अवैध सावकारीतून अनुसूचित जातीच्या महिलेचे १११.५ ग्राम सोने लाटले
पिडीतांना दिली ‘उपमुख्यमंत्र्यांची’ धमकी!
हुडकेश्वर पोलिस ठाण्यात अट्रासिटीसह गुन्हे दाखल
नागपूर,ता.२७ डिसेंबर २०२५: महापालिका सार्वत्रिक निवडणूकीची रणधुमाळी संपूर्ण राज्यात सुरु असून देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष तसेच राज्यातील सत्तेत समसमान वाटेकरी असलेल्या शिवसेना शिंदे गटात कालच नागपूरातील धंतोली येथील भाजपच्या कार्यालयात ‘महायुती’ म्हणून मनपा निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब झाले.महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे व उद्योग मंत्री शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी नागपूर,चंद्रपूर,अकोला व अमरावती महापालिकेच्या निवडणूकीत युती म्हणून लढणार असल्याची घोषण केली मात्र,आपापल्या संधीसाधू व स्वार्थी उद्दिष्ठांना फलद्रूप करण्याच्या प्रयत्नात जमीनीस्तरावर पक्षात काय चालले आहे,याचे देखील भान सुटल्याची घटना राज्याच्या उपराजधानीत घडली आहे.
अनुसूचित जमातीच्या एका महिलेने मुलाच्या शिक्षणासाठी तीन लाख रुपयांच्या मोबदल्या शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सुरज गोजे यांच्याकडे तब्बल १११.५ ग्राम सोने गहाण ठेवले होते,ते परत देण्यास गोजे यांनी नकार देत,’जे करायचे ते कर,मी शिवसेना शिंदे गटाचा जिल्हा प्रमुख आहे,माझे कोणीही आमदार,खासदार,पोलीस उपटून भारे बांधू शकणार नाही,तू जास्त करशील तर तुला व तुझ्या परिवाराला नागडे करुन मारीन‘अशी धमकी देण्यापर्यंत मजल गाठली!

वैशाली घनश्याम चापरे(वय वर्ष ४४)या गृहिणी असून न्यू नरसाळा भागात राहतात.त्यांचे पती घनश्याम चापरे(वय वर्ष ४८) हे एलआयसीमध्ये काम करतात.त्यांना एक २२ वर्षीय मुलगा व २४ वर्षीय मुलगी आहे.ऐन करोनाच्या महामारीत १७ ऑगस्ट २०२० रोजी त्यांनी मुलाच्या शिक्षणासाठी त्यांच्या ओळखीचे व पारिवारीक सबंध असलेले मोहन शामराव मोजे(राहणार,म्हाळगी नगर,हुडकेश्वर पोलिस ठाणे)यांच्याकडे ३५ ग्रामचे,४ ग्रामचे व ५ ग्राम सोन्याचे असे तीन मंगळसूत्र,१५ ग्रामचे सोन्याचे एक नॅकलेस,१६ ग्रामचा लॉकेट असलेला एक सोन्याचा गोफ,सोन्याचे लॉकेट असलेली ८ ग्रामची एक सोन्याची चेन,४ सोन्याच्या अंगठ्या १९ ग्राम वजनाच्या,दोन जोडे सोन्याचे कानातले टॉप्स ९.५ ग्राम वजनाचे, असे एकूण १११.५ ग्राम सोने तीन लाखात गहाण ठेवले.यावर १.५ टक्के व्याजदराने रक्कम देण्याचे ठरले.
मोहन गोजे याने २ लाख ४० हजार रुपये रोख तसेच ६० हजार रुपये घनश्याम चापरे यांना फोन-पे नी दिले.गाेजे परिवाराशी चापरे कुटूंबियांचे पारिवारीक संबंध असल्याने चापरे कुटूंबियांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला.गोजे यांना सोने देताना १०० रुपयांचा करारनामा करण्यात आला होता.चंद्रशेखर महिंद्रकर(राहणार आर्शिवाद नगर) यांच्या समक्ष हे सोने गहाण ठेवण्यात आले होते.डिसेंबर २०२४ पर्यंत घनश्याम चापरे यांनी मोहन मोजे यांना कधी नगदी तर कधी फोन पेच्या माध्यमातून असे एकूण एक लाख ९० हजार रुपये व्याज दिले.
डिसेंबर २०२४ मध्ये कर्जासह व्याजाचे पैसे घेऊन वैशाली व घनश्याम चापरे गोजे यांच्या घरी गेले व १११.५ ग्राम सोन्याचे दागिने परत मागितले.मात्र,माेहन गोजे याने दागिने परत देण्यास नकार दिला व दागिने विसरुन जाण्यास सांगितले.बाजारभाव नुसार आज गहाण ठेवलेल्या दागिन्यांची किंमत ही सव्वा कोटी रुपयांची असून गोजे याने फक्त तीन लाख रुपयात ते दागिने ताब्यात ठेवले.वरुन एक लाख ९० हजार रुपये व्याजाचे देखील लाटले.चापरे दाम्पत्य वारंवार गोजे यांच्याकडे दागिन्यांची मागणी करीत राहीले मात्र,गोजे यांनी दागिने परत केले नाही.

२०२५ मध्ये मोहन गोजे याने घनश्याम चापरे यांना त्याच्या मुलाच्या जागनाथ बुधवारी येथील पक्ष कार्यालयात बोलावून घेतले व सूरज गोजे याने घनश्याम यांना ‘तुम्ही कोष्टी समाजाचे लोक,तुमची इतकी सोने वापरण्याची लायकी नाही,तुम्ही चुपचाप निघून जा,पुन्हा सोने दागिन्यांची मागणी करु नको,तुमचे सोने तुम्हाला परत मिळणार नाही,तुला जे करायचे आहे ते कर,मी शिंदे शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे.माझे कोणीही आमदार,खासदार,पोलिस उपटून भारे बांधू शकत नाही,तु कोणाकडेही जा तुला सोने मिळणार नाही,तू जर जास्त करशी ल तर तुला व तुझ्या परिवाराला नागडा करुन मारील’अशी धमकी दिली.
पिडीतांनी आधी गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.यानंतर ती हुडकेश्वर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली.पिडीतांनी आरोपींविरुद्ध अट्रासिटीसह,जिवे मारण्याची धमकी,फसवणूक इत्यादीची तक्रार नोंदवली असून मोहन गोजे व शिंदे गटाचा जिल्हा प्रमुख सुरज गोजे या आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करुन गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.
हुडकेश्वर पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध अनुसूचीत जाती आणि अनुसूचित जमाती(अत्याचार प्रतिबंधक अधिनियम,१९८९)अन्वये कलम ३(१)(१),महाराष्ट्र सावकारी(नियमन)अधिनियम,२०१४ अनव्ये कलम ३९,भारतीय न्याय संहिता(बी एन एस),२०२३ अन्वये कलम ३(५),३१६(२)३१८(४) व ३५१ (२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थोडक्यात,ऐन निवडणूकीच्या काळात सत्ताधा-यांमध्ये जागेच्या वाटपांवरुन ‘मनोमिलन’ घडत असताना,पक्षाची प्रतिमा व मतदार हे सत्ताधा-यांसाठी कश्याप्रकारे दुय्यम झाले आहेत,याचे ही घटना उत्तम उदाहरण ठरते.एकीकडे सर्वच राजकीय पक्ष ‘निष्ठावान कार्यकर्ते ही पक्षाची खरी ताकत असते’असे पालूपद मिरवित असताना,सर्वसामान्य जनता,गोरगरीब पिडीत,शोषित,वंचित व दलित जनतेच्याच विश्वासाचे रक्त पिणारे ‘गोजे ’सारखे सत्तालोलूप व उन्मत पदाधिका-यांचे कोणीही काहीही वाकडे करु शकत नाही,ही भावना बळावणे महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्यासाठी परवडणारी नाही,असा संताप आता व्यक्त होत आहे.
……………………………….