Homeराजकारणदेशात सध्या महागाई, निराशा व चिंतेची लाट; मोदी लाट ओसरली: पवन खेरा

देशात सध्या महागाई, निराशा व चिंतेची लाट; मोदी लाट ओसरली: पवन खेरा

Advertisements

जनतेच्या मुख्य मुद्द्यांकडे मोदी सरकारचे दुर्लक्ष, फक्त इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये पटाईत

दिल्लीतील रामलीला मैदानावर ४ सप्टेंबरला महागाई विरोधात काँग्रेसची महारॅली.

मुंबई, दि. २९ ऑगस्ट: देशात आज सर्वात मोठी समस्या महागाई व बेरोजगारी असून महागाई कमी करण्यात व तरुणांना नोकरी देण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅससह अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगणाला भिडल्या आहेत. जनता महागाईने त्रस्त झाली असताना मोदी सरकार मात्र या मुख्य मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी धार्मिक मुद्द्यांना पुढे रेटत आहे. देशात सध्या कोणाचीही लाट नसून केवळ महागाई, चिंता व निराशेची लाट आहे, अशी घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष पवन खेरा यांनी केली आहे.

गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पवन खेरा म्हणाले की, महागाई आटोक्यात आणण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे व त्यावर सरकारकडे उत्तरही नाही, सरकार महागाईच्या मुद्द्यावर बोलण्यास घाबरत आहे. केंद्र सरकारचे महागाई संदर्भात करत असलेले दावे धादांत खोटे असून ‘युपीए’ व ‘एनडीए’ सरकारच्या काळातील किमतीची तुलना केली तर महागाई किती प्रचंड वाढली आहे हे लक्षात येते.

डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकार सरकारच्या काळात एसपीजी सिलिंडर ४१० रुपयाला मिळत होते ते आज १०५३ रुपयाला झाले आहे म्हणजे तब्बल १५६ टक्के वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा १०७ डॉलरचा दर असताना  युपीए सरकारने ७५ रुपयांच्या वर पेट्रोलचा दर जाऊ दिला नाही पण आज कच्च्या तेलाचा दर ९७ डॉलर असतानाही पेट्रोल १०६ रुपये लिटर तर डिझेल ९७ रुपये लिटर आहे.

गॅसचे वाढते दर परवडत नसल्याने उज्ज्वला गॅस कनेक्शन घेतलेल्यांना दुसरा सिलिंडर घेणे परवडत नाही. कोवीड नंतर महागाई वाढली हा भाजपा सरकारचा दावा धादांत खोटा आहे. दुध, दही, आटा, पनीरवर जीएसटी लावणार नाही असे छातीठोकपणे सांगणाऱ्या नरेंद्र मोदी यांनीच आता यावर जीएसटी लावला आहे. नोटबंदी करुन काय साध्य केले हे भाजपालाच कळले नाही. जीएसटीची अंमलबजावणी करतानाही मध्यरात्री मोठा इव्हेंट केला. मोदी हे फक्त इव्हेंट मॅनेजमेंट करण्यात पटाईत आहेत.

महागाई, बेरोजगारीने जनता त्रस्त असून काँग्रेस पक्षाने या मुद्द्यावर अनेकवेळा रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत. संसदेतही मोदी सरकारला महागाईच्या प्रश्नावर जाब विचारला पण मोदी संसदेत बसतच नाहीत. काँग्रेस पक्ष मात्र जनतेचे मुद्दे सातत्याने लावून धरत आहे. ४ सप्टेंबर रोजी दिल्लीत रामलीला मैदानावर काँग्रेसने महागाईच्या मुद्द्यावरच मोठ्या रॅलीचे आयोजन केले असून झोपी गेलेल्या मोदी सरकारला जागे करण्याचे काम यावेळी केले जाणार आहे, असेही पवन खेरा यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजितसिंह सप्रा, प्रदेश सरचिटणीस डॉ. राजू वाघमारे, सुनिल अहिरे, युवराज मोहिते हे उपस्थित होते.

Latest बातम्या