
सांगली, ता. ६ जुलै २०२२: : पंढरपूर वारीला जात असताना अचानक झालेल्या अपघातामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जखमी झालेल्या वारकऱ्यांना योग्य ते उपचार करण्यास कोणतीही हयगय करू नका. त्यांना कोणत्याही समस्येमुळे उपचार मिळाले नाहीत, असे होऊ नये. त्याचबरोबर या जखमींमधील महिलांची विशेष काळजी घेण्यात यावी, असे निर्देश आज सांगली जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला आज विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. सांगली जिल्ह्यातील रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी रुपेश शिंदे यांच्याशी उपसभापती कार्यालयाने संपर्क साधला होता.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जात असताना कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील संत बाळूमामा दिंडीतील वारकऱ्यांना अचानकपणे एका वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये १४ वारकरी जखमी झाले. यामध्ये १० महिलांचा समावेश आहे.
या जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या तब्येतीची आणि उपचारांची डॉ.गोऱ्हे यांनी आज माहिती घेतली. याचबरोबर या वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व उपचारांसाठी योग्य ती खबरदारी घेतली जावी असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
या जखमी वारकरी लोकांशी डॉ. गोऱ्हे यांनी दूरध्वनी वरून संवाद साधला आणि त्यांची विचारपूस केली.
आकाताई पाटील, अक्काताई कांबळे, आक्काताई नाईकवाडे, सुरेखा पाटील अशी त्यांची नावे आहेत.
मिरज सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे यांच्याशी सर्व रुग्णांबाबत चर्चा केली. या रुग्णांसाठी प्रत्येकी ३ रुग्णामध्ये एक वैद्यकीय मदतनीस नेमून आवश्यक वैद्यकीय मदत वेळेत द्यावी, याबद्दल सूचना केली.
तसेच या रुग्णांना तज्ञामार्फत समुपदेशन करावे, काही रुग्णांना आर्थिक मदत व हॉस्पिटल मधून घरी जाण्यासाठीची व्यवस्था शिवसेनेमार्फत करण्यात येईल, असे यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
या वारकऱ्यांना शासकीय स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मदत मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात उपसभापती कार्यालयाकडून सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
या वारकरी बांधवांसाठी सांगली शिवसेना पदाधिकारी सह संपर्क प्रमुख बजरंग पाटील, माजी जिल्हा प्रमुख सुनीता मोरे, उपसभापती कार्यालयाचे खाजगी सचिव रविन्द्र खेबुडकर यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

आमचे चॅनल subscribe करा