Advertisements

नागपूर जिल्हा काँग्रेस ग्रामीणच्या अध्यक्षांचा आरोप
राहूल गांधीवर बोलण्याची बावणकुळेंची उंची नाही:अपघातग्रस्त कोराडीचे मुख्य प्रवेशद्वार आधी सांभाळा:अश्विन बैस यांचा सल्ला
५१ टक्के मते घेऊन येणा-या महापालिका,नगर परिषदा,ग्राम पंचायती भाजपाच जिंकणार:बावणकुळेंचा हा दावा ईव्हीएमच्या भरवश्यावर का?कुंदा राऊत यांचा सवाल
निवडणूक निर्णय अधिकारी महसूल मंत्र्यांच्याच दबावाच्या अखत्यारित: अवंतिका लेकूरवाळे यांचा आरोप
नागपूर,ता.२० ऑगस्ट २०२५: काँग्रेस श्रेष्ठी राहूल गांधी यांनी देशभरात महाराष्ट्रात ‘मत चोरी‘च्या आरोपांचे रान पेटवले असताना नागपूर ग्रामीण काँग्रेसच्या सदस्यांनी देखील आज प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन राज्याचे महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्यावर ‘मत चोरी’चे गंभीर आरोप लावले.बावणकुळे यांचे चिरंजिव संकेत बावणकुळे याने स्वत: कामठी मौदा विधानसभेसाठी फॉर्म क्र.७ भरुन हजारो बोगस मतदार बनवले असल्याचा आरोप नागपूर जिल्हा काँग्रेसचे(ग्रामीण)अध्यक्ष अश्विन बैस यांनी केला.
बावणकुळे व जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी, जून २०२४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीनंतर अवघ्या ५ महिन्यात नोव्हेंबर २०२४ दरम्यान ३३ ते ३५ हजार मतदार ग्रामीण भागात जे वाढले त्या मतदारांची यादी बीएलओंनी केलेल्या व्हेरिफिकेशन अहवालासह उपलब्ध करुन द्यावी,असे आव्हान त्यांनी केले.त्या निवडणूकीत हजारो मतदारांची नावे वगळण्यात आली होती,त्या संबंधी तक्रारी देखील करण्यात आल्या,त्या अनुषंगाने कोणती चौकशी केली?त्याचा अहवाल उपलब्ध करुन द्यावा.
निवडणूक अधिकारी,तहसीलदार,उपविभागीय अधिकारी हे महसूल मंत्र्यांच्या अखत्यारित काम करीत असतात,त्यामुळेच ११ डिसेंबर २०२३ रोजी कामठी विधानसभा मतदारसंघामध्ये २२ हजार ७७५ दुबार मतदारांची नावे मतदार यादीत असल्याची तक्रार उपविभागीय अधिकारी मौदा यांना काँग्रेसने लिखित स्वरुपात देऊनसुद्धा, एवढ्या गंभीर तक्रारीवर कोणतीही चौकशी करण्यात आली नाही,असा आरोप अवंतिका लेकुरवाळे यांनी केला.लेकुरवाळे व दिनेश ढोले यांनी स्वत: २२ हजार ७७५ दुबार मतदारांची यादी उपविभागीय अधिक्षकांना सोपवली असल्याचे लेकुरवाळे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
२०१७ मध्ये देखील कामठी विधानसभेत बोगस मतदार संदर्भात पीआयएल दाखल करण्यात आली होती,त्यावर उच्च न्यायालयाने बोगस मतदार कमी करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते,याचा अर्थ २०१७ मध्ये देखील बावणकुळे यांच्या मतदारसंघात बोगस मतदार असल्याचे न्यायालयाने देखील समजले होते.यापेक्षा दुसरा पुरावा तो काय असणार?असा सवाल लेकुरवाळे यांनी केला.
हिंगणा मतदारसंघात देखील माजी आमदार विजय घोडमारे यांनी पुराव्यानिशी २० ते २२ हजार बोगस मतदार हिंगणा मतदारसंघात असल्याची यादी जिल्हाधिकारी यांना सादर केली होती.न्यायालयाच्या आदेशानंतर केवळ एक ते दोन हजार मतदारांची नावे वगळण्यात आली व उर्वरित २० हजार बोगस मतदार यादी तशीच ठेवीत, न्यायालयाची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप प्रदेश महासचिव कुंदा राऊत यांनी केला.हिंगणामध्ये १ लाख २५ हजार मत कश्यारितीने वाढले,हे आम्ही सिद्ध केलं आहे,असे त्या म्हणाल्या.दूसरीकडे रामटेकमध्ये नेमके काँग्रेसचीच असणारी एक लाख मते कशी कमी झाली?असा सवाल त्यांनी केला.लोकसभा निवडणूकीत त्या मतदारांची नावे होती,विधानसभेच्या मतदार यादीतून ती अचानक गहाळ झाली.अवघ्या पाच महिन्यात रामटेकमध्ये एक लाख मतदार मृत्यू पावले का?की स्थलांतरित झाले?
बावणकुळे यांच्या कामठी विधानसभा मतदारसंघात प्रचंड प्रमाणात ‘मत चोरी’झाली असल्याचा दावा करीत,१७ ऑगस्ट २०२५ रोजी पुन्हा एकदा बावणकुळे यांनी अमरावतीत भाजप हा येणा-या सर्व महापालिका,नगर परिषदा व ग्राम पंचायती निवडणूकीत ५१ टक्के मत घेऊन विजयी होणार असल्याचा दावा केला,याचा अर्थ पुन्हा एकदा ईव्हीएम त्या पद्धतीने सेट करुन ठेवण्यात आले आहेत का?असा सवाल कुंदा राऊत यांनी केला.अद्याप निवडणूका घोषित देखील झाल्या नाहीत तरी देखील बावणकुळे विजयाची हमी कशाच्या आधारावर देत आहेत?असे कुंदा राऊत यांनी विचारणा केली.
बावणकुळे यांची राहूल गांधींवर टिका करण्याची उंची नाही,असे अश्विन बैस म्हणाले.बावणकुळे यांनी आधी कोराडी येथील अपघातग्रस्त मुख्य प्रवेश द्वार कोसळून गंभीर जखमी मजुरांची काळजी करावी,असा अनाहूत सल्ला देखील त्यांनी याप्रसंगी दिला.
सावनेरमध्ये काँग्रेसचे कद्दावर नेते सुनील केदार यांच्या पराभवाविषयी प्रश्न केला असता,सावनेरमध्ये तर विरोधी पक्षाच्या उमेदवारासाठी स्वत:देशाचे गृहमंत्री अमित शहा प्रचारासाठी आले होते मात्र,गर्दीच न जमल्याने विमानतळावरुनच परतले,असा दावा कुंदा राऊत यांनी केला.सावनेरमध्ये केंद्र,राज्य,मध्यप्रदेशचे नेते या सर्वांनी जोर लावला.येथे पण लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार साढे सतरा हजार मतांनी निवडणूक जिंकतो मात्र,विधान सभेत २६ हजार मतांनी काँग्रेसचे उमेदवार केदार कसे हरले?असा सवाल त्यांनी केला.या मतदारसंघात देखील भाजप जिंकली नसून ‘ईव्हीएम’जिंकल्याची टिका त्यांनी केली.
नगर परिषद असो किवा ग्राम पंचायत भाजप ‘मत चोरी’शिवाय जिंकू शकत नाही,असा आरोप लेकुरवाळे यांनी केला.वडोदा नगर परिषदेच्या चिकणा गावात जे मतदार होते तेच पावण नगर परिषदेच्या निंबा गावात मतदार होते.असे ३५० बोगस मतदार घूसवण्यात आले.६ जून २०२५ रोजी पाच ते सहा हजार बोगस मतदारांची यादी आम्ही पुराव्यासंह तहसीलदाराकडे सादर केली मात्र,अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.आम्ही कारवाईची मागणी करीत असताना उलट सत्तापक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला!प्रशासनावर दबाव आणण्यासाठी भाजप हे करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपचे माजी तालुकाध्यक्ष रमेश चिकटे यांचे नाव दोन ठिकाणच्या मतदार यादीमध्ये असून .उच्च न्यायालयाने त्यांचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे आदेश देऊनसुद्धा कामठी बिडगांव व तराेडी या दोन्ही ठिक़ाणचे ते मतदार आहेत,असा आरोप लेकुरवाळे यांनी केला.
अशी ५० कुटूंबे आहेत जे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या पूर्व नागपूरात,तरोडी व बिडगांव या तिन्ही ठिकाणी मतदान करतात,असा धक्कादायक खुलासा त्यांनी या प्रसंगी केला.मंगला सुब्बा या नागपूर शहरातील वर्धमान नगरमध्ये मतदार आहेत त्या बिडगावमध्ये येऊन देखील मतदानाचा हक्क बजावतात!महेंद्र सुब्बा नावाने वर्धमान नगरमध्ये मतदार यादीत नाव असताना बिडगांवमध्ये ते महेंद्र भाई सुब्बा होतात!नगर पंचायतीत पाच सुब्बा आडनावाचे मतदार राहतात!ही ‘मत चोरी‘नाही तर काय आहे?असा सवाल त्यांनी केला.
मात्र,ईव्हीएम तर काँग्रेसनेच देशात आणला,असा प्रश्न केला असता,आम्ही तो एक नवीन प्रयोग म्हणून देशात लागू केला,नंतर जगातील इतर देशामध्ये यातील ‘तंत्र चोरी’ लक्षात आल्यावर अनेक देशांनी ईव्हीएमवर मतदान बॅन केले.कंगना रनौतला जर देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ नंतर मिळाले असे वाटते तर त्यांनीच निवडणूक प्रक्रियेच्या बदलासाठी पुढाकार घ्यावा,असा टोला त्यांनी हाणला.
सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील याचिका फेटाळताना,जेव्हा विरोधक जिंकतात तेव्हा ईव्हीएममध्ये गडबडी नसते जेव्हा ते हरतात तेव्हा ईव्हीएम सदोष असतात,अशी खरडपट्टी काढली होती,याकडे लक्ष वेधले असता,काँग्रेस हा ईव्हीएमविषयी बोलत नाही आहे तर आमचा आक्षेप ‘मत चोरी’वर असल्याचे अश्विन बैस म्हणाले.सर्वोच्च न्यायालयाकडून ‘मत चोरी‘बाबत कोणत्या निर्णयाची अपेक्षा आहे?असा सवाल केला असता,त्यांनी निष्पक्ष न्याय द्यावा,अशी अपेक्षा असल्याचे कुंदा राऊत म्हणाल्या.
येत्या निवडणूकीत काँग्रेस पक्ष ‘मत चोरी’वर काय सावधगिरी बाळगणार आहे?असा सवाल केला असता,प्रत्येक कार्यकर्त्याला सूचना आहे आपापल्या गावात मतदार यादीवर लक्ष ठेवावे,जी नावे गावातील मतदारांची नसतील,ती पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे ती यादी सोपवा.यावेळी आम्ही मत चोरी होऊ देणार नसल्याचे लेकुरवाळे म्हणाल्या तर हिंगणा मतदारसंघात वर्धावरुन मेघे यांच्या मतदानकेंद्रामध्ये मत द्यायला आलेले बोगस मतदार यांना आम्ही तीव्र आंदोलन करुन हुसकावून लावले होते.याचे व्हीडीयोज देखील चांगलेच व्हायरल झाले होते.यंदा देखील असे बोगस मतदार कुठेही आढळले तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास मुख्यमंत्री यांची जवाबदारी असेल,असा सरळ इशाराच कुंदा राऊत यांनी याप्रसंगी दिला.
येणा-या निवडणूकीत ८० टक्के जुने रोस्टर लागू राहून २० टक्के नवे रोस्टर राहणार आहे का?सध्या झीरो राेस्टरची चर्चा आहे,याविषयी प्रश्न विचारला असता प्रत्येक निवडणूकीत एकाच वेळी सगळ्याच वर्गाला प्रतिनिधित्व देता येत नसल्याने निवडणूकीत रोस्टर पद्धती निर्माण करण्यात आली असल्याचे अवंतिका लेकुरवाळे म्हणाल्या.यंदा देखील २०११ चीच लोकसंख्या यादी गृहीत धरुन चक्राकार पद्धतीने राेस्टर लागू होणार आहे.या पद्धतीमुळे प्रत्येक प्रवर्गाला न्याय मिळत असतो.याला डिलिमिटेशन म्हणता येणार नाही.५० टक्के मतदारसंघात रोस्टर पद्धती लागू झाली पाहिजे.झीरो रोस्टर,४५ दिवसात व्हीव्हीपॅटचा पुरावा नष्ट करणे,कदाचित याचमुळे भाजप १०० टक्के निवडणूक ५१ टक्के मतदान घेत जिंकण्याचा दावा करीत असावी,असा टोला त्यांनी बावणकुळे यांना हाणला.
दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाने १ जुलै कट ऑफची घोषणा केली,अद्याप निवडणूकीची तारीखच घोषित झाली नसताना निवडणूक आयोगाची ही घोषणा असंवैधानिक असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरावर लेकुरवाळे म्हणाल्या.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी राहूल गांधी यांना ‘सिरीयल लायर’अश्या शब्दात हिणवले मात्र,सिरीयल लायर हे राहूल गांधी नसून स्वत:फडणवीस असल्याची टिका अश्विन बैस यांनी याप्रसंगी केली.निवडणूकी पूर्वी शेतक-यांचा सात-बारा कोरा करण्याची घोषणा कोणी केली होती?विदर्भ वेगळा झाल्याशिवाय विवाह करणार नाही,अशी भीष्मप्रतिज्ञा कोणी केली होती?अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव प्रफूल्ल गुडधे पाटील हे फडणवीस यांच्या विरोधात न्यायालयात गेले आहेत.बोगस मतदान आणि सत्तेचा दुरुपयोग यातून फडणवीसांना निवडणूकीत यश मिळाले असल्याची बोचरी टिका याप्रसंगी अश्विन बैस यांनी केली.
……………………………….
Advertisements

Advertisements

Advertisements
