
नवी दिल्ली: महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर भाजपचे केंद्रीय नेते गेले बरेच दिवस मौन बाळगून होते. आज प्रथमच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगावर भाष्य केले. ‘शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी आम्हाला स्वीकारार्ह नाही. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी सरकार स्थापन करावे,’ असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला आव्हान दिले.
आपला मुद्दा अधिक स्पष्ट करताना शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांचा दाखला दिला. त्यांनी सांगितले, ‘जर आमच्या महायुतीला निवडणुकीत यश मिळालं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असं मोदींनी सार्वजनिक व्यासपीठावर अनेक वेळा सांगितलं. त्याचवेळी शिवसेनेने विरोध का केला नाही. आता ते नवी मागणी करू लागले, ती आम्ही मान्य करू शकत नाही.’ शहा यांनी राज्यपालांच्या राज्यातील राष्ट्रपती राजवटीच्या निर्णयाचंही समर्थन केलं. ते म्हणाले, ‘यापूर्वी सरकार स्थापन करण्यासाठी एवढा वेळी कोणत्याही राज्यात दिला गेला नव्हता. १८ दिवसांची मुदत दिली होती. राज्यपालांनी सर्व पक्षांना विधानसभेच्या कार्यकाळ संपल्यानंतरच बोलावंलं. शिवसेना, काँग्रेस, एनसीपी आणि आम्ही सरकार स्थापनेचा दावा केला. आजही जर कुठल्या पक्षाकडे संख्याबळ असेल तर तो पक्ष राज्यपालांकडे जाऊ शकतो.’
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात काल मध्यरात्री ट्रायडंट हॉटेलमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. यावेळी शिवसेनेने स्वत:साठी पाच वर्षा करिता मुख्यमंत्रिपद मागितले असून दोन्ही काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद देण्याचा फॉर्म्युला सूचवला आहे. मात्र त्याला राष्ट्रवादी तयार नसल्याचं सांगण्यात येतं.

आमचे चॅनल subscribe करा