

पत्रभेटच्या’अक्षयदान’ उपक्रमाचा समारोप
नागपूर, २० मे: विवाह कधी होईल, तब्येत कशी राहील, नोकरी कधी लाभेल, केवळ हेच सांगणारे ज्योतिषशास्त्र नाही तर ते वेदांमधून निघालेले एक शाश्वत शास्त्र आहे. जीवन कल्याणासाठी निर्माण झालेले असे हे शास्त्र आहे, असे प्रतिपादन ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक प्रकाशशास्त्री मुळे यांनी केले. पत्रभेटच्या ‘अक्षयदान’ उपक्रमाचा गुरूवारी समारोप झाला,त्याप्रसंगी ते बोलत होते.
सात दिवस चाललेल्या या उपक्रमात ज्योतिषशास्त्र, हस्तरेषा शास्त्र, अंकशास्त्र, पूर्वजन्म, पुनर्जन्म अशा विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाचा समारोप अमरावतीचे प्रकाशशास्त्री मुळे यांच्या व्याख्यानाने झाला. त्यांनी ‘ज्योतिषशास्त्र मार्गदशन’ विषयावर आपले विचार मांडले. कार्यक्रमाला सद्गुरूदास महाराजांची विशेष उपस्थिती होती.
प्रकाशशास्त्री मुळे म्हणाले, ज्योती शब्दाचा अर्थ प्रकाश, तेज, ज्ञान असा असून ज्योतिषशास्त्र हे कुठल्यातरी तेज, प्रकाशाबद्दलचे ज्ञान देते. त्याचा उगम वेदांमधून झाला आहे. हे शास्त्र ग्रह, तारे यांच्या गती, स्थितीबद्दलचे गणित मांडते. सोबतच, त्याचा चराचरावर होणारा परिणाम म्हणजे फलिताचा अभ्यास दर्शवते. सध्याच्या काळात यात बरेच संशोधन झाले असून गणिताचा भाग काम्प्युटरच्या मदतीने अधिक सोपा झाला आहे पण त्यामुळे फलिताकडे दुर्लक्ष झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अमर देशपांडे यांनी केले.
बुधवारी नागपूरचे डॉ. राजन केळकर यांनी ‘तिथीप्रवेश व वर्षफल’ विषयावर मार्गदर्शन केले. ज्योतिषामध्ये सिद्धांत, संहिता आणि जातक किंवा होरा अशा तीन स्कंधांचा समावेश आहे. आताशा लोकांना जातक किंवा होरा स्कंधामध्ये अधिक रूची असल्याचे दिसते. त्यात अनेकविध फलित कथनांच्या पद्धतीत आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी तिथी प्रवेश व वर्षफळाबद्दल विस्तृत माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मोहन बरबडे यांनी केले.




आमचे चॅनल subscribe करा
