Homeब्रेकिंग न्यूजसप्टेंबर महिन्यात १२ लोकांचा बुडून मृत्यू

सप्टेंबर महिन्यात १२ लोकांचा बुडून मृत्यू

Advertisements

पूर परिस्थीतीत नागरिकांनी प्रवास करू नये: जिल्हाधिकारी

नागपूर दि.२३ सप्टेंबर २०२१: सप्टेंबर महिन्यात जिल्हयात नदी ,नाल्यांत बुडून १२ नागरिकांना प्राण गमवावे लागले.जिवीतहानीमुळे आपत्तीग्रस्तांच्या कुटुंबियांचे नुकसान भरून न निघणारे आहे.तरी पूर परिस्थीतीत किंवा अतिवृष्टी काळात नद्या, नाले दुथडी भरून वाहत असतांना नागरिकांनी त्यातून प्रवास करू नये ,असे आवाहन जिल्हाधिकारी विमला.आर यांनी केले आहे.

पावसाळा आता शेवटच्या टप्प्यात असून जिल्ह्यातील मोठी धरणे ९० टक्कया पेक्षा अधिक प्रमाणात भरलेली आहेत. बहुतांश मध्यम व लघु धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.

भारतीय हवामान खात्यांनी वर्तवलेल्या शक्यतेनुसार जिल्ह्यात अतिवृष्टी सातत्त्याने होत असून जिल्ह्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत.तरी नागरिकांनी सतर्क राहावे.

केवळ सप्टेंबर महिन्यातच बारा व्यक्तींचा नदी, नाल्यांमध्ये बुडून मृत्यू झालेला आहे.

आज देखील नरखेड तालुक्यातील रामठी गावाजवळील नाल्यांमध्ये बैलगाडी सोबत वाहून एका ४० वर्षीय महिलेला आपल्या प्राणाला मुकावे लागले. त्यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज असून नदी, नाल्याचे पाणी पुलावरून किंवा रस्त्यावरून वाहत असल्यास रस्ता किंवा पूल ओलांडण्याचे धाडस करू नये.

वीजांचा कडकडाट किंवा अतिवृष्टी होत असल्यास शक्यतो नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी किंवा आपल्या घरात थांबावे.आपला जीव आपल्या कुटुंबीयांसाठी अती मोलाचा असून त्यानुसार जिवीतहानी टाळण्यासाठी आवश्यक दक्षता व काळजी घेणे आपले कर्तव्य आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे वारंवार नागरिकांना माध्यमांव्दारे वारंवार सूचित केले जात आहे.तरी नागरिकांनी स्वत व कुटुंबाची काळजी घेउून तसेच सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आर.विमला यांनी केले आहे.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी-
? भारतीय हवामान खाते, जिल्हा प्रशासन तसेच विविध माध्यमांतून प्राप्त होणाऱ्या हवामान अंदाज व धरण बाबत स्थिती व पाण्याचा विसर्ग यावर कटाक्ष ठेऊन सतर्क रहावे.
?कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नका
? नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा
? मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका.
? जुन्या मोडकळीस आलेल्या घरात / इमारतीत आश्रय घेऊ नका.
? नदी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका.
? अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका
? धोकादायक ठिकाणी अथवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी थांबू नका

? घडलेल्या घटनेची / आपत्ती ची माहिती तात्काळ जिल्हा तसेच तालुका नियंत्रण कक्षास द्यावी.
आवश्यकतेनुसार नागपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,
जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष ०७१२-२५६२६६८ टोल फ्री क्र. १०७७ वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Latest बातम्या