फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजहिंदूंना पूजेसाठी पोलिसांची परवानगी हा सुलतानी फतवा:विश्‍व हिंदू परिषदेचा निषेध

हिंदूंना पूजेसाठी पोलिसांची परवानगी हा सुलतानी फतवा:विश्‍व हिंदू परिषदेचा निषेध

Advertisements

मुंबई,दि.१९ एप्रिल २०२२: इस्लामिक राष्ट्राप्रमाणे मुस्लिमेतर इतर धर्मियांच्या पूजा पद्धतीला विरोध किंवा बंधने करणारे कायदे पोलिसांनी स्वतंत्र हिंदुस्थानात हिंदुंवर थोपणे हे अत्यंत निंदनीय आहे. हिंदूनी पूजा, हनुमान चालीसा पठण करण्याच्यासाठी पोलिसांची परवानगी ह्यावी तसेच आझानच्या वेळा सांभाळून पूजा, हनुमान चालीला पठण करावे हा कोणता न्याय ? संविधानाने हिंदुच्या दिलेल्या उपासनेच्या मानवी अधिकारांची पायमल्ली करणाऱ्या नाशिक पोलिसांच्या सुलतानी फतव्याचा विश्‍व हिंदू परिषदेतर्फे जाहीर निषेध,,असे शंकर गायकर वि.हिं.प. क्षेत्र मंत्री मुंबई क्षेत्र (महाराष्ट्र आणि गोवा राज्य)यांनी पत्रकाद्वारे केला.

पोलिसांचे काम हे न्यायालयाच्या आदेशाचे अंमलबजावणी करणे हे असते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करत संविधानाच्या किंवा मुंबई , महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कोणत्या कलमाद्वारे हा फतवा नाशिक पोलिसांनी काढला ह्याची माहिती समाजाला द्यावी,अशी मागणी त्यांनी केली.

फक्त भारतातच नव्हे तर समस्त विश्वातील हिंदू समाज हा नेहमीच कायद्याचा आदर तसेच न्यायपालिकेच्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत आला आहे. प्रत्येक सणांना पोलिसांच्या परवानगीसाठी हिंदू समाज पोलीस स्टेशनचे उंबरे झिजवून संविधानाने आखून दिलेल्या चौकटीत राहूनच आपले सण-उत्सव साजरे करीत असतो. म्हणूनच देश-विदेशात हिंदूंना सनमान पूर्वक वागणूक दिली जाते.

सर्व हिंदू देवी-देवतांच्या हाती शस्त्र असूनही त्यांनी नेहमी सामाजिक समरसतेचा संदेश दिलेला आहे म्हणून प्रत्येक हिंदू सण-उत्सवात समाजाला जोडण्याचे, एकोपा राखण्याचे कार्य हिंदू समजातर्फे करण्यात येते. हिंदू समजातर्फे अनेक लोकोपयोगी सेवा उपक्रम माफक दरात चालविले जातात ज्याचा सर्वधर्मीय लाभ घेत असतात. सुशिक्षित, उच्च शिक्षित, जवाबदार हिंदू पोलिसांची रितसर परवानगी व आपल्या नावे १४९ ची नोटीस घेवून आपल्या देवी देवतांचे उत्सव साजरा करीत असतो. श्री राम नवमी व हनुमान जन्मोत्सवा निमित्त देशाच्या विविध भागात हिंदुच्या मिरवणुकीवर मुसलमान समाजाने जाणीव पूर्वक केलेल्या हल्ल्यात मार खाऊन जखमी झालेल्या फक्त हिंदूंवरच पोलिसांनी कारवाई केल्याचे दिसून आले,असा आरोप त्यांनी केला.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक पोलीस स्थानकात स्वतंत्र पोलीस निरीक्षक तसेच प्रत्येक शहरात अतिरिक्त पोलीस आयुक्ताची नेमणूक केलेली असते. माननीय उच्च तसेच माननीय सर्वोच्च न्यायालच्या आदेशांचे पालन व अंमलबजावणी करून आपआपल्या न्यायालयीन अधिकार क्षेत्रात कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांनी करायचे असते. अनधिकृत भोंग्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याविषयी  उच्च तसेच  सर्वोच्च न्यायालाचे आदेश असतानाही पोलीस प्रशासनाने कोणती ही कारवाई केली नाही. हे वेळो-वेळी केलेल्या विविध माहितीच्या अधिकारात मध्ये समोर आले आहे.

हिंदू समाजाने कोणत्याही धर्मियांच्या पूजा पद्धतीला कोणताही विरोध केला नाही. या उलट अनेक ठिकाणी हिंदूनी स्वखर्चातून मशिदी उभारून दिल्याची, नमाजासाठी मंदिरातील जागा उपलब्ध करून दिल्याची उदाहरणे आपल्या समोर आहेत. विरोध हा आझानला नसून अनधिकृत भोग्याद्वारे होणार्‍या आवाज प्रदूषणाला आहे. महाराष्ट्र सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे तसेच पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे हिंदू समाजाला आझान विरुद्ध हनुमान चालीसा असे हे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे.

देशाचा मुस्लीम समाज हा नेहमीच संविधान खतरे मे है असा गळा काढत असतो परंतु  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही आपल्या धर्मगुरूंना विचारून त्यांच्या आदेश प्रमाणे कार्य करू असे म्हणणे म्हणजे देशाच्या संविधानाची घोर निंदाच नाही का?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थितीत केला.

कायद्याला पायदळी तुडवणा-्यांना वेगळा न्याय व कायदा मानणा-यांवरच सर्व बंधने हे कोणते धोरण ? “सद रक्षणाय खल निग्रहणाय” या प्रमाणेच पोलिसांनी अश्या समाजकंटकांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. अनधिकृतपणे लावलेल्या सर्वच धार्मिक स्थळावरून भोंगे हे काढलेच गेले पाहिजे. व न्यायपालिकेच्या सूचनांचे, आदेशांचे सर्वच देशवासीयांनी कायद्याच्या चौकटीत राहून पालन केलेच पाहिजे,असे ते म्हणाले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या