

चौकशीतून मुक्तता नाही:न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याचा न्यायालयाचा निर्वाळा मात्र योग्य कायदेशीर मंचाकडे जाण्याची मुभा
नागपूर,दि.५ मे २०२२ : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे वकील ॲड. सतीश उके यांच्या घरी ३१ मार्च रोजी ईडीच्या पथकाने धाड घातली होती. काही तासांच्या चौकशीनंतर सतीश उके व त्यांच्या भावाला प्रदीप उके यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात मुंबईतील ईडीच्या विशेष न्यायालयात खटला सुरू आहे.
सक्तवसुली संचालनालय (ईडी)) मुंबईद्वारे ईसीआयआरसह केल्या जात असलेल्या चौकशीतून मुक्तता मिळावी आणि हे प्रकरण नागपूरला स्थानांतरित करण्यात यावे, अशी विनंती उके बंधूंनी ईडीच्या विशेष न्यायालयाला केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली. तसेच, योग्य कायदेशीर मंचाकडे जाण्याची त्यांना मुभा मात्र त्यांना दिली. या प्रकरणी विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या समक्ष सुनावणी झाली. मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपात अॅड. सतीश उके व त्यांचे बंधू प्रदीप उके यांना ३१ मार्च २०२२ रोजी ईडी मुंबईने नागपुरातून अटक केली होती.ईडी मुंबईने चुकीच्या पद्धतीने अटक केली असून त्यांच्याद्वारे सुरू असलेली कारवाई बेकायदेशीर आहे.
त्यामुळे, या चौकशीतून मुक्तता मिळावी आणि हे प्रकरण नागपूरला हस्तांतरित करण्यात यावे या मागणीसाठी उके बंधूंनी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत हे प्रकरण नागपूरला हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यास हे न्यायालय सक्षम नसल्याचे स्पष्ट केले. तसेच ईडी मुंबईद्वारे केली जात असलेली चौकशी चुकीची आहे, असे आपण ग्राह्य धरले तरी हे प्रकरण नागपूरला हस्तांतरित करण्याचे आदेश देता येणार नाही, असे म्हटले आहे.
आरोपींना दिलासा मिळावा म्हणून केलेल्या दाव्यावर त्याचा परिणाम होईल, असे स्पष्ट करीत न्यायालयाने उके बंधूंची मागणी फेटाळली. शिवाय याप्रकरणी योग्य कायदेशीर मंचाकडे जाण्याची त्यांना मुभा दिली. उके बंधूंतर्फे अॅड. रवी जाधव तर ईडी मुंबईतर्फे अॅड. हितेश वेणेगावकर यांनी बाजू मांडली. सतीश उके गेल्या अनेक वर्षापासून कॉग्रेस नेत्यांची वकिली करीत आहेत. काही आठवड्यांपूर्वी एका साठ वर्षीय वृद्ध महिलेने खेरुनिस्सा यांनी ॲड. सतीश उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी धमकावून जमीन आपल्या नावावर केल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दिली होती.
इडीने विशेष न्यायालयात जे आरोप पत्र दाखल केले त्यात एक प्रकरण खेरुनिस्सा यांचे पण आहे मात्र नुकतेच न्यायालयाने खेरुनिस्सा यांच्याच विरोधात आरोप पत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे उके बंधूंवरील या छाप्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आता उके बंधूंतर्फे जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला जाणार असल्याची माहिती त्यांच्या वकीलांनी दिली.आतापर्यंत न्यायालयात जामिनासाठी अर्जच दाखल करण्यात आला नव्हता कारण आमची मागणी ही या चौकशीतून उके बंधूंना मुक्त करण्याचीच होती मात्र न्यायालयाने हे त्यांच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याचे स्पष्ट केल्याने आता वरच्या न्यायालयात दाद मागण्यात येईल तसेच जामिनासाठीही अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

आमचे चॅनल subscribe करा