार्मिक नसून सामाजिक असल्याचे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात पुन्हा एकदा नमूद करीत देशातील सर्व धर्मियांना मशिदीवरील भोंग्यांचा त्रास होतो.ही बाब देशातल्या प्रत्येक सरकारला समजलीच पाहिजे असे ठणकावत रस्त्यावर नमाजासाठी बसणं आणि वाहतूककोंडी करणं,हे कोणत्या धर्मात बसतं?म्हणूनच आमचे मुस्लिम धर्मियांना एवढंच सांगणे आहे की हा सामाजिक विषय आहे हे आधी समजून घ्या.या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडूनही त्याचं उत्तर धर्मानेच दिले जाईल.

आपल्या पत्रात राज ठाकरे यांनी देशातील तमान हिंदू बांधवांना आव्हान करीत उद्या ४ मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान,बांग देतील,तिथे तिथे आपण भोंग्यांवर हनुमान चालीसा लावावाी,भोंग्यांचा त्रास काय होतो,हे त्यांना ही समजू द्या,असे आव्हान केले.
आम्हाला देशातली शांतता बिघडवायची नाही.देशात आम्हाला दंगलीही नकोत,परंतु आपण धर्मासाठी हट्टीपणा सोडणार नसाल,तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही,असा इशारा त्यांनी दिला आहे.

कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या सर्व पोलिस अधिका-यांना उद्देशून राज ठाकरे यांनी विनंती केली आहे,या देशात,या राज्यात ‘कायद्याचं राज्य’आहे हे त्यांनी दाखवून द्यावं.त्यांनी अनाधिकृत मशिदी,अनाधिकृत भोंगे,रस्त्यांवर नमाज पठण यांना जबाबदार लोकांना आपला पोलिसी खाक्या दाखवावा.

हिंदूंच्या सणांना सायलन्स झोन,शाळा,रुग्णालय अशा प्रकारच्या अटीशर्तीच्या नावाखाली मर्यादा घालायच्या,परंतु मशिदींना कोणत्याही प्रकारच्या अटी घालायच्या नाहीत!भारतीय संविधानाने सांगितलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या कोणत्या व्याख्येत हे बसते?म्हणूनच हिंदूंनो,त्यांना आता आपली हनुमान चालीसा ऐकवा असे आव्हान त्यांनी पत्रात केले.

सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि स्वाक्ष-यांची निवेदने राेजच्या रोज पोलिस ठाण्यात नेऊन द्यावी.

मशिदींमध्ये बांगेला सुरवात झाल्या झाल्या पोलिसांसाठीच्या १०० या क्रमांकावर सजग नागरिकांनी दूरध्वनी करुन भोंग्यांच्या त्रासाबाबत तक्रार करावी ती ही दररोज करावी.

सामाजिक भान बाळगत ज्या मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,त्या मशिदींशी संबंधित लोकांच्या स्तुत्य निर्णयाचे राज ठाकरे यांनी स्वागत केले तसेच जिथे भोंगे उतरवण्यात आले आहे,त्या मशिदींच्या परिसरात कोणताही त्रास होणार नाही,याची काळजी घेण्याची सूचना ही राज ठाकरे यांनी केली.

भाेंग्यांचा त्रास अनेक मुस्लिमांना देखील होतो मात्र कर्मठ धर्मगुरुंपुढे,कट्टर धर्मवाद्यांपुढे त्यांना बोलता येत नाही.ते असो.माझ्या तमाम हिंदू बांधवांनी भोंग्यांविरोधात काम सुरु करावे.हा विषय एका दिवसात सुटणारा नाही,,याचीही मानसिक तयारी ठेवावी.देशातील सर्व राज्यकर्त्यांना हे भोंगे बंद पाडण्यास भाग पाडावे असे सांगत प्रत्येक राज्यातल्या नागरिकांनी आपापल्या सत्ताधारी राज्यकर्त्यांना हिंदूंची ताकद काय आहे,हे दाखवून देण्याचे आव्हान राज़ ठाकरे यांनी आपल्या पत्राद्वारे केले.

अझान व लाऊडस्पीकरविषयी……
रबी भाषेतल्या अझिना म्हणजे ऐकणे या शब्दावरुन अझान हा शब्द आल्याचं सांगितलं जातं.अझान म्हणजेच प्रार्थनेसाठी,नमाज पढण्यासाठी गोळा होण्यासाठी दिलेली हाक.मशिदीची देखभाल ठेवणारा मुआझिन अझानची वेळ झाली,की मशिदीच्या मनो-यावरुन प्रार्थनेसाठी हाक देतो.दिवसातून ५ वेळा अझान दिली जाते.नमाजची वेळ ठरलेली नसते.सूर्याच्या दिशेनुसार आणि स्थानानुसार दररोज वेळ बदलते.त्यामुळे ती त्याच दिवशी सांगितली जाऊ शकते आणि म्हणूनच एकाच वेळी सर्वांना ही वेळ समजावी व नमाज पठणासाठी बाेलवावं यासाठी लाऊडस्पीकरचा वापर सुरु झाला.

विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत सगळीकडे लाऊडस्पीकरचा वापर होऊ लागला.’द बिशप,द मुल्ला अँड द स्मार्टफोन’ या पुस्तकात लेखन ब्रायन विंटर्स यांनी माहिती दिली आहे,की इतिहासात पहिल्यांदा मशिदीमध्ये मायक्रोफोन-लाऊडस्पीकरचा वापर सिंगापूरमध्ये झाला.१९३६ साली सिंगापूरच्या मस्जिद सुलतानमध्ये लऊडस्पीकरवरुन अझान देण्यात आली.सुरवातीला मशिदीतले लोक नव्या इलेक्ट्रिक सिस्टिमविषयी साशंक होते पण शहराच्या वाढत्या गोंगाटात मुआझिनच्या आवाजाला यानं बळ मिळाल्याची भावना लोकांनी व्यक्त केली.पण गेल्या काही दशकात साऊंड सिस्टिमची क्षमता वाढत गेली,तसं लाऊडस्पीकरवरुन अझान हा वादाचा मुद्दा बनत गेला.भारतातच नव्हे तर जगभरात अगदी अरब आणि मुस्लीम राष्ट्रांमध्येही हा वादाचा मुद्दा बनला.

२००५ साली इजिप्तची राजधानी कैरोमध्ये अझानची पद्धत आणि त्यासाठी लाऊडस्पीकरचा वापर वादाचा मुद्दा बनला होता.लोकांनी तसंच काही धर्मप्रसारकांनी तक्रारीही दाखल केल्यावर अझानमध्ये सुसुत्रता आणण्यासाठी इजिप्तमध्ये प्रयत्न झाले,जे अजूनही सुरु आहेत.

गेल्या वर्षीच सौदी अरेबियातही मशिदींच्या लाऊडस्पीकर्सवर आवाजाची मर्यादा घालण्यात आली.

केवळ मशिदीतच नाही तर हिंदू,ख्रिश्‍चन अशा अन्य धर्मियांमध्येही वेगवेगळ्या सणांच्या वेळी तसंच उत्सव,लग्न,जत्रेत मोठ्या प्रमाणात लाऊड स्पीकरचा वापर होतो.भारतात लाऊडस्पीकरच्या वापरचे नियम आणि निर्बंध सर्व धर्मियांसाठी समान आहेत असं कायदेतज्ज्ञ सांगतात.

‘environmental protection act २०००’नुसार आवाजाचे नियमन आहेत.धार्मिक स्थळांना यातून सूट आहे असं काही नमूद केलेलं नाही.केवळ राज्य सरकारकडे १५ दिवस सूट देण्याचे अधिकार असतात.सण,उत्सव,सभा अश काही कारणांसाठी सरकार परवानगी देऊ शकतं.लाऊडस्पीकर वापरायचा असेल तर या कायद्यानुसार डेसीबल मर्यादेची अंमलबजावणी करावी लागते.त्यापेक्षा जास्त आवाज झाल्यास लाऊडस्पीकर वापरकर्ते आणि पुरवाणारे दोघांवर गुन्हा दाखल होऊ शकतो.

धार्मिकस्थळी लाऊडस्पीकरबाबत सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत अनेक याचिका दाखल झाल्या आहेत.२००५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यावर बंदी घातली आहे.

कुठल्याही धार्मिकस्थळांना नागरिकांच्या आरोग्याला त्रास देण्याचा अधिकार नाही असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

२०१६ साली मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या निकालात,लाऊडस्पीकरचा वापर करणं हा मूलभूत अधिकार नसल्याचे सांगितले होते.कोणताही धर्म हा मूलभूत अधिकार असल्याचा दावा करु शकत नाही,पण शांतीपूर्ण जीवन जगणं हा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले.

देशातील विधीतज्ज्ञ सांगतात त्याप्रमाणे जेव्हा दोन वेगवेगळ्या हक्कांसाठी वाद होत असतो तेव्हा न्यायालय मोठ्या लोकहिताचा विचार करीत असते.कोणत्याही एका धर्माची किंवा समुहाची बाजू घेतली जात नाही.ध्वनी प्रदूषणाचा कायदा प्रत्येकाला लागू आहे.कोणताही धर्म कायद्यापेक्षा मोठा नाही,तसंच मंदिर असे किवा मशीद ध्वनी प्रदुषण कायद्याचं उल्लंघन करु शकत नाही असे न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत.

भारतात लाऊडस्पीकर वापराविषयीचे नियम २००० साली लागू झाले.the noise pollution [regulation and control]अर्थात ध्वनी प्रदुषण व नियंत्रण या नावाने ते ओळखले जाते.हेच नियम मशीद व इतर धार्मिक स्थळांना लागू आहेत.

या नियमानुसार एखाद्या ठिकाणी लाऊडस्पीकर किंवा साऊंड सिस्टिम लिखित परवागनीशिवाय लावता येत नाही.बंदिस्त सभागृह,कॉन्फरन्स रुम किवा आपातकालीन परिस्थितीचा अपवाद वगळता रात्रीच्या वेळेस रात्री १० ते सकाळी ६ दरम्यान लाऊडस्पीकर लावता येत नाही.

काही सांस्कृतिक कार्यक्रम अथवा सणांच्या वेळेस राज्य सरकारे रात्री १० ते १२ वेळात लाऊडस्पीकरच्या वापराला परवानगी देऊ शकतात,पण ते दिवस आधीच जाहीर करावे लागतात.

सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा त्या ठिकाणच्या नेहमीच्या आवाजापेक्षा जास्तीतजास्त १० डेसिबल व तसंच ७५ डेसिबलपेक्षा जास्त असू शकत नाही.खासगी जागेसाठी ही मर्यादा ५ डेसिबलची आहे.

औधोगिक परिसरात दिवसा ७५ डेसिबल तर रात्री ७० डेसिबल,व्यावसायिक परिसरात दिवसा ६५ डेसिबल तर रात्री ५५ डेसिबल,रहिवासी क्षेत्रात दिवसा ५५ डेसिबल तर रात्री ४५ डेसिबल,सायलेंस झोनमध्ये दिवसा ५० तर रात्री ४० डेसिबलची मर्यादा न्यायालयाने घातली आहे.

हिंदुत्वाचा मुद्याला हात घालून मनसेने आता थेट मशिदींवरील भोंगे उतरवण्याची मागणी केली आहे.

 

 

Latest बातम्या