काँग्रेस पक्ष सोडणार नाही पण दूसरा काँग्रेसी गट करणार स्थापन: असंतुष्टांचा इशारा
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.१६ एप्रिल २०२६: डिसेंबरच्या २७ तारखेला नागपूरच्या राजकारणात एक गुन्हेगारी घटना घडली.
मुलाच्या शिक्षणासाठी पैशाची गरज असल्याचे दाम्पत्याने स्वत:जवळचे १११.५ ग्रॅम सोने गहाण ठेवून ३ लाख रुपये घेतले. व्याजाची परतफेड केल्यानंतर दाम्पत्य सोने सोडविण्यासाठी गेले असता शिवसेना (शिंदे)गटाचे जिल्हाध्यक्ष सुरज गोजे व त्याचे वडिल मोहन गोजे यांनी नकार दिला. अश्लील, जातिवाचक शिविगाळ करून मारण्याची धमकी देवून हाकलून लावले. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बापलेकाविरोधात अॅट्रॉसिटी आणि सावकारी विरोधी कलमान्वये गुन्हा दाखल केला.
वैशाली घनशाम चापरे (४४, रा. न्यू नरसाळा) असे तक्रारदार महिलेचे नाव असून,गणेशपेठ पोलीसठाण्यात दिलेल्या तक्रारीत वैशाली चापरे यांनी नमुद केले की, १७ आॅगस्ट २०२० मध्ये त्यांना त्याचा मुलगा तुषार (वय २२) याच्या शिक्षणाकरीता पैशाची आवश्यकता होती. मोहन शामराव गोजे (वय ६५, रा.म्हाळगी नगर) यांच्याशी परिचय असल्यामुळे आम्ही त्यांच्या घरी जावून गरज सांगितली आणि ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, ४ ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र, ५ ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र, १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, १६ ग्रॅम वजनाचे सोन्याचा लॉकेट असलेला गोफ, ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट असलेली चेन, १९ ग्रॅम वजनाच्या ४ सोन्याच्या अंगठ्या, ९.५ ग्रॅम वजनाचे दोन जोडे सोन्याचे टॉप्स असे एकूण १११.५ ग्रॅम वजनाचे दागिने गहाण ठेवून १.५ टक्के व्याजदराने ३ लाख रुपये घेतले. यातील २ लाख ४० हजार रुपये नगदी व उर्वरित ६० हजार रुपये पतीच्या फोन पेवर पाठविले. मोहन गोजे यांनी सोने घेताना १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सोने गहान ठेवून व्याजाने पैसे देत असल्याचे नमूद केले होते.
डिसेंबर २०२४ पर्यंत वैशाली चापरे यांचे पती घनशाम चापरे यांनी मोहन गोजे यांना कधी नगदी तर कधी फोन पेच्या माध्यमातून १ लाख ९० हजार रुपये व्याज दिले. कर्जाने घेतलेले पैसे व्याजासह परत केल्यानंतर १११.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सोडविण्यासाठी घरी गेले असता त्यांनी दागिने देण्यास नकार देवून विसरून जाण्यास सांगितले. त्यानंतर चापरे दाम्पत्य वारंवार गोजे यांच्या घरी जावून त्यांना दागिने परत मागण्यासाठी गेले असता त्यांनी परत केले नाही.
जुलै २०२५ मध्ये मोहन गोजे यांनी घनश्याम चापरे यांना जागनाथ बुधवारी येथील त्यांचा मुलगा सुरज मोहन गोजे याच्या शिवसेनेच्या कार्यालयात बोलावले. यावेळी मोहन गोजे याने घनशाम चापरे यांना अश्लील, जातीवाचक शिविगाळ केली. तसेच राजकीय वजनाचा धाक दाखवून मारहाणीची धमकी दिली आणि हाकलून दिले.अखेर वैशाली चापरे यांनी हुडकेश्वर पोलीसठाण्यात जाऊन घडलेली आपबिती सांगितली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी मोहन शामराव गोेजे आणि सुरज मोहन गोजे यांच्याविरोधात अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक अधिनियम), महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, भारतीय न्याांय संहिता अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
ही घटना आठवण्या मागचं कारण सुरज गोजेचं नाव आज पुन्हा एकदा प्रसार माध्यमात ठलकपणे प्रसिद्ध झाले.याचे कारण महानगरपालिकेतील दहा स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी बुधवारी नामनिर्देशन अर्ज दाखल झाले त्यात भाजपने देवेंद्र मेहर,विनोद बघेल,संजय ठाकरे,जितू ठाकूर,रितेश गावंडे,सुबोध आचार्य यांचे अर्ज दाखल झाले त्यात मित्र पक्ष असलेल्या शिंदे सेनेच्या एका उमेदवाराचा अर्ज भाजपने स्वीकृत सदस्य म्हणून नामनिर्देशित केले ,ते नाव आहे शिंदे सेनेचे शहराध्यक्ष सुरज गोजे!
बेकायदेशीर सावकारी व अट्रासिटीसारखे गंभीर आरोप असलेल्या सुरज गोजेंना भाजपने स्वीकृत सदस्य म्हणून नामनिर्देशित केल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
मूळात नागपूर मनपा तसेच पुरोगामी विचारधारेच्या महाराष्ट्रात स्वीकृत सदस्यासाठी डॉक्टर,वकील,अभियंते,सीए,शिक्षक,,साहित्यिक आदी समाजातील नामवंतांना नियुक्ती देण्याचा कायदा अस्तित्वात असताना,कायदे करणा-यांनीच आपले कायदे संधीसाधू राजकारणाच्या खुंटीवर टांगून ‘हम करे सो कायदा’ही वृत्ती जनतेला दाखवून दिली असल्याची टिका समाज माध्यमांवर केली जात आहे.
नागपूर हे शहर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर आहे .त्यात राज्यातील कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याचे व सर्वसामान्य रयतेचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेले गृहखाते देखील त्यांच्याचकडे असल्याने, लोकप्रतिनिधींना जबाबदार पदांवर नियुक्त करताना निदान त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात नसेल, तर राजकारण आज कोणत्या स्तरावर पोहोचले आहे,याचे अनेक दाखलेच समाज माध्यमांवर आता दिले जात आहेत.
१५ नोव्हेंबर २०२५ रोजी फडणवीसांनी बिहार निवडणूकीच्या संदर्भात राहूल गांधींना प्रतिउत्तर देताना ‘राजकारणात जो जिंकतो तोच सिकंदर असतो’असे म्हटले होते.त्यांचे तेच बोल नागपूर मनपात स्वीकृत सदस्याची नियुक्ती करताना कृतीत उतरलेली दिसून पडतेय,अशी टिका केली जात आहे.
१० ऑगस्ट २०२१ रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने भाजप व काँग्रेसह आठ राजकीय पक्षांना एक लाख ते पाच लाख दंड ठोठावला होता कारण निवडणुकांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करताना राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर केली नव्हती,जेव्हा की सर्वोच्च न्यायालयाचे अशी पार्श्वभूमी जाहीर करण्याचे स्पष्ट आदेश होते.अशा उमेदवारांची विस्तृत माहिती उमेदवारी जाहीर केल्यानंतर ४८ तासांच्या आत वेबसाईट्सवर जाहीर करण्याचे निर्देश न्यायालयाने एका याचिकेच्या संदर्भात दिले होते.गोजे यांच्या प्रकरणात तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरही ‘पार्टी विथ डिफरेन्स’भाजप गोजेंना स्वीकृत सदस्य म्हणून ‘सन्मान’देताना दिसून पडला!
गेल्या महिन्यात २ मार्च २०२६ रोजी केंद्रीय मंत्री व नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी स्थापना दिनानिमित्त ,’नागपूर महानगरपालिकेला आदर्श महापालिका बनविण्याच्या दृष्टीने काम करा’,असा मोलाचा सल्ला दिला होता.त्यामुळेच गोजे प्रकरणानंतर ‘आड्यात नाही तर पोह-यात कूठून येणार’असा सवाल आता विचारला जात आहे!
जी मनपा भ्रष्टाचारचे कुरण बनली आहे,मनपा कर्मचारीच ‘एमडी’रॅकेटमध्ये सापडतो,अशा मनपात लोकप्रतिनिधींचीही पार्श्वभूमी आरोपीची असेल तर सामान्य नागपूरकरांनी त्यांच्या प्रश्नांसाठी कुठे जावे?कपिल गंगाधर खोब्रागडे या मनपाच्या आरोग्य विभागाच्या व्यवस्थापकाकडे ९० लाख ७० हजार किंमतीचे ९०७ ग्रॅम मेफोड्रोन सापडली होती,हा मनपाचा इतिहास नागपूरकर अद्याप विसरलेले नाहीत.
स्वीकृत सदस्यांच्या नावावारुन केवळ भाजप व मित्र पक्ष शिंदे गट यांच्याच विषयी कलगीतुरा रंगला नसून, आमदार विकास ठाकरे शहराध्यक्ष असलेल्या पुरातन राजकीय पक्ष काँग्रेसमध्येही काहीच आलबेल नाही.त्यांनी आपले सुपुत्र केतन ठाकरेला, स्वीकृत सदस्य म्हणून मनपात पाठवण्यासाठी नामनिर्देशित अर्ज सादर केला आहे.यावर काँग्रेसच्या निष्ठांवतांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.तब्बल ४६ वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले ज्येष्ठ नेते आणि प्रदेश सचिव कमलेश समर्थ यांनी तडकाफडकी काल केतन ठाकरे यांनी अर्ज दाखल करताच पक्षाचा राजीनामा दिला. अनुभवी निष्ठावंतांना डावलून प्रशासन व राजकारणाचा कोणताही अनुभव नसलेल्या केतन ठाकरेला स्वीकृत सदस्य म्हणून मनपात पाठवण्याची शहराध्यक्षांची खेळी अनेक निष्ठावंतांना रुचली नाही.
प्रभाग क्र.२० मधून काँग्रेस शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरेंनी नुकत्याच पार पडलेल्या मनपा निवडणूकीत उमेदवारी नाकारली व पराभवाची दाट शक्यता असलेल्या नवशिख्या उमेदवाराला तिकीट दिली.समर्थ यांना स्वीकृत सदस्य म्हणून मनपात पाठवण्याचे अभिवचनही विकास ठाकरेंनी दिले मात्र,ऐन वेळेवर पूत्रप्रेमातून ‘घराणेशाही’ जपण्याची खेळी केली,असा आरोप केला जात आहे.
केतन ठाकरेंना मनपा निवडणूकीत पश्चिम नागपूरातील प्रभाग क्र.१३ मधून निवडणूक लढण्याचा घाट घालण्यात आला होता मात्र,ते माझे प्रभावक्षेत्र असल्याने पराभवाच्या भितीतून ऐन वेळी केतनला निवडणूक न लढण्याचा निर्णय विकास ठाकरेंनी घेतला असल्याचा दावा काँग्रेस बंडखोर कमलेश चौधरी यांनी केला.विकास ठाकरेंनी तर त्यांच्याच पश्चिम नागपूर मतदारसंघात प्रभाग क्र.१२,१३,१४ मध्ये सर्व नवखे उमेदवार उभे केले व भाजपला या जागा ‘आंदण’ म्हणून दिल्या,असा सरळ आरोप ते करतात.काँग्रेसला भाजप नाही तर काँग्रेसच पराभूत करते,हे या ही निवडणूकीत सिद्ध झालं.
मी अपक्ष म्हणून लढलो तरी मला ८ हजार मते मिळाली,काँग्रेसच्या नवख्या उमेदवाराला ५ हजार मते पडली,भाजपने आघाडी घेत ही निवडणूक जिंकली.जर काँग्रेसची मते आठ आणि पाच हजारांमध्ये विभाजित झाली नसती तर काँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला असता,हे फक्त पश्चिम नागपूरातच नाही घडले तर संपूर्ण ३६ प्रभागात काँग्रेसनी पराभूत होण्यासाठीच निवडणूक लढली,असा थेट आरोप कमलेश चौधरी करतात.
विकास ठाकरेंच्या संधीसाधू राजकारणामुळे मुख्यमंत्र्यांच्या शहरात काँग्रेसचे फार मोठे नुकसान होत असून, भाजप विरोधात शक्तीशाली विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कधीही उभी राहू शकत नाही.मूळात काँग्रेसला विरोधी पक्ष म्हणून आता नागपूरची जनता मानत नसून, नागपूरात काँगेस ही भाजपची बी-टिम झाली असल्याची जहाल टिका चौधरी करतात.
आता तर शहराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या ‘संघटन सृजन’अभियानासाठी रविभवन येथे निरीक्षक अरुण यादव व चमू आली होती.त्यात जिया पटेल यांचा वाढदिवस असल्याने त्या एका हॉटेलमध्ये जेवत असताना मी फक्त त्यांच्या भेटीची वेळ घेण्यासाठी अधिकृत पत्र देण्यासाठी त्यांना भेटलो व ते पत्र दिले. त्या पत्रातील मसुदा फक्त भेटीसाठी वेळ मिळण्यासाठीचा होता मात्र,आतून घाबरलेल्या विकास ठाकरेंच्या समर्थकांनी एका मुस्लिम महिला पर्यवेक्षकांचा दूस-या दिवशी अपमान करुन त्यांना सभागृहातून हाकलून लावले.‘कुठे नेऊन ठेवला संस्कारी काँग्रेस पक्ष शहराध्यक्षांनी?’असा सवाल ते करतात.
गेल्या १४ वर्षांपासून तेच शहराध्यक्ष आहेत त्यामुळे एका महिलेचा अपमान त्यांचेच कार्यकर्ते करतात, तेव्हा नैतिकता स्वीकारुन ते राजीनामा देण्या ऐवजी पुन्हा एकदा शहरध्यक्ष पदाची संधी मिळावी म्हणून स्वत:चाही अर्ज पर्यवेक्षकांना देतात?
सामान्यातला सामान्य काँग्रेसीही पर्यवेक्षकाला भेटू शकतो,पत्र देऊ शकतो,भेटीची वेळ मागू शकतो,आक्षेप नोंदवू शकतो,मत व्यक्त करु शकतो,मात्र,विकास ठाकरेंना ‘भाजप सानिध्यातून’ही ‘लाेकशाही’आता मान्य नाही,असा थेट आरोप करीत,आम्ही जुने निष्ठावंत काँग्रेसी आता नागपूरात नवीन काँग्रेसचा गट निर्माण करणार असल्याचा खळबळजनक दावा कमलेश चौधरी यांनी केला.
यात पुरुषोत्तम हजारे, विजय बाबरे,सुभाष घोडे,किशोर जिचकार,नितीन साठवणे,संदीप सहारे,मनोज सांगोले,रमण पैगावार आदी राहणार असून आमच्या रक्तातच काँग्रेस आहे त्यामुळे आम्ही काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही .परंतू ,नागपूरात भाजपच्या दावणीला बांधल्या गेलेल्या संधीसाधू काँग्रेसला धडा शिकवून,जनतेच्या प्रश्नांना हात घालणा-या काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार असल्याचा दावा ते करतात.
थोडक्यात,भाजपप्रणित स्वीकृत सदस्य,काँग्रेसी पर्यवेक्षकांसमोर ठाकरे गट,निष्ठावंत,बंडखोर,आ.नितीन राऊत गट यांच्यातील राडा इत्यादी घटनेवरुन मनपातील वातावरण चांगलेच तापले असून, डोक्यावर आग ओकणा-या उन्हाची काहीलीही या राजकीय आगी समोर शीतल वाटतेय,असा नागपूरकरांचा सूर ऐकू येत आहे.
……………………………………
Advertisements
