भाजपची कोणतीही निवडणूक लढण्याची एक स्ट्रेटेजी असते.हरियाणा सारख्या लहानशा प्रदेशात भाजपचे दीड लाख पन्ना प्रमुख होते.एकेका पन्ना प्रमुखाकडे ६० मतदारांची जबाबदारी सोपविण्यात आली होती.हे पन्ना प्रमुख त्याच गल्लीत राहातात जिथे हे ६० मतदार राहतात.त्यामुळे या पन्ना प्रमुखांना कोणता मतदार कोणत्या पक्षाला मत देतो,याची त्यांना अचूक माहिती असते.या माहितीच्या आधारावर जे मतदार दुस-या राजकीय पक्षाला मत देतात त्या मतदारांची नावे युक्तीने मतदार यादीतून कापली जाते!यानंतर नवीन बोगस मतदारांची नावे मतदार यादीत टाकली जातात.हाच सगळा खेळ एआय सारख्या अद्यावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खेळला जातो.मागील २०,३०,५० वर्षात प्रत्येक बूथचं पोलिंग पॅटर्न या तंत्रज्ञानातून अभ्यासला जातो.याच पद्धतीने निवडणूका राज्य दर राज्य जिंकल्या जातात त्यामुळे आता देशातील मोठातल्या मोठे निवडणूकतज्ज्ञ देखील जय-पराजयाचे आकलन करण्यास हतबल झाले असल्याचे ते सांगतात.
दिल्लीतील निवडणूकांमध्येही डेटा मॅन्यूपलेशन,एग्झिट पोल्सच्या माध्यमातून मतदारांची मानसिकता तयार करने याशिवाय धनबळाच्या जोरावर निवडणूका जिंकणे हे घडणार असल्याचा दावा ते करतात.१ जून २०२४ रोजी लोकसभेच्या निवडणूकीचे एग्झिट पोल्स आले यात मोदी यांना पूर्ण बहूमतासह सव्वा तीनशे व ३६० च्या वर जागा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता.४ जून रोजी प्रत्यक्ष निकाल लागले आणि शेअर मार्केट धाडकन कोसळले!१ जून ते ४ जून दरम्यान २५ लाख कोटी रुपये गुंतवणूकदारांचे एका झटक्यात बुडाले!हा पैसा कोणाकडे गेला?असा सवाल ते करतात.
हरियाणाच्या निवडणूकीशी दिल्लीच्या निवडणूकीची तुलना होऊ शकत नाही कारण हरियाणामध्ये भाजपची तिस-यांदा सत्ता येत असल्याचे एकाही एग्झिट पोलने दाखवले नाही.फक्त एक अपवाद सोडून ते म्हणजे भाजपचे नेते नायबसिंग सैनी.मतमोजणीच्या फक्त एका तासा आधी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सैनी म्हणतात ‘हमने चुनाव की तयारी पूरी कर ली है,चिंता मत किजिये सारी व्यवस्था कर ली है!’निकालात तीच भाजपच्या विजयाची व्यवस्था उजागर झाली!हरियाणातील ४८ जागांवर भाजपचं कोणी नाव घेणारे संपूर्ण निवडणूकीत सापडले नव्हते,त्या राज्यात भाजप पूर्ण बहूमताने विजयी झाली!
हरियाणात भाजपने ज्या दुष्यंत चौटालाच्या पक्षासोबत युती केली त्या पक्षाचे नाव घेणारे देखील आता हरियाणात सापडत नाही,एक ही जागा युतीतील या पक्षाला मिळाली नाही!हरियाणात भाजपचे १२ पैकी १० मंत्री हरले तरी देखील हरियाणात भाजप सत्तेत आली.देशातील मतदारांनी हे समजून घ्यायला हवे की हरियाणा ही भाजपसाठी ‘टेस्क़ केस’होती.याचीच यशस्वी पुर्नरावृत्ती भाजपने महाराष्ट्रात केली.जितकी मते साढे चार वर्षात वाढली नव्हती ती लोकसभेच्या निवडणूकीनंतर अवघ्या साढे चार महिन्यात महाराष्ट्रात मतदारांची वाढली!विरोधक दावा करतात ७० लाख नवी मते भाजपने मतदारयादीत घुसवली.निकाल मान्य नसताना हरियाणातील जनता ही जर रस्त्यावर उतरली असती तर महाराष्ट्रात तोच खेळ भाजपला सहज खेळणे शक्य झाले नसते मात्र,असे घडले नाही अशी खंत तज्ज्ञ व्यक्त करतात.महाराष्ट्रात देखील सत्ताधारी भाजपच्या विरोधात प्रचंड जनक्षोभ होता.याचा सर्व्हे देखील झाला होता.भाजपला देखील याची जाणीव होती.त्यामुळे महाराष्ट्रात भाजपच्या १३६ जागा येणे,यावर साक्षात ब्रम्हदेव देखील विश्वास ठेवीत नाही,असा दावा निवडणूकतज्ज्ञ करतात.
थोडक्यात,सत्ताधारी पक्षाचा निवडणूक जिंकण्याचा जो पॅटर्न सेट झाला आहे,निवडणूक आयोगाची जी हतबलता आहे ,उद्योगपतींचा गडगंज पैसा निवडणूकीत जो ओतला जात आहे ते बघता भारतात कोणत्याही राज्यात या पुढे निष्पक्ष निवडणूका होऊ शकत नाही,असा आरोप निवडणूकतज्ज्ञ करतात.ही इतर राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांसाठी धाेक्याची घंटा आहे.दिल्लीतील संपूर्ण ७० जागांवर भाजपने मतांचे मॅन्यूपलेशन केले नसून ३० ते ४० जागांवर त्यांना हे करता आलं.या जागांची ते आधी अभ्यासपूर्ण रेकी करतात व निवडणूकीच्या दोन वर्षा आधीच त्या जागांवर काम करण्यास सुरुवात करतात.नवी दिल्लीत पश्चिमी दिल्लीतून दहा ते पंधरा हजार मतांची अदलाबदल झाली.ही मते उत्तरप्रदेश,बिहारमधून स्थानांतरीत झाली आहे.भाजपचे दिल्लीतील आमदार हे सर्वाधिक याच राज्यातून येतात.कोण चौकशी करणार?चौकशी करणारेच सत्तेत बसले आहेत.यांचीच पोलिस आहे,निवडणूक आयोग आहे,या देशाची लोकशाही अतिशय सुनियोजित पद्धतीने हायजॅक केली जात असल्याचा आरोप देखील डिजिटल माध्यमाध्यमांमध्ये ऐकू येतो.मुखात मात्र,संविधान ते डॉ.आंबेडकर या सर्वांशी गोष्ट असते.जोपर्यंत मोदी-शाह सत्तेत आहेत तोपर्यंत भारतात निष्पक्ष निवडणूका आता जनतेने विसरुन जावे,असा दावा ते करतात.
दिल्लीत आप पक्षाशी मुस्लिम मतदार प्रचंड नाराज असल्याचे काही निवडणूकतज्ज्ञ सांगतात.दिल्लीतील १५ ते १६ जागांवर मुस्लिम मत ही काँग्रेसला गेली कारण शाहीन बाग प्रकरणात जेव्हा बुलडोजर चालले त्यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल हे ’मौन’बाळगून होते.याशिवाय २०२० मध्ये देशात करोनाची सुरवात झाली त्यावेळी मर्कजमधून तो पसरला,केजरीवालांचे हे विधान देखील लाखो मकर्ज अनुयायांना दुखावणारा होता.तसेच केजरीवाल यांचा ‘सौम्य हिंदूवाद’हा देखील फॅक्टर मुस्लिम मतदारांना केजरीवाल यांच्या विरुद्ध एकजूट करुन गेला.जलपुरामध्ये तर केजरीवालच्या विरोधात नारे लागले की ‘मर्कज के दुश्मन मुर्दाबाद’मनिष सिसोदिया यांनी जलपुरामधून निवडणूक लढली असून हा तर त्यांचा मतदारसंघही नव्हता.मनिष सिसोदिया यांनी निवडणूकीत चुकीची देखील कबुली दिली असती तर निकाल काही वेगळा असता.मुस्लिमांनी प्रयत्न केला की त्यांचे मत धर्मनिरपेक्ष पक्षांकडे गेले पाहिजे त्यामुळेच काँग्रेसला एक ते दोन जागा सहज जिंकता येईल,असा दावा त्यांनी केला.हज कमेटी,वक्फ बोर्ड इत्यादी असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर केजरीवाल ‘खामोश’होते.
मात्र,असे असले तरी केजरीवाल यांनी ज्या अनेक लोककल्याणकारी योजना तीन टर्ममध्ये दिल्लीत राबवल्या,त्या ही नजरेआड करता येणार नाही असे तज्ज्ञ सांगतात.दिल्लीतील हा गरीब व निम्न मध्यम वर्ग हा आज ही केजरीवाल यांच्या मागे ठामपणे उभा असल्याचे सांगितले जाते.१०० यूनिटपर्यंतचे वीज बिल माफ,महिलांना मोफत बस प्रवास,मोहल्ला क्लिनिकद्वारे गरीबांच्या आवाक्यात आरोग्य सुविधा आणने,पाण्याचे बिल माफ,महिला,तरुण,बेरोजगारांना थेट आर्थिक मदत,शिक्षण क्षेत्रात सुधारणा इ.यासारख्या योजनांवर तेथील हा गरीब व निम्न मध्यवर्गीय मतदार हा पाणी फेरु इच्छित नाही.त्यामुळे धार्मिक आधारावर मतांची कितपत विभागणी होईल,याचा खरा अदांज उद्याच स्पष्ट होईल.
हे देखील खरे आहे,भाजपने महिलांच्या खात्यात २५०० हजार रुपये तसेच इतर अनेक मोफत योजनांची सरबत्ती दिल्लीतील निवडणूकी प्रचारात केली मात्र,हरियाणात देखील याच घोषणेनंतर ही ऑक्टोबर पासून आता फेब्रुवारी महिना आला तरी अद्याप महिलांच्या खात्यात २५०० रुपये थेट बँकेत जमा करण्याची याेजना हरियाणात सुरु झाली नाही!त्यामुळे आहे त्याचा लोभ सोडून भाजपच्या उसणवारी योजनांच्या माेहात दिल्लीतील मतदार अडकू इच्छिणार नाही,असे जाणकार सांगतात.
उद्या दिनांक ८ फेब्रुवरी रोजी दिल्ली निवडणूकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, पुन्हा एकदा एग्झिट पोल्सची पोल खुलणार का?की निवडणूक तज्ज्ञ यांचे भाकीत खरे ठरणार?याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे,हे मात्र खरे.
……………………………