

दिलीप वळसे पाटील यांचे निर्देश
नागपूर,ता. १६ नोव्हेंबर: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज नागपूर गडचिरोली दौऱ्यावर असताना नागपूर पोलीस जिमखाना येथे नागपूर पोलीस आयुक्तालयातील कायदा-सुव्यवस्थेचा व तयारीचा आढावा घेतला.
सदर आढावा बैठकीत नजीकच्या काळातील त्रिपुरा राज्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर अमरावती, मालेगाव व महाराष्ट्रातील इतर काही ठिकाणी उद्भवलेल्या कायदा व सुव्यस्थेच्या परिस्थितीच्या अनुषंगाने नागपूर शहर पोलीस दलाची काय तयारी आहे, याबाबत विस्तृत चर्चा झाली.
या घटना कशामुळे घडत आहेत, याच्या मुळाशी कोण व्यक्ती आहेत, याचा शोध घेण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी सदर बैठकीत दिल्या. तसेच समाज माध्यमांवर लक्ष ठेवून अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
या पार्श्वभूमीवर विविध वादग्रस्त संघटना व व्यक्तींवर नजर ठेवून सामजिक तेढ पसरविणाऱ्यांवर योग्य कारवाई करावी,असे निर्देश त्यांनी दिले.
गडचिरोली येथील कारवाईनंतर नागपुरात त्याचे पडसाद उमटू शकतात याची जाणीव ठेवून सावधानता बाळगावी, अशा सूचना गृहमंत्र्यांनी केल्या.
नागपूर पोलीसांनी केलेल्या उपाययोजना, समाज माध्यामांवर लक्ष, रात्रीची संचारबंदी, ब्रेक द चेनची अंमलबजावणी, संवेदनशील भागातील रुट मार्च यांची माहिती बैठकीत देण्यात आली.
नागपूर शहर पोलीस कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे नागपूर आयुक्तांनी सांगितले.

आमचे चॅनल subscribe करा