Homeनागपूर न्यूजसायंकाळी ६ नंतर मृत्य नको रे देवा......

सायंकाळी ६ नंतर मृत्य नको रे देवा……

मनपा कर्मचारी सांगतात ‘हम थक गये तूम खूद जलाओ!’

दू:खं गिळून नातेवाईक स्वत:च रचतात मृतकासाठी सरण

सगळ्याच घाटांवर हीच दूर्दशा

एका घाटावरची कमाई ३५ हजार रुपये!

लाेग कफन मे भी जेब ढूंढ रहे है’सामान्यांचा संताप

नागपूर,ता.२६ एप्रिल: मानेवाडा घाटावरची घटना,शववाहिकेसाठी दोन किलोमीटरसाठी दहा हजारांची रक्कम मोजून ते तीन नातेवाईक दहन घाटावर पोहोचले,मात्र मनपा कर्मचारी निघण्याच्या तयारीत होते,आमच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता कसे जाऊ शकता?हा सामान्यांचा स्वाभाविक प्रश्‍न सरकारी नोकरशाहीला केला असता ‘सुबह १० बजे से लाशे जलाते जलाते अब हम बहोत थक गये है’हमारी ड्यूटी खतम हो गई,अपनी डेडबॉडी अब खूद ही जलाओ’असे उत्तर देऊन घाटांवरुन नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी निघून जातात,अश्‍यावेळी आपल्या माणसाच्या मृतदेहाचे आणखी हाल होऊ नये म्हणून कोणताही अनुभव नसताना लाकडे रचण्यासाठी,गट्टंची जुळवाजुळव करण्यासाठी दू:खं गिळून मृतदेहासोबत आलेले ते दोघे-तिघे मिळेल त्या जागेवर सरण रचण्यासाठी तत्पर होतात!

मनपाचे कर्मचारी हे निश्‍चितच दिवसभरात १८-२० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करुन ‘दमलेले असतात’मात्र महामारीच्या या भीषण संकटात मानवतेच्या नात्याने तरी रात्री १०.३० पर्यंत दहन घाटांवर हे प्रशिक्ष्ति कर्मचारी यांची ड्यूटी लावण्याचे काम कोणाचे?का नाही ३ शिफ्टमध्ये शहरातील सर्व दहनघाटांवर मनपा अतिरिक्त कर्मचारी नेमून नागपूरकर नागरिकांच्या दू:खाचा डोंगर कमी करण्याचा प्रयत्न करत?असा सवाल केला जात आहे.

शहरात आज लॉकडाऊनमुळे अनेक युवा बेरोजगार झालेत,त्या युवाशक्तीला काम देत,त्यांना गाड्या,डिजेल उपलब्ध करुन देत?आपल्या माणसाच्या मृतदेहासाठी सरण रचण्याचे कठीण काम हे जर सामान्य माणसालाच करायचे असेल तर नागपूर महानगरपालिका नावाची स्थानिक प्रशासन संस्था ही कोणत्या कामाची?फक्त मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याच्या?असा संताप आता व्यक्त केला जात आहे.

पालकमंत्र्यांनी गेल्या महिन्यात घोषणा केली होती दहनघाटांवर अंत्यसंस्कार हे मोफत केले पाहिजे,२ हजार ३०० रुपये लाकडाचे,गट्टूचे ३ हजार रुपये सर्वच दहनघाटांवर घेतले जात आहेत यालाच मोफत अंत्यसंस्कार म्हणायचे काय?डिजेलचे पैसे देखील मृतकांच्या नातेवाईकांना द्यावे लागतात,मूळात पालकमंत्री हे आहेत तरी कुठे ?ही शोध माेहिम सोशल मिडीयावर सुरु आहे.डिजेल वाहीनीत तरी किती मृतदेह जाळणार आहे?जिवंतपणी तर रुग्णालय,खाटा आणि ऑक्सजीन देऊ शकले नाही किमान मृत्यूनंतर तरी सन्मानाने देह जाळण्याची व्यवस्था करा…..!एवढीच सामान्य मृतकांच्या सामान्य नातेवाईकांची अपेक्ष्ा मनपा पूर्ण करणार आहे का?

एका घाटावरची एका दिवसाची कमाई ३५ हजार रुपये!
करोनामुळे जनमाणसात एवढी भीती निर्माण झाली आहे की लोकं माणूसकीचा धर्म विसरले आहेत तर दूसरीकडे सरकारी कर्मचा-यांनी दहन घाटही पैसा कमवण्यासाठी सोडला नाही.करोनाचा संसर्ग संपर्कात आल्याने होत असल्याचे आरोग्य यंत्रणेने जाहीर करुन मृतकांवर अंत्यसंस्कार करण्याची जवाबदारी सर्वस्वी महानगरपालिकेवर निश्‍चित केली.आज मनपाचे हेच कर्मचारी मृतकांच्या नातेवाईकांकडून अस्थि गोळा करुन देण्यासाठी ५०० रुपये मागतात!अनेकांनी ‘सत्ताधीश’कडे हे सत्य उघडकीस केले मात्र त्यांची कोणतीही तक्रार या कर्मचा-यांप्रति नाही.जिथे सगेसोयरे करोनामुळे अस्थिंना हात लावण्यास धजत नाही तिथे हे कर्मचारी सहज अस्थि गोळा करुन मडक्यात देत असतात.

मात्र आज शहरातील सर्वच दहन घाटांवर एका दिवसात ७० जरी मृतकांचे अंत्यसंस्कार होत असले तरी एकाच दिवसात या कर्मचा-यांची कमाई एकाच दिवसात ३५ हजारांपर्यंत जात असल्याची चर्चा आहे.यातूनही कंत्राटदाराला व मनपा सत्ताधा-यांना किती ‘टक्केवारी’जाते यावर मात्र चांगलीच चर्चा रंगते.

एका कर्मचा-याने तर आम्ही रेमडिस्विहर इंजेक्शन चोरुन किवा भ्रष्ट मार्गाने पैसा कमवित नसल्याचे सांगितले.मृतकांचे नातेवाईक आम्ही मागतो तेव्हा स्वेच्छेने पैसे देऊन टाकत असल्याचे सांगितले……!

घरी मरणा-यांची नोंदच गायब!
प्रशासन हे फक्त रुग्णालयात मृत झालेल्यांचा आकडा जाहीर करीत आहे मात्र आज भयाण वास्तव हे आहे घरी किवा रुग्णालयात जाताना रस्त्यात सर्वाधिक रुग्ण मृत्यू पावत आहे,त्यांची नोंद मात्र प्रशासन का घेत नाही?शहरातील सर्वच दहन घाटांवरील मृतकांची संख्या आणि प्रशासनाने जाहीर केलेल्या मृतकांच्या संख्येत शेकडोने तफावत कशी?याचे कोणतेही उत्तर प्रशासन देत नाही…..!

मृत्यूचे आकडे लपवण्याचा केंद्र,राज्य शासनाचा दवाब!
केंद्राला भारताची बदनामी नको,आधीच अनेक देशांनी भारतीयांवर बंदी घातली आहे,राज्य सरकारला देखील मृत्यूचे खरे आकडे सांगून संकट ओढवून घ्यायचे नाही त्यामुळे मृतकांचे आकडे लपवण्याची सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळाली असल्याच्या बातम्या या चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत मात्र मृतकांचे आकडे कितीही लपवले तरी ‘वास्तव’बदलणार नाही हेच शहरातील सर्वच दहन घाट सांगत आहेत……!

संघाचे संकटकाळात कोणते योगदान?
करोना साथरोगाच्या संकटात सापडलेल्या कुटूंबियांबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी संवेदना व्यक्त करीत समाजाने एकमेकांच्या सहकार्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले यासोबतच  संघ आणि सर्व सामाजिक संस्था,उद्योजक,धार्मिक संघटना,स्वयंसेवी संस्थांना या संकटकाळात शक्य ते योगदान देण्याचे आवाहन केले,यावर देखील सोशल मिडीयावर बरीच चर्चा झडली.रेमडिसिव्हिर हे जर आज नागपूरात कुठे मिळत असेल तर संघवाल्यांकडेच मिळत असल्याची चर्चा आहे.

एका नगरसेविकेनेच एका महिला डॉक्टरला सांगितले तिला उपचारासाठी रेमडिसिव्हिर हवे असेल तर संघवाल्यांशी बोला…….!

एवढंच नव्हे तर समाजातील ज्या दानशूरांनी महापुरुषांच्या नावाने रुग्णवाहिका,शववाहिका दान केल्या,तेच आज खो-याने गरजूंकडून पैसा लुबाडून त्या महापुरुषांचे नाव बदनाम करीत आहेत!मग त्यात नेहरु असो,गांधी असो,डॉ.बाबासाहेब आंबेडकर असो किवा कोणतेही इतर दानशूर समुदायांच्या शव व रुग्णवाहिका असो,फक्त दोन किलोमीटरच्या प्रवासाकरीता दहा हजारांची रक्कम मागितली जात आहे,स्वत:च्या लोभामुळे भयंकर महामारीच्या काळात या महापुरुषांच्या नावालाच बट्टा लावण्याचे काम हे रुग्णवाहिका व शववाहिका कश्‍या करीत आहे,यावर जळजळीत टिका आज सोशल मिडीयावर उमटली होती…..!

कुठे आहे मृतकांच्या नातेवाईकांच्या टाहोमध्ये संघ,भीम आर्मी,बजरंग दल,विश्‍व हिंदू परिषद,संभाजी बिग्रेड,मराठा संघ,अमूक संघटना,तमूक संघटना,जाती-जातीच्या नावावर वोट बँकचे राजकारण करणा-या संघटना आणि राजकारणी?असा संताप समाज माध्यमांवर उमटला असून घरोघरी,रस्त्या रस्त्यावर फक्त ‘हुंदके‘ऐकू येत आहेत,आपल्या माणसाला सडलेल्या,किडलेल्या व्यवस्थेतून वाचवू न शकल्याची हताशा दिसून पडत आहे…या संतापाची झळ फक्त प्रत्यक्ष् दिसत नाही एवढंच…..!

नागपूरच्या रस्त्यावर ते भयाण दृष्य-
सुंदरबन ले आऊटमध्ये एका महाविद्यालयाची प्राचार्या गॅलरीत उभी असताना तिने गॅलरीतून जे पाहिले ते धक्कादायक होते,दोघे जण आईचा मृतदेह चक्क दूचाकीवर वाहून नेते होते……!कदाचित शवाहिकेला देण्यासाठी या भावांकडे १० हजार रुपये नसावे,मनपाची कंट्रोल रुम तर कधीचीच ‘आऊट ऑफ कंट्रोल’ झाली आहे,येथून गरजूंना कोणतीही मदत मिळत नाही,मिळतो फक्त संताप…..!

कोर्टाने ही झापले फासावर देऊ….
नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयानेही देश हा देवाच्या हवाली केल्याची टिप्पणी केंद्रिय व्यवस्थापनावर केली ऑक्सीजन कसा देणार?अशी विचारणा सर्वोच्च न्यायालाने केली तर ऑक्सीजन रोखाल तर फासावर चढवू म्हणत दिल्ली उच्च न्यायालयाने करोनाच्या या दुस-या लाटेला त्सुनामी म्हटले,न्यायालयाला शवाहिकेत,रस्त्यंवर तडफडून मरणा-यांची जाणीव आहे मात्र लाखो रुपये पगार घेणारी प्रशासकीय यंत्रणा मात्र अद्याप ही लाखो जीव घेऊन देखील कशी व किती ढिम्म आहे,यावर देखील चांगलाच संताप व्यक्त होत आहे.

माध्यमांवर संताप का?
प्रसार व प्रचार माध्यमे हे नागरिकांना अधिकच भयभीत करण्याचे काम करीत असल्याचे दोषारोपण माध्यमांवर केले जात असून,वृत्तपत्रे,वाहिन्या व सोशल मिडीयावर बातम्या पाहणे बंद करण्याचे आवाहन केल्या जात आहे मात्र बातम्या टाळल्याने घडणा-या घटना घडणे थांबणार आहे का?असा प्रश्‍न तज्ज्ञ विचारतात आहेत.यामुळे आपण फक्त सत्यापासून अनभिज्ञ राहू मात्र आजच्या काळात सभोवताल काय परिस्थिती आहे हे आपल्यालाही माहिती असणे आवश्‍यक असल्याचे मत जाणकार सांगतात.मूळात माहिती सांगणे हे माध्यमांचे कामच आहे,महामारी संपणारच आहे,आजपर्यंत इतिहासात देखील कोणतीही महामारी ही एक दोन वर्षांपेक्ष्ा जास्त प्रदीर्घ काळ पृथ्वीवर टिकून राहू शकली नाही,ही महामारी देखील संपेल मात्र माध्यमांच्या माध्यमातून जी काही माहिती मिळते त्यातून आपण आता गरजूंना,समाजाला कोणती मदत देऊ शकतो याची दिशा स्पष्ट होत असल्याचे किंग कोब्रा संघटनेचे अध्यक्ष् अरविंद कूमार रतौडी सांगतात.

त्यामुळे माध्यमांना दोष देणे हे सर्वथा चूकीचे असल्याचे ते सांगतात.आज आम्ही पण खूप दमलो पण कर्तव्याला चूकू शकत नाही आम्हाला देखील समाजातील तरुणाईचा हात हवा आहे,ज्यांच्या अंत्यविधित आम्ही गेल्या वर्षभरापासून नि:शुल्क व सेवाभाववृत्तीने मदत केली व करीत आहोत,त्या कुटुंबातील मुली देखील आम्हाला विचारतात आम्ही रात्रीच्या १० वा.देखील तुम्हाला सहकार्य करण्यासाठी घाटावर पोहोचू…हीच माणूसकी जपायची वेळ आहे,येथे तर ‘कफन मे भीं जेब ढूंढ रहे है…’‘अश्‍या शब्दात ते रुग्णालय,फॉर्मेसीसमोर गरजू,हताशांची लांब गर्दी व दहन घाटात मूतांची गर्दी बघून भर्त्सना करतात.

रुग्णालयांची लृट,रेमडिव्हिरचा काळाबाजार करणारे तर ठिक होते आज वाशिमच्या घटनेने तर अवघ्या मानवजातीलाच काळीमा फासली,तेथील जिल्हा परिषदेच्या रुग्णालयाच्या शवागारातील एका कर्मचा-यानी करोना मृतकाच्या हाताचे ठसे घेऊन त्याच्या बँकेतील रक्कमच लंपास केली……!

शहरातील सुप्रसिद्ध सामाजिक समाजसेवीलाच बसला प्रशासनाच्या कोडगेपणाचा फटका:माणूसकीवरचा उडाला विश्‍वास

शहरातील एका सुप्रसिद्ध सामाजिक समाजसेवीच्या घरातील महिलेचा करोनामुळे दूर्देवी मृत्यू झाला.या समाजसेवकाने गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात २०-२० हजार गरीबांना अन्नदान करुन जगवले.माणूसकीवर नितांत श्रद्धा असणा-या या समाजसेवकाला करोनाने माणूस आणि त्याची लोभी,स्वार्थी आणि संधीसाधूवृत्ती ओळखण्याची जणू संधी दिली मात्र घरातील एक कर्ताकरविता महिला गमावून….!
या सामाजिक कार्यकर्त्याने शहारातील अनेक भारदस्त नेत्यांकडेही मदत मागितली मात्र एक बेड ते आपल्या कुटुंबातील या महिलेसाठी अरेंज करु शकले नाहीत…..!सायंकाळी ६.३३ वा.या महिलेचा मृत्यू झाला,मनपाच्या शववाहिकेला फोन केला असता त्यांच्यासाठी हा मृत्यू देखील इतरांसारखा सामान्यच मृत्यू असल्याने त्यांनी तो मृतदेह घाटावर पोहोचविण्यासाठी तब्बल साढे पंधरा तास लावले,दूस-या दिवशी साढे अकरा वाजता त्या महिलेच्या नशीबी दहन घाटावरील अंत्यसंस्कार नशीबी आले मात्र तोपर्यंत….या दानशूर माणसाची माणूसकी,राजकारणी व प्रशासनावरची श्रद्धा पार उडाली होती.

आता नागपूर शहरातील अनेक दानशूर स्वयंसेवी संस्थांनी या घटनेचा धसका घेतला आहे...अश्‍या मुर्दाड समाजासाठी त्यांना काही करायचे नाही….जीव धोक्यात घालायचा नाही,अशी वेळ जर एवढ्या मोठ्या समाजसेवीवर नागपूरचे प्रशासन आणते तर समान्य माणसांची काय बिसात!

(नि:शुल्क अंत्यसंस्कारासाठी कॉल करा-अरविंदकूमार रतौडी-९०४९५५०८५४)

 

Latest बातम्या