Homeराजकारणशिवसेनेला सत्तास्थापनेचं राज्यपालांचं निमंत्रण

शिवसेनेला सत्तास्थापनेचं राज्यपालांचं निमंत्रण

Advertisements
Advertisements

मुंबई: राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सत्ता स्थापन करण्यात असमर्थ असल्याचं राज्यपालांना सांगितल्यानंतर राज्यपालांनी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. उद्या सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याची मुदत देण्यात आल्याने शिवसेनेला आकड्यांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येतं.

काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज सायंकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. यावेळी या शिष्टमंडळाने भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर रात्री उशिरा राजभवनातून शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी निमंत्रण पाठवलं. मात्र उद्या सोमवारी संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्याची मुदत देण्यात आल्याने शिवसेनेची तारेवरची कसरत होणार आहे.

उद्याच सत्तास्थापनेचा दावा करायचा असल्याने शिवसेना भाजपला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा मागणार की काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा मागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेने केंद्र आणि राज्यातील भाजपसोबतची युती तोडावी आणि केंद्रातील मंत्रिपद सोडावं, असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना महायुती आणि एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा करणार का? याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. दरम्यान, आज संध्याकाळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर मढ येथील हॉटेल द रिट्रीट येथे शिवसेनेच्या आमदारांना भेटण्यासाठी आले होते.

त्यांनी आमदारांशी चर्चाही सुरू केली होती. मात्र राज्यपालांनी सत्तेचा दावा करण्याचं निमंत्रण दिल्यानं आणि वेळ अत्यंत कमी असल्याने आदित्य ठाकरे, शिंदे आणि नार्वेकर ही मिटिंग अर्धवट सोडून मातोश्रीकडे रवाना झाले. मातोश्रीवर सत्तास्थापनेबाबतची चर्चा करण्यात येणार असून शिवसेना नेते संजय राऊत आता सत्तेचा आकडा कसा जुळवतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून भाजपला सर्वाधिक १०५ जागा जिंकता आल्या आहेत. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने या निवडणुकीत ५४ आणि काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या आहेत. बहुजन विकास आघाडीला ३, एमआयएमला, समाजवादी पार्टीला आणि प्रहार जनशक्ती पार्टीला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. त्याशिवाय माकप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पार्टी, शेकाप, मनसे, रासपला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविता आला आहे. या निवडणुकीत एकूण १३ अपक्षही निवडून आले आहेत.

Latest बातम्या