
नवी दिल्ली: सत्तास्थापनेच्या प्रक्रियेतील सर्व महत्त्वाचे मुद्दे संपले आहेत. दोन्ही काँग्रेसच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. उद्या पुन्हा आमची चर्चा होणार असून त्यानंतर शुक्रवारी शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यात येईल. शुक्रवार संध्याकाळपर्यंत सत्तेचा फॉर्म्युलाही तयार होणार असून त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत सत्तास्थापनेची अंतिम घोषणा करण्यात येणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. शिवसेनेसोबत जाण्याबाबत आजच्या बैठकीत तत्त्वत: मंजुरी देण्यात आल्याचे संकेतही त्यांनी दिले.
काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष भाजपला वगळून राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शिवसेनेनं आघाडीसोबत सरकार स्थापण्याची तयारी दाखवली असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. हा निर्णय घेण्यासाठी रोजच्या रोज जोरबैठका सुरू आहेत.
शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची तब्बल पाच तास बैठक झाली. त्यानंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रात गेल्या २१ दिवसांपासून अस्थिरता सुरू आहे. ही अस्थिरता संपवण्यासाठी दोन्ही पक्षांनी आज प्रदीर्घ चर्चा केली. चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. आज आणि उद्याही ही चर्चा सुरू राहणार आहे. चर्चा अंतिम टप्प्यात असल्याने महाराष्ट्रात लवकरात लवकर स्थिर सरकार स्थापन होईल, असा विश्वाच पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही राज्यात पर्यायी सरकार स्थापन होणार असल्याचं स्पष्ट केलं. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून राज्यातील प्रशासन ठप्प आहे. शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे राज्यात नवं सरकार यावं ही सर्वांचीच इच्छा असल्याने आमची सकारात्मक चर्चा सुरू आहे. ही चर्चा आज आणि उद्याही सुरू राहणार आहे, असं मलिक म्हणाले. सर्व मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे, असंही ते म्हणाले.
उद्याही बैठकांचं सत्रं
आज सकारात्मक चर्चा सुरू आहे. शिवसेना नेत्यांच्याही आम्ही संपर्कात होतो. उद्या सकाळी १० वाजता काँग्रेस पक्षाची बैठक होईल आणि दुपारी १ वाजता काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक होईल. त्यानंतर आम्ही रात्री उशिरा मुंबईत जाऊ. त्यानंतर शुक्रवारी दोन्ही पक्ष शिवसेना नेत्यांसोबत बसून चर्चा करतील आणि परवा रात्री अंतिम घोषणा केली जाईल, असंही चव्हाण यांनी सांगितलं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही आजची चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगितलं. नसीम खान यांनीही सर्व विषय निकाली काढले असून आम्ही खूप पुढे गेलो असल्याचं सांगितलं. लवकरच राज्यात सत्तास्थापनेचा मार्ग खुला होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, आज सायंकाळी साडेपाच वाजता पवारांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू झाली. रात्री ९च्या सुमारास ही बैठक संपली. त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे आणि अहमद पटेल हे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना भेटायला गेले. त्यानंतर पुन्हा हे नेते पवारांच्या घरी आले आणि बैठकीला सुरुवात झाली. रात्री ११ वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांनासामोरे जात ही माहिती दिली.

आमचे चॅनल subscribe करा