Homeब्रेकिंग न्यूजइतना टूटा हूं के छू ने से बिखर जाऊंगा...

इतना टूटा हूं के छू ने से बिखर जाऊंगा…

Advertisements

लॉ कॉलेज विलगीकरणातील तो म्हणतो पाच दिवसात मी फाशी घेईल!

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. २२ जुलै: बघता बघता जगासोबतच नागपूर शहरात कोरोनाने थैमान मांडले आणि कळत-नकळत अनेक नागरिक यात होरपळून निघाले. महिला,पुरुष,लहान चिमूकले, आजारी,तंदूरुस्त,ज्येष्ठ,नोकरदार,गृहीणी,प्राध्यापक,विद्यार्थी,दूकानदार,भाजी विक्रेते,मराठी,अमराठी,जात,पंथ,धर्म,भाषा,प्रांतपलीकडे अगदी सगळेच.

हे होरपळणं इतके जीवघेणे झाले की घरातील चार भिंतीत आपल्या कुटुंबियांच्या सानिध्यात राहणारी माणसे ही कधी,कशी कोरोन्टाईन केंद्रात पोहोचली किंबहूना पोहाचविल्या गेली हे त्यांना देखील कळले नाही.असाच एक ४२ वर्षीय पिता,एक पती,एक मूलगा असणारा माणूस आज सायंकाळी ५.३० वा.लॉ कॉलेज येथील कोरोन्टाईन केंद्रात आणून सोडण्यात आला.अचानक त्याच्यावर ही आपत्ती ओढवताच तो खचला. त्याची चिमूरडी बाबांसाठी घरी रड रडतेय,पत्नीने रडून रडून मेंदू शिणवून घेतला,घरातील ज्येष्ठांचे डोळे त्याच्या वाटेकडे लागले आहेत मात्र निष्ठूर मनपा प्रशासनाच्या कर्मचा-यांना त्याची थोडी देखील दया येत नाही.

त्याचा दोष काय होता?तो वाहन चालक आहे.पोटापाण्यासाठी मालक सांगेल तशी ट्रिप घेऊन जातो. लॉक डाऊनमध्ये तीन महिने तो बेरोजगार होऊन अक्ष्ररश: घरीच होता. शासनानेच खासगी वाहन,कॅब चालकांना परवानगी दिली आहे. सोडून आला छत्तीसगढमध्ये मालकाच्या सांगण्यावरुन एका प्रवाश्‍याला. मात्र सेमिनरी हिल्स भागात असणा-या आपल्या घरी परत येताच वस्तीतील लोकं धस्तावली. त्यांनी पोलीसांकडे तक्रार केली. पाच दिवस हा घरा बाहेर पडलाच नाही.संपूर्ण १४ दिवस तो घरातच राहण्याचा शासनाचा नियम प्रामाणिकपणे पाळणार होता मात्र…!पोलीसांनी त्याला मेयो रुग्णालयात पाठवले. त्याने तपासणी करुन घेतली.आपला आधार कार्ड,वाहन चालक असल्याचे कागदपत्रे सगळे दाखवले.

मेयोच्या डॉक्टरने त्याला तपासले.कोरोनाची कोणतीही लक्ष् णे त्याच्यात नव्हती. डॉक्टरांनी त्याला घरीच १४ दिवस क्वारन्टाईन राहण्याचे लिहून दिले.मेयोमधून एलआयसी चौकापर्यंत आला तेव्हाच भावाचा फोन खणाणला. घरी पोलीस आले आहेत..सोबत एंबूलेंस आहे. तो घरी पोहोचला आणि..पोलीसांनी त्याला एंबूलेंसमध्ये आमदार निवासात सोडले. कालची रात्र त्याने आमदार निवासात काढली. तेथील व्यवस्था खूप चांगली होती. स्वच्छ चादर,स्वच्छ पंखा,कुटुंबापासून दूर होता मात्र समाधान मानून झोपून गेला. आज अचानक सायंकाळी ५.३० वा. त्याला लॉ कॉलेजच्या विलगीकरण केंद्रात सोडण्यात आले.

येथे येऊन त्याला मानसिक धक्काच बसला!अतिशय अस्वच्छ खोली,पंख्यावर,भींतिंवर भीतीदायक जळमटे, खिडक्यांची तावदाने फूटलेली, त्यात सर्वदूर थूंकलेलं…गादीवरील चादरीवर माजंरीची विष्ठा..घाणेरडे शौचालय.तो...तो नाही राहू शकत १४ दिवस अश्‍या गलिच्छ जागेवर..त्याने व्यवस्था बघणारे यांच्यासोबत भांडण केले.त्यांनी त्याचे सामान बाहेर रस्त्यावर काढले..झोप तू आता येथेच रस्त्यावर…त्याला सांगण्यात आले!

त्याचा दोष काय?का केले मनपा प्रशासनाने त्याला आपल्या चिमुकलीच्या कोमल स्पर्शापासून दूर,पत्नीचे प्रेम,कुटुंबियांच्या जिव्हाळा,काळजीच्या,मायेच्या सावलीतून दूर करुन अत्यंत घाणेरड्या,गलिच्छ खोलीत त्याने का राहावे?ते ही १४ दिवस?त्यात कोणत्याही चाचणीचा अहवाल अद्याप आला नसताना?

मेयोतून पळालेल्या दूसराच,प्रशासनाने यालाच पकडले!
मेयोतून जो डेविड नावाचा रुग्ण पळून गेला त्याचे वय २२,याचे वय ४२,नावात साधर्म्य असले तरी ओळख पत्र,आधार कार्ड,वाहन चालकाचा परवाना,मालकाची साक्ष्..याचे काहीच महत्व नाही का?नगरसेवक ग्वालबंशी यांनाही फोन केला. ’बघतो’म्हणून आश्‍वासन मिळाले. मात्र काहीच केले नाही. आता निवडणूका येतील तेव्हा मत मागायला दारावर येतील. ‘आम्हालाच मत द्या’,’तुमच्या सुख दू:खात आम्हीच कामी पडू’म्हणून विनवतील मात्र कोरोनाने यांचेही खरे रुप मतदारांना दाखवून दिले…!स्वत:कुटुंबियांसोबत घरी अारामात झाेपले,माझी पत्नी रडून रडून वेडी झाली आहे.तिचा मेंदू दूखायला लागलाय,तिचा ब्रेन हॅमरेज होऊन जाईल हो,असे तो कळवळून सांगतोय.माझी चिमूरडी माझ्याशिवाय झोपत नाही हो…मला घरी जायचे आहे….!

त्याच्यासोबत इतर पाच जण आले होते,एकाच कुटुंबातले त्यांनी या विलगीकरण केंद्राच्या व्यवस्थापनाला लिखित मध्ये लिहून दिले..आम्ही आमच्या जवाबदारीवर हॉटेलमध्ये विलगीकरणात राहयला चाललो,ज्याचा संपूर्ण खर्च आम्हीच करणार आहोत….! १४ दिवसांचा हॉटेल प्राईड जवळील या पंचतारांकित हॉटेलचा खर्च ते भरणार आहेत…तब्बल ८४ हजार रुपये!

हा हळवा बाप,प्रेमळ नवरा,काळजी वहाणारा मुलगा,भाऊ म्हणतो..मी एवढे पैसे कूठून आणू,माझ्याजवळ हॉटेलात सुखाची झोप घ्यायला एवढे पैसे नाहीत.. एवढ्या अंधारात भर रस्त्यात मी बसलो आहे मॅडम..माझ्या सामानासोबत…माझं घर येथून १२ किलोमीटर आहे…पण मला मनपा प्रशासन घरी जाऊ देत नाही..फाटक लावून घेतले आहे…!

मी एवढंच सांगतो..पाच दिवसात माझी योग्य ती व्यवस्था नाही केली तर…मी याच विलगीकरण केंद्राच्या गलिच्छ खोलीत फाशी लावून घेईल…!याला जवाबदार संपूर्णपणे नागपूर महानगरपालिका प्रशासनच राहील….!

त्याची वेदना ऐकून गझलनवाज गुलाम अली आठवले…‘इतना टूटा हूं के छू ने से बिखर जाऊंगा..अब अगर और दूआ दोगे तो…मर जाऊंगा…’

(त्यांच्या भाज्याचा क्रमांक- ७४९९०६८३१६)

Latest बातम्या