Homeनागपूर न्यूजनारायण...नारायण!

नारायण…नारायण!

नागपूर,ता.१० जून २०२३: आज पत्रकार परिषद घेऊन एका संस्थेद्वारे देवर्षि नारद पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.मात्र,पुरस्कारप्राप्त काही नावांवर तसेच ही नावे निश्‍चित करणा-या निवड समितीवरच आज पत्रकार परिषदेनंतर बरीच आगपाखड झाली.यातील काही नावे अनेक छूप्या कारणांमुळेही अतिशय ‘अयोग्य’असल्याची देखील टिका उमटली, त्यामुळे देवर्षि नारदाच्या नावाने प्रदान केल्या जाणा-या या पुरस्काराविषयी पत्रकार जगतालाच आज ‘नारायण…नारायण’म्हणायची वेळ आली.

पुरस्कार म्हटला तर तो कोणाला सुखावणारा असतो तर ‘पात्र’असूनही तसेच योग्य संकेतस्थळावर संपूर्ण कार्यकर्तुत्व मांडूनही, नावाचा विचार न झाल्याने अनेकांचा आत्मसन्मान दुखावणाराही असतो.असेच या वेळी घडले.नागपूरच्या पत्रकारितेच्या जगतात सध्या ‘चार चौघे’म्हणून ‘कू’प्रसिद्ध असणा-या माध्यमकर्मींपैकी गेल्या वर्षी एकाला तर तेच ‘महानुभव’नियमाप्रमाणे निवड समितीत असल्याने त्याने चार चौघांमधील दुस-या एका व्यवसायिक बंधूंच्या नावाची ‘निश्‍चिती’केल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे एका राजकीय पक्षाशी संबंधित कुख्यात जमीन हडपणारा खंडणीखोर व गुंड प्रवृत्तीच्या तसेच अनेक गुन्हे दाखल असणा-या त्या गुंडाकडून पत्रकारितेच्या जगतातील  ‘पांढरपेशी’गुंडांनी दोन-दोन लाख रुपयांची ‘मागणी’नव्हे तर ‘खंडणीच’उकळल्याच्या चर्चेलाही या मुळे पुन्हा एकदा उजळणी मिळाली.नियमाप्रमाणे हाच पांढरपेशा पुढील वर्षीच्या निवड समितीत असल्याने ‘चार चौघांमधील’तिस-यासाठी व यानंतर चौथ्याच्या पुरस्कारासाठी ‘नियाेजन’करणार असल्याची खमंग चर्चा देखील त्यामुळे चांगलीच रंगली.

या चार चौघांपैकी एकाकडे तर तीन कोटींची माया असल्याचे बोलले जात आहे तर दोघांचे नागपूर व मुंबईत आलिशान फ्लॅट असल्याची चर्चा आहे.एका उर्जावान मंत्र्यांनी यातील एकाच्या ‘पात्र-अपात्र’ पत्नीचे पुर्नवसन चक्क त्यांच्याच खात्यात केल्याने, हातात बूम घेऊन या मंत्र्यांवर ख-या लोकशाही तसेच पत्रकारितेला अपेक्षीत प्रश्‍नांची सरबत्ती करने तर सोडा, उलट हे एकेकाळचे मंत्री महोदयच या सर्व चारही ‘लाभार्थी‘बूमधारी माध्यमकर्मींकडून बाईट्स ची ‘रिहर्सल’करुन घेत असल्याची व अश्‍या रिहर्सल पत्रकारितेच्या किस्स्यांचे चांगलेच चर्वितचर्वण पत्रकार जगतात रंगत आहे.

यामुळेच कलेक्टीव नव्हे तर फक्त चारच सिलेक्टीव्ह बूमधा-यांनाच त्यांच्या बाईट्सविषयीचे निरोप पर्सनल फोनद्वारे गेले पाहिजे,इतर कोणालाही नाही,असे आपल्या स्वीय सहायकांना या माजी मंत्र्यांनी निर्देश दिल्याने पत्रकार जगतात  चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे मुंबई,पुणे,नाशिक,कोल्हापूरसारख्या शहरात पक्षाच्याच कार्यालयात पत्र परिषदा घेणे बंधकारक असताना व या बंधनाचे पालन जवळजवळ महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष कसोशिने करीत असताना] या नियमाला फक्त राज्याची उपराजधानीच अपवाद ठरली आहे.हे माजी मंत्री महोदय कधी नागपूरपासून १२ किलोमीटर दूर असणा-या त्यांच्या निवास स्थानी तर कधी मध्यवर्ती ठिकाणाच्या एका क्लबमध्येच चार चौघांना बाईट्स देण्यासाठीच वारंवार उपलब्ध होत असतात.नागपूर शहरात या राजकीय पक्षाचे एक सोडून दोन-दाेन प्रशस्त कार्यालये आहेत, व ते सुद्धा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असतानाही, पक्षाचे कार्यालय सोडून इतर ठिकाणी सिलेक्टीव्ह माध्यमकर्मींसाेबत संवाद साधण्याच्या हेतूमागे, अडचणीत आणना-या प्रश्‍नांची सरबत्ती टाळण्याची प्रवृत्ती असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, देवर्षि नारद पुरस्कारांमध्ये  या वर्षी दोन नवीन गटातील पुरस्कारांची घोषणा देखील करण्यात आली. यात लक्षवेधी पुरस्कार होता तो प्रथमच दिला जाणारा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स गटातून निखिल चंदवानी , नागपूर यांना घोषित होणारा पुरस्कार. चंदवाणी यांना एवढ्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे मानकरी कोणत्या निकषाच्या आधारावर ठरविण्यात आले?ते पत्रकार जगतातील आहेत का?ही निवड करताना व्यूअर्स,फोलोअर्स इत्यादी निकष ठेवण्यात आले का?‘सत्ताधीश’ने या संदर्भात विश्‍व संवाद केंद्राचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक यांच्यासोबत संवाद साधला असता,सर्व पुरस्काराचे मानकरी समितीनेच ठरविले असल्याचे त्यांनी सांगितले.समिती गठीत करण्याचे निकष हे ठरलेले असतात.समितीचे सदस्य हे बदलत असतात,चंदवाणी यांना जाहीर झालेला पुरस्कार समितीने त्यांनी संकेत स्थळावर पाठवलेल्या माहितीच्या आधारावर जाहीर केला असल्याचे ते म्हणाले.

त्यामुळे चंदवाणी यांच्या फेसबुक प्रोफाईलवर गेले असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे जवळीकीचे नाते सांगणारे  अनेक छायाचित्र आढळले.यामुळे हा पुरस्कार कोणाच्या इन्फ्लूएन्सनी प्राप्त झाला असावा,असा कयास आता लावल्या जात आहे.उपमुख्यमंत्र्यांसोबत छायाचित्रे असने हा कर्तृत्व झाकोळण्याचाही निकष होऊ शकत नाही मात्र अगदी पहील्यांदा नव्या श्रेणीत पुरस्कार जाहीर केला जात असताना जुळून आलेला हा ‘योगायोग’अनेकांच्या पचनीही पडला नाही.

याशिवाय पत्रकारितेच्या जगतासाठी खासगी एजंसी चालविणा-या एका माजी महिला पत्रकाराचा निवड समितीतील समावेश देखील अनेकांना खटकून गेला.पुरस्कारासाठी काही पत्रकारांची शिफारस, हे मिडीया संबंधीची खासगी एजंसी चालविणा-या त्या महिला पत्रकाराद्वारे होणे म्हणजे, इतर पत्रकारांना तसेच त्यांच्या कार्यकर्तृत्वाला डावलण्यासारखा प्रकार असल्याची देखील खरमरीत टिका ऐकू आली.पत्रकार म्हणून त्या माजी महिला पत्रकाराच्या कार्यकर्तृत्वाविषयी कोणतीही शंका नाही मात्र आता खासगी एजंसी चालवित असल्याने व सर्वच माध्यमातील सर्वच पत्रकारांसोबत आपले व्यवसायिक हित जोपासणे गरजेचे असताना, निवड समितीतील त्यांची दखलअंदाजी अनेकांना नापसंद ठरली.

थोडक्यात आरोप-प्रत्यारोप करने हे फार सोपे आहे मात्र प्रतिष्ठीत,विश्‍वासार्ह्य तसेच नीती,मूल्यांच्या तत्वावर पत्रकारिता करने हे आजच्या काळात तरी महाकठीण काम होऊन बसले आहे.

पत्रकारिता ही अनेकांसाठी शॉर्टकटने पैसा कमविण्याचे साधन झाले आहे.नुकतेच आयपीएलदरम्यान एका क्रिकेट बुकीकडूनच चक्क दोन लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार एका स्थानिक वृत्त माध्यमातील पत्रकाराच्या सहयोगीकडून घडला व बेदम मार देखील खालला.मार खाणा-या या तथाकथित वार्ताहराचे सीसीटीव्ही फूटेजही चांगलेच व्हायरल झाले होते.या कोल्ड वार मध्ये नागपूरातील एक स्थानिक वृत्त वाहीनी व एका डिजिटल माध्यमाने एकमेकांचे वाभाडे काढणा-या बात्म्या व्हायरल केल्या.काही तासांनंतर त्या डिलिट देखील केल्या मात्र तोपर्यंत हजारो व्यूअर्स ते बघून चूकले होते.हा सर्व गलिच्छ व पत्रकारितेच्या नीती मूल्याच्या चौकटीत न बसणारा प्रकार बघून माध्यम जगतातील अनेक माध्यमकर्मींवर खरोखरच ‘नारायण..नारायण’म्हणायची वेळ आली.

नागपूरातच वृत्तपत्र जगतात आमचीच ‘सत्ता‘असल्याचा दावा करणा-या वृत्तपत्रातील क्राईम बिट सांभाळणा-या एका वार्ताहरावरच चक्क पोलिसांनाच दोन लाखांची खंडणी मागणा-याची तक्रार वरिष्ठांपर्यंत पोहोचते व त्याची तात्काळ हकालपट्टी होते याशिवाय लाेकांच्या ‘मता‘ला किंमत देण्याचा दावा करणा-या एका वृत्तपत्रातील क्राईम बिट सांभाळणा-या वार्ताहराकडून त्याच्या अशाच काही खंडणीवसूली कृत्यामुळे क्राईम बिट काढून घेतली जाते त्यावेळी पत्रकारितेचे क्षेत्र हे किती रसातळाला गेले आहे याची प्रचितीही येते.

देवर्षि नारद हे निदान ब्रम्हांडातील देवदेवतांना सावध करण्यासाठी व येणा-या संकटांपासून मार्ग काढण्यासाठी ‘नारायण…नारायण‘चा जप करीत होते.कलियुगातील काही नारायण, हे पत्रकारितेची मूल्येच धूळीत मिसळून फक्त गडगंज पैसा कमविण्यासाठीच या क्षेत्रात आलेली दिसून पडतात.अनेक पोलिस ठाण्यात त्यांच्यावर दाखल झालेले खंडणीचे गुन्हेच याची साक्ष देतात. त्यामुळेच आजच्या काळात पत्रकारितेविषयीचा एखादा छोटासा सन्मानही मूल्याधिष्ठित पत्रकारांना सुखावून जाणारा ठरतो.मात्र,चाटूकारितेच्या लोलूपतेत त्यांच्याकडून हाच सन्मान हिरावला जात असल्यास त्यामुळेच कठोर टिका उमटताना दिसून पडते.

देवर्षी नारद हे लोककल्याणकारी व समाजाभिमूख संवाद माध्यमासाठी गणले जातात.किमान त्यांच्या नावाने दिला जाणारा सन्मान हा ‘योग्य’ मानकरींना मिळावा असा सूर आज पत्रकार परिषदेतनंतर उमटला होता.

………………………………..

 

Latest बातम्या