
मुंबई: राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सत्ता स्थापन करण्यात असमर्थ असल्याचं राज्यपालांना सांगितल्यानंतर राज्यपालांनी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. उद्या सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याची मुदत देण्यात आल्याने शिवसेनेला आकड्यांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येतं.
उद्याच सत्तास्थापनेचा दावा करायचा असल्याने शिवसेना भाजपला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा मागणार की काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा मागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेने केंद्र आणि राज्यातील भाजपसोबतची युती तोडावी आणि केंद्रातील मंत्रिपद सोडावं, असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना महायुती आणि एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा करणार का? याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. दरम्यान, आज संध्याकाळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर मढ येथील हॉटेल द रिट्रीट येथे शिवसेनेच्या आमदारांना भेटण्यासाठी आले होते.

आमचे चॅनल subscribe करा